Friday 19 December 2014

गीता आणि गाथा!

-सूर्यकांत पळसकर


श्रीमद्भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याविषयीचे सूचक विधान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. गीता कोणी वाचत नाही, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यावर नुकतीच व्यक्त केली. भारत हा बहुभाषिक आणि बहुपंथीय देश आहे. त्यामुळे भारताचा अधिकृत राष्ट्रीय ग्रंथ कोणता व्हावा, याचा निर्णय घेणे सोपे नाही. गीता हा निःसंशय महान ग्रंथ आहे.  तथापि, राष्ट्रीय ग्रंथाचा बहुमान मिळावा, असे इतरही अनेक ग्रंथ या देशात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हा त्यातीलच एक ग्रंथ होय. 

सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय ग्रंथाचा मुद्दा काढला, त्याच्या सुमारे दीडशे वर्षे आधी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे डायरेक्टर जनरल ऑफ पब्लिक इन्स्टड्ढक्शन सर अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांना भारताचे ‘राष्ट्रीय कवी' असे म्हटले होते. राष्ट्रीय कवीच्या रचनांना राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा मिळणे नैसर्गिकच म्हणायला हवे. तुकोबांना राष्ट्रीय कवी म्हणणारे ग्रँटसाहेब काही लहान असामी नव्हते. अमेरिकेत जन्मलेले ग्रँट ब्रिटिश साम्राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षणतज्ज्ञ होते. लंडनच्या एडिनबर्ग विद्यापीठात ते प्राचार्य होते. ब्रिटिश सरकारने नंतर त्यांना भारतात पाठविले. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजचे प्रोफेसर, प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि विधान परिषदेचे सदस्य अशा अनेक जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. मुंबईत असतानाच तुकोबांचे अभंग त्यांच्या वाचनात आले. अभंग वाचून ग्रँटसाहेब भारावून गेले. जानेवारी १८६७च्या ‘फोर्टनाईटली रिव्ह्यू'मध्ये त्यांनी तुकोबांवर एक निबंध प्रसिद्ध केला. तुकोबांच्या काही अभंगांची पद्य भाषांतरेही त्यांनी केली. ग्रँटसाहेब श्रद्धावंत ख्रिश्चन होते. त्यांचा बायबलचा उत्तम अभ्यास होता. तुकोबांच्या अभंगांची बायबलमधील डेव्हिडच्या गीतांशी तुलना करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. बायबलमधील ही गीते ‘डेव्हीड्स साम्स' (David’s psalms) म्हणून प्रसिद्ध आहेत. ही गीते अत्यंत भावगर्भ आहेत. तोच भाव ग्रँटसाहेबांना तुकोबांच्या अभंगांत दिसून आला. ‘सतत देवाच्या जवळ राहिलेल्या व्यक्तीच्या भावनांचा सहज उद्गार', असे वर्णन त्यांनी तुकोबांच्या अभंगांचे केले.

ग्रँटसाहेबांच्या आधीपासून ब्रिटिश अधिका-यांना तुकोबांच्या अभंगांनी आकर्षित केले होते. त्या काळी महाराष्ट्रात ख्रिस्ती मिशनरीही मोठ्या प्रमाणात काम करीत होते. तुकोबांच्या अभंंगांचा वापर करून एतद्देशीय लोकांना ख्रिस्तचरणी आणता येईल, असे अनेक मिशन-यांना वाटत असे. त्या काळी नुकतेच ख्रिश्चन झालेले रे. नारायण वामन टिळक यांचेही असेच मत होते. टिळक हे मूळचे चित्पावन ब्राह्मण होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी धर्मांतराच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते. ब्रिटिश मिशनरी मरे मिचेल (Dr. Murray Mitchell) यांनी याच उद्देशाने तुकोबांच्या अभंगांचा अभ्यास केला. १८४९ साली मरे यांनी महिपतीच्या लिखाणाधारे तुकोबांचे संक्षिप्त चरित्र लिहिले. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात ते छापून आले. मरे यांनी तुकोबांच्या अभंगांचा इतका अभ्यास केला, की त्यांना स्वतःलाच अभंग रचता यायला लागले! अर्थात हा सारा खटाटोप धर्मांतरासाठी होता. ग्रँटसाहेबांना मिशन-यांच्या या कारवाया कळल्या होत्या. याचा समाचार त्यांनी आपल्या लेखात घेतला. ग्रँटसाहेबांनी लिहिले की, ‘ज्यांच्या मुखी तुकारामांची वाणी वसत आहे, त्यांना नैतिकदृष्ट्या ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे, हे पटवून देणे दुरापास्त आहे!'

आज तुकोबांची जी गाथा महाराष्टड्ढात उपलब्ध आहे, त्याचे सारे श्रेय ग्रँटसाहेबांनाच जाते. सर बार्टल फ्रिअर हे तेव्हाचे मुंबई प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते. महाराष्ट्रात विखुरलेले तुकोबांचे अभंग एकत्रित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासाठी २४ हजारांचे अनुदान ग्रँटसाहेबांनी गव्हर्नर बार्टल साहेबांकडून मंजूर करून घेतले. विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांची संपादक म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रकल्पावर देखरेख करण्याची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित यांच्यावर सोपविण्यात आली. १८६९ साली तुकोबांच्या गाथेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्यानंतर चार वर्षांनी १८७३ साली दुसरा भाग प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात त्या काळी उपलब्ध असलेल्या सर्व हस्तलिखितांचा अभ्यास करून हा गाथा प्रसिद्ध झाला. उपलब्ध हस्तलिखितांतील पाठभेदांची नोंदही संपादकांनी करून ठेवली आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने हाच गाथा पुनप्र्रकाशित केला. काही अभंगांचा अपवाद वगळता वारक-यांमध्येही हाच गाथा प्रचलित आहे. अशा प्रकारे तुकोबांचे अभंग जतन करण्याचे महान काम सर अलेक्झांडर ग्रँट यांनी करवून घेतले. या प्रकल्पासाठी ब्रिटिश सरकारने दिलेल्या २४ हजार रुपयांची किंमत आजच्या हिशेबाने किती तरी मोठी होईल. ही मदत केवळ तुकोबांवरील प्रेमातून त्यांनी केली. गो-या साहेबांचे तुकोबांवरचे हे प्रेम त्या काळी महाराष्ट्रातील विद्वान म्हणविणा-या अनेकांच्या पोटदुखीचा विषय झाले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या निरपेक्ष बुद्धीच्या पंडिताने यावर केलेले भाष्यही बघण्याजोगे आहे. चिपळूणकरांनी निबंधमालेत लिहिले की, ‘…जो बिचारा शूद्रकवी आपल्या लंगोटेबहाद्दर व घोंगडीवाल्या भक्तमंडळीतच काय तो रमायचा, किंवा फार झाले तर हरदासांच्या कथाप्रसंगी सत्कार पावायचा, त्यास एकाएकी अरबी गोष्टीतील अबू हसनसारखे मोठे ऐश्वर्य प्राप्त झाले... असो झाली ती गोष्ट बरीच झाली.'

तुकोबांच्या अभंगांच्या प्रेमात पडलेल्या ब्रिटिश अधिकारी लेखक, कवी यांची यादी मोठी आहे. जे. नेल्सन फ्रेझर यांनी तुकोबांच्या अभंगांचे ‘पोएम्स ऑफ तुकाराम' या नावाने भाषांतर केले. फ्रेझर यांचाच ‘द लाइफ अँड टीचिंग ऑफ तुकाराम' हा अभ्यासग्रंथही प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने हा ग्रंथ पूर्ण होण्याआधीच फ्रेझर यांचे निधन झाले. जेम्स एफ. एडवर्ड्स यांनी नंतर तो पूर्ण केला. १९२२ साली हा ग्रंथ दोघांच्या नावे प्रसिद्ध केला. एडवर्ड्स यांचाही बायबलचा सखोल अभ्यास होता. या सा-या गो-या साहेबांनी आपला धर्म विसरून तुकोबांवर प्रेम केले. अभंगांच्या अभ्यासासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खर्ची घातली. भारत सरकारने असेच प्रेम दाखवून तुकोबांना ‘राष्ट्रकवी' म्हणून गौरवायला हवे. 
(लेखक औरंगाबाद लोकमतचे मुख्य उपसंपादक आहेत.)
(प्रसिद्धी : लोकमत १९ डिसेंबर २०१४)



Wednesday 26 November 2014

शून्य सेनेचे सेनापती!

सूर्यकांत पळसकर

'काळ प्रतिकूल आहे, तोपर्यंत शत्रूला डोक्यावर घेऊन नाचा. काळ अनुकूल होताच त्याला डोक्यावरूनच खाली आपटा', असे चाणक्याचे एक वचन असल्याचे सांगितले जाते. ‘सांगितले जाते, असे विधान यासाठी केले, की त्याची वैधता तपासण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. आपल्याला हवा असलेला विचार कोणा तरी ऐतिहासिक अथवा पौराणिक व्यक्तीच्या नावे खपवला, की त्याला वैधता प्राप्त होत असते! प्राचीन काळापासून ही खपवाखपवी आपल्याकडे सुरू आहे. चाणक्याच्या नावे तर अचाट विचार रोजच्या रोज प्रसृत होत असतात. त्यात भर म्हणजे चाणक्याचे पेटंट आरएसएसच्या नावे आहे. परिवाराचे कुलदैवत असल्यामुळे चाणक्याने सांगितलेल्या मार्गावरून चालणे भाजपासाठी बंधनकारक आहे! हे सारे समजून घेतले, की भाजपा आपल्या मित्रपक्षांना डोक्यापर्यंत उचलून-उचलून का पटक्या देत आहे, याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार नाही; पण चाणक्याची शत्रूविषयक नीती आणि भाजपाची महाराष्ट्रातील राजकीय धोरणे यांचा मेळ घालताना अनेक पट्टीचे स्वयंसेवकही अवघडून गेले आहेत. वर दिलेला चाणक्य विचार हा शत्रूंसाठी आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेपासून शिवसंग्रामपर्यंतचे सर्व मित्रपक्ष काही पाकिस्तानातील नाहीत. मग त्यांना डोक्यावरून उचलून पटकायचे कारण काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा प्रश्नार्थींसाठी चाणक्याने सांगितलेला दुसरा एक विचार उपयुक्त ठरू शकेल. हा विचार म्हणतो, की ‘राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र नाही अन् कायमस्वरूपी शत्रू नाही!' शत्रू काय नुसते पाकिस्तानातच असतात? राजकारणातले विरोधक हे शत्रूच. त्यांच्यासोबत करायचा व्यवहार चाणक्याने सांगितलेल्या नीतीने करण्यातच खरा मुत्सद्दीपणा आहे, असा याचा अर्थ.

परिवारातील थिंक टँकवाले कोणत्याही प्रश्नांनी विचलित होत नाहीत. प्रत्येक कृतीच्या समर्थनार्थ विचारांचा पुरवठा ते करू शकतात. परिवाराच्या थिंक टँकचे सामर्थ्य खरोखरच अचाट आहे. ते बघून साक्षात चाणक्यही स्वर्गात हसला असेल. विशेषतः रिपाइं नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची सध्या जी फजिती सुरू आहे, ती पाहून तर तो खदाखदा हसला असेल. या नेत्यांनी आधीच चाणक्य वाचला असता, तर अशी फसगत वाट्याला आली नसती! खरे म्हणजे, २५ वर्षांपासूनचा जिगरी दोस्त असलेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने झुलवत-झुलवत झुरळासारखे झटकून टाकले, तेव्हाच आठवले-जानकरादी मित्रांनी सावध व्हायला हवे होते; पण तसे घडले नाही. भाजपासोबत महायुती करून त्यांनी निवडणूक लढविली. भाजपाने मोठ्या मनाने (?) त्यांना २५ जागा दिल्या. आठवले यांना त्यातल्या १४ जागा मिळाल्या होत्या. आठवले एवढे जोशात होते, की निवडणुकीनंतर सत्तेवर येणा-या सरकारमध्ये आपणच उपमुख्यमंत्री होणार, अशी घोषणाच त्यांनी करून टाकली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर महादेव जानकर अक्षरशः भारावून गेले होते. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या पहिल्या बैठकीसाठी आले, तेव्हा त्यांनी विधानभवनाच्या पायèयांवर लोटांगण घातले होते. भावनाविवश झाल्याने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते; पण राजकारण हा सर्वाधिक क्रूर खेळ आहे, तो भावनेवर चालत नाही. शिवसेनेला फेकले त्याप्रमाणे आठवले-जानकरादी मित्रांनाही आता भाजपाने फेकून दिले आहे.

मटका आकड्यावर चालतो. लोकशाहीही आकड्यावरच चालते. ज्याचा आकडा मोठा तो शेर. शिवसेनेकडे किमान ६३ आमदारांचा आकडा तरी आहे. त्या बळावर ते विरोधी पक्ष म्हणून का होईना, पण ताठ उभे आहेत. बार्गेनिंगची शक्ती राखून आहेत. आठवले-जानकरादी नेत्यांचे तसे नाही. जानकरांकडे दौंडचे राहुल कुल यांच्या रूपाने एकुलता एक आमदार आहे. आठवले, शेट्टी, मेटे हे शून्य सेनेचे सेनापती ठरले आहेत. त्यांचा एकही आमदार विधानसभेत नाही. आठवले-जानकरादी नेत्यांकडे छोट्या-छोट्या जाती-समूहांची ताकद होती, ती भाजपाला मिळाली. त्यातून भाजपाची विधानसभेतील सदस्यसंख्या ४४ वरून १२२ झाली. याच्या बदल्यात भाजपाची मते मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पारड्यात जायला हवी होती; मात्र ती गेली नाहीत. ही मते मित्रपक्षांऐवजी शिवसेनेच्या उमेदवाराकडे गेली. तेथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

रामदास आठवले यांच्या पक्षाने परवा याबद्दल नाराजी व्यक्त केली; पण त्याचा आता काहीच उपयोग नाही. असल्या नाराज्या हवेच्या झुळकीसरशी उडून जातात. निवडणुकीआधीच आणाभाका पक्क्या करून घ्यायला हव्या होत्या किंवा निवडणूक संपल्यानंतर लगेच या मुद्याला तोंड फोडायला हवे होते; पण सरकारात आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा या नेत्यांना होती. त्या आशेपोटी ते गप्प बसले. ६३ आमदार असतानाही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवणारा भाजपा शून्य सेनेच्या सेनापतींना सत्तेत खरेच वाटा देईल काय?

मित्रपक्ष ही राजकारणातील एक मोठी कटकट आहे, हा नवा विचार भाजपाने आत्मसात केला आहे. हा भाजपाचा अनुभवसिद्ध विचार आहे. वाजपेयी सरकार असल्यापासून मित्रपक्षांची कटकट भाजपा सोशीत आला आहे. त्यापासून मुक्ती मिळवायची, असा त्यांचा आताचा निर्धार दिसतो. मित्रपक्षांकडून शक्ती मिळवून बलवान व्हायचे, हे या निर्धाराला प्रत्यक्षात उतरवायचे सूत्र दिसते. महाराष्टड्ढ विधानसभा निवडणुकीत त्याचेच प्रत्यंतर आले. हे सूत्र वापरताना भाजपाच्या खेळ्या मात्र अत्यंत सावध आहेत. ‘नाही म्हणायचे नाही आणि काही द्यायचेही नाही', अशी ही खेळी आहे. आपल्याला बोल लागणार नाही, याची काळजी मात्र हा पक्ष घेत आहे. मित्रपक्षांना सत्तेत वाटा देणार का, या प्रश्नावर ‘चर्चा सुरू आहे', असे ठेवणीतले उत्तर भाजपा नेत्यांकडून दिले जाते. हा सावधपणाचा भाग आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, या मुख्यमंत्र्यांच्या ताज्या वक्तव्याकडे त्यामुळे सावधपणेच पाहावे लागते.

(प्रसिद्धी : लोकमत २४ नोव्हेंबर २०१४)

Wednesday 12 November 2014

चला, झोपा काढू या.!

सूर्यकांत पळसकर

सरकार बदलल्याने काय होते? राज्यातील सत्ताबदलानंतर निर्माण झालेला हा प्रश्न आहे. सरकारे येतात आणि जातात. लोकांचे प्रश्न आहे तिथेच राहतात. कुठलाही प्रश्न सहजपणो सुटला असे होत नाही. लोकांना संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हीच लोकांची नियती आहे. निद्रिस्त प्रशासन ही लोकशाहीची नियती ठरल्यामुळे संघर्ष अटळ झाला आहे. निद्रिस्त प्रशासनाला जागे कसे करायचे, हा खरा प्रश्न आहे. पैठण तालुक्यातील शेतक:यांनी यावर अनोखा उपाय शोधून काढला. झोपा काढा आंदोलन! पैठण हे गाव जायकवाडी धरणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जायकवाडी हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सध्या धरणात जवळपास 45 टक्के पाणीसाठाही आहे. तरीही धरणाखालील शेतक:यांचे पोहरे रिकामे. प्यायलाही पाणी नाही. जायकवाडीच्या खाली आपेगाव आणि हिरडपुरी ही छोटी धरणो आहेत. जायकवाडीतून सोडलेले पाणी या छोटय़ा धरणांत जाते. तिथून आजूबाजूच्या गावांना मिळते. अगदी सुटसुटीत व्यवस्था. पण प्रशासनाने ती कधीच नीट पार पाडली नाही. यंदाही तेच झाले. पावसाळा उलटून महिना झाला तरी आपेगाव आणि हिरडपुरीसाठी जायकवाडीचे दरवाजे काही उघडले नाही. अर्ज, विनंत्या सारे करून झाले. प्रशासन हलायला तयार नव्हते. त्यावर उपाय म्हणून शेतक:यांनी ‘झोपा काढा आंदोलन’ पुकारले. गोदावरीच्या पाटबंधा:यांची व्यवस्था पाहणा:या कडा कार्यालयासमोर शे-दोनशे शेतकरी चादरी-कांबळी घेऊन विसावले. या आंदोलनाने प्रशासनाची झोप उडविली! दोन दिवसांत पाणी सोडण्याचा आदेश निघाला. हे आंदोलन करणारी शेतकरी संघर्ष समिती आणि समितीचे नेतृत्व करणारे जयाजीराव सूर्यवंशी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ‘लोहा लोहे को काटता है’, असा शोलेतील एक संवाद आहे. पैठणच्या शेतक:यांनी ‘नींद नींद को काटती है’ असा नवा संवाद या निमित्ताने लिहिला आहे.


पैठण आणि गोदावरीचा हा परिसर संतांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. आपेगाव तर साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचे गाव. माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेय, ‘जो रसनेंद्रियाचा अंकिला । का निद्रेसी जीवे विकला । तो नाही एथ म्हणितला । अधिकारिया ।।’ ही ओवी सांगते, जो खाण्याच्या अधीन आहे, जो झोपेला विकला गेला आहे, तो काही खरा अधिकारी म्हणवला जाऊ शकत नाही. माऊलींची ही ओवी ध्यानयोगाच्या अनुषंगाने आली आहे. पण, आपल्या प्रशासकीय व्यवस्थेला ती अगदी तंतोतंत लागू पडते. ही व्यवस्था नजरेसमोर ठेवूनच जणू माऊलींनी ही ओवी लिहिली. प्रशासन हा पैसे खाण्याचा आणि कामे न करता झोपा काढण्याचा उद्योग झाला आहे. शासकीय कार्यालयात बसलेले अधिकारी या उद्योगात प्याद्याचे काम करीत आहेत. या उद्योगाला सुरुंग लावणो अवघड आहे. कारण तो आता एका बलाढय़ व्यवस्थेत रूपांतरित झाला आहे. व्यवस्था ही खरोखरच बलवान असते. मग ती आजची असो अथवा माऊलींच्या काळातील. माऊलींना वाळीत टाकणारे सनातनी एका व्यवस्थेचाच भाग होते. माऊलींनी आळंदीला जड भिंत चालविली, गोदाकाठी रेडय़ाच्या मुखातून वेद बोलविले. पण, याच वेदांचा आधार घेऊन त्यांना छळणा:या व्यवस्थेला ते जागे करू शकले नाहीत. ते जातिबहिष्कृत म्हणून जगले आणि पतितसावित्रिक म्हणून समाधिस्थ झाले. 

शासकीय यंत्रणोच्या चिरनिद्रेचा फटका दुर्बळांना बसतो. आज शेतकरी हा सर्वाधिक दुर्बळ ठरला आहे. त्यामुळे अनास्थेचा पहिला बळी तोच ठरतो. नवे सरकार सत्तेवर येत असताना विदर्भात 6 शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ही आकडेवारी जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील 4; तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एक शेतक:याने आपली जीवनयात्र संपविली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांत येथील शेतक:यांनी भाजपाचे उमेदवार निवडून दिले. भाजपाला केंद्रात आणि राज्यात अशा दोन्ही ठिकाणी सत्ता मिळाली. शेतक:यांना काय मिळाले? गळफास? 

शेतीतील ख:या समस्या समजून घेतल्याशिवाय शेतक:याच्या गळ्यात रुतलेल्या फासाची गाठ सैल होणार नाही. खते आणि बियाणो महाग होत असताना शेतमालाच्या किमती उतरत आहेत. ही शेतीची खरी समस्या आहे. विदर्भ-मराठवाडय़ातील शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके घेतो. या दोन्ही पिकांचे भाव यंदा कोसळले आहेत. गेल्या वर्षी 6 हजार रुपयांच्यावर असलेला कापूस यंदा चार हजारांच्या खाली आला आहे. सत्ता बदलल्याचे हे फळ समजायचे काय? 1995 साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात शेतक:यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले होते. 17 वर्षाच्या मोठय़ा अवकाशानंतर राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे. शेतक:यांत पुन्हा निराशाच दिसून येत आहे. स्वागत कमानींचे गळफास झाले आहेत. शेतक:यांना दिलासा देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागेल. सरकार ते करणार नसेल, तर शेतक:यालाच जागे व्हावे लागेल. पैठणकरांनी आंदोलन आणखी सोपे करून दिले आहे. चादरी आणि कांबळी घेऊन मंत्रलयासमोर झोपा काढायला शेतक:यांनी तयार राहिले पाहिजे. 

नेतृत्वाची पोकळी हे महाराष्ट्रातील शेतीच्या अधोगतीचे प्रमुख कारण असावे. महाराष्ट्रातील शेतक:यांना राज्यव्यापी आवाका असलेला नेताच आजवर मिळालेला नाही. शरद जोशी यांनी शेतक:यांना नेतृत्व देण्याचा प्रय} केला. पण, त्यांचे लक्ष नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांवरच केंद्रित राहिले. त्यांच्यापासून फुटून बाहेर पडलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नजर उसाच्या पलीकडे गेली नाही. आता तर स्वाभिमानीवाल्यांनी भाजपाशी पाट लावून शेतीच्या प्रश्नांपासून फारकतच घेतली आहे. वरील सा:याच नेत्यांचा आवाका छोटा होता. जी काही आंदोलने झाली, ती ऊस आणि द्राक्षांपुरतीच मर्यादित होती. विदर्भ मराठवाडय़ातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक:यांना कोणीही नेता नव्हता. आजही नाही.

Monday 3 November 2014

रमाबाईनगर ते जवखेडे

सूर्यकांत पळसकर 


ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे. ‘पै पायी काटा नेहटे । तव व्यथा जीवी उमटे । तैसा पोळे संकटे । पुढिलांचेनी ।।’ काटा पायात घुसतो, अश्रू मात्र डोळ्यांत येतात आणि जीव तळमळतो, त्याचप्रमाणे सज्जन मनुष्य दुसऱ्याची दु:खे पाहून तळमळतो. सामाजिक समतेच्या वर्णनासाठी यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण सापडणार नाही. नगर जिल्ह्यातील नेवासे येथे बसून माऊलींनी ही ओवी लिहिली. तोच नगर जिल्हा सध्या जवखेडे खालासा येथील दलित कुटुंबाच्या हत्याकांडाने गाजतो आहे. भर दिवाळीत हे हत्याकांड घडले. येथील संजय जाधव त्यांची पत्नी जयश्री आणि त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुनील यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. हे हत्याकांड इतके निर्घृण आहे की, क्रौर्याच्या साऱ्या उपमा येथे थिट्या पडाव्यात. लज्जेलाही लाज वाटावी अशी ही घटना; पण तिने महाराष्ट्राच्या पोटातील पाणी हलले नाही. दिवाळीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. फटाके उडत राहिले. फराळाची ताटे सजत राहिली. दलित समाजामधून निषेधाचे क्षीण सूर उमटले. उरलेल्या मराठी समाजाच्या मनावर साधा ओरखडाही उमटला नाही. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला ‘दुसऱ्यांच्या संकटांनी पोळणारा’ सज्जनपणा कुठे आहे? की त्याचाही खून झाला आहे?

जवखेडे हत्याकांडानंतर महाराष्ट्राने दाखविलेल्या कोरड्या ढिम्मपणाच्या पार्श्वभूमीवर निर्भया हत्याकांडानंतर उठलेल्या गदारोळाची आठवण टचटचीतपणे समोर येते. महाराष्ट्रापासून दीड हजार किमी दूर असलेल्या दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या देशव्यापी आक्रोशात महाराष्ट्रातील झाडून सारी माध्यमे सहभागी झाली होती. चकचकीतपणा मिरविणारा मराठी मध्यमवर्ग हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरला होता. ही माध्यमे आणि मेणबत्त्यावाले आता कुठे आहेत? दीड हजार किलोमीटर अंतरावरील निर्भयाचा आवाज ऐकून विव्हळ होणाऱ्या मराठी माणसाला आपल्याच गावकुसावरील जवखेडेचा आवाज ऐकू आला नाही. कारण, ही माणसे दलित होती. जगण्याचे जाऊच द्या, मृत्यूची किंमतही येथे समान नाही.


जवखेडेच्या निमित्ताने एक क्रूर योगायोग जुळून आला आहे. ११ जुलै १९९७ रोजी मुंबईच्या घाटकोपर भागातील रमाबाई नगरात दलित हत्याकांड झाले होते. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करणाऱ्या दलितांवर राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी बेछुट गोळीबार केला होता. त्यात १0 दलित ठार झाले होते, तर २६ जखमी झाले होते. ही घटना घडली तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. जवखेडे येथील घटना घडली तेव्हा भाजपाचे सरकार सत्ता हाती घेत आहे. एक विखारी वर्तुळ पूर्ण झाले आहे. या वर्तुळाला रमाबाई नगर आणि जवखेडे असे दोनच बिंदू आहेत, असे मात्र नव्हे. खैरलांजीसह अनेक बिंदूंनी हे वर्तुळ व्यापले आहे. प्रत्येक बिंदूवर क्रौर्याची परिसीमाच दिसून येते.

१९९७ ते २0१४ या सतरा वर्षांच्या काळात महाराष्ट्राने अनेक बदल पाहिले. महाराष्ट्राचे राजकारण, तर पूर्ण ३६0 अंशांत फिरले आहे. रमाबाईनगरातील हत्याकांड घडले तेव्हा दलित संघटना या शिवसेना-भाजपा युतीच्या विरोधात होत्या. आज आठवले यांच्या रूपाने दलित संघटनांमधील एक मोठा घटक भाजपासोबत आहे. दोन निवडणुका त्यांनी एकत्रित लढल्या आणि जिंकल्या आहेत. राज्यात सत्ताबदलही झाला; पण दलितांचे दु:ख मात्र बदलले नाही. अस्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेसारखे ते भळभळतच आहे. जवखेडे खालसा हत्याकांड ही या जखमेची ताजी चिळकांडी आहे. रमाबाई नगरातील हत्याकांडात पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. जवखेडे खालसा प्रकरणात त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही मान्यवर नागरिकांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून तरी हेच वास्तव समोर येत आहे. राज्यात भाजपा सरकारच्या शपथविधीच्या दिवशीच हा अहवाल वर्तमानपत्रांच्या पानांवर झळकला. जवखेडेमधील जाधव कुटुंबाच्या हत्येशी संबंधित आरोपी स्थानिक भाजपा आमदारांचे जवळचे नातेवाईक असल्याने पोलीस कारवाई करण्यास कचरत आहेत, असा स्पष्ट ठपका समितीने ठेवला आहे. नगरचे शिवसेना जिल्हा उपप्रमुखही आरोपींचे जवळचे नातेवाईक असल्याचे समितीने म्हटले आहे. हा अहवाल देणारी नागरी सत्यशोधन समिती सरकारने स्थापन केलेली नाही. त्यामुळे तिला वैधानिक अधिकार नसला, तरी नैतिक अधिकार नक्कीच आहे. समितीवरील सदस्यांची नावे पाहिली, समितीचे नैतिक वजन लक्षात येईल. प्रख्यात साहित्यिक रंगनाथ पाठारे हे समितीवर आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, उत्तम जहागिरदार, सुधाकर कश्यप, फिरोज मिठीबोरवाला, अंजन वेलदूरकर, बेला साखरे यांसारखी समाजाच्या सर्व स्तरांतील मंडळी समितीवर आहे. गावाला भेट देऊन समितीने आपला अहवाल तयार केला आहे. त्याची दखल नव्या सरकारला घ्यावी लागेल. आपली माणसे म्हणून कोणालाही माफी देता येणार नाही.

१९९७च्या रमाबाई नगर हत्याकांडाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधाची धार होती. ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे’ हा शिवसेना-भाजपा युती सरकारच्या अजेंड्यावरील एक प्रमुख मुद्दा होता. हा कायदा रद्द करण्यासाठी युती सरकारने निकराचे प्रयत्नही करून पाहिले. तथापि, जनरेट्यामुळे ते यशस्वी झाले नाहीत. कायदा कायम राहिला; पण त्यामुळे परिस्थिती बदलली नाही. कायदा कायम राहिला म्हणून दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा चिंतेचा मुद्दा आहे; पण सर्वच कायद्यांचा गैरवापर होत आला आहे. मग सगळेच कायदे रद्द करणार का? अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणी मागील कारणे विषमतेत रुतलेली आहेत. इथल्या मातीलाच विषमतेचा वास आहे. या वासाने नगरला माऊलींची ओवी घुसमटली. ही घुसमट इथल्या संपूर्ण समाजाची घुसमट ठरेल, त्या दिवशी समानतेची पहाट उगवेल. तोपर्यंत जवखेडेमागून जवखेडे घडत राहतील.
 (लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)

Wednesday 22 October 2014

इतिहासाची रंगरंगोटी!

सूर्यकांत पळसकर


केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इतिहासाची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडे रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले आहे. मोदी सरकारला भारताचा संपूर्ण इतिहासच आरएसएसच्या विचारांनी रंगवून घ्यायचा आहे. आधी प्राचीन भारताचा इतिहास रंगविला जाईल, असे दिसते. प्राचीन इतिहास नव्याने लिहिण्यासाठी एक संशोधन प्रकल्प संस्कृत विभागाने जाहीर केला आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधी काही निष्कर्षही विभागाने जाहीर केले आहेत. ‘आर्य हे मूळचे भारतीयच आहेत. ते बाहेरून भारतात आले नसून, भारतातून जगाच्या इतर भागात गेले. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथे सापडलेली प्राचीन सिंधू संस्कृती ही मूळची आर्यांचीच संस्कृती आहे.' हा या निष्कर्षांचा गोषवारा सांगता येईल. इतिहासातील पुरावे पाहून निष्कर्ष काढण्याची प्रथा जगभरातील इतिहासकार पाळतात. दिल्ली विद्यापीठाने मात्र आधी निष्कर्ष जाहीर केले आहेत.


अलीकडेच गुजरातच्या राज्यपालपदी बसलेले भाजपाचे कडवे नेते ओ.पी. कोहली यांच्या खास उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा झाली. ‘इतिहास संशोधना'चा हा प्रकल्प हाती घेण्याची गरज का भासली याची तीन प्रमुख कारणे संस्कृत विभाग प्रमुख रमेश भारद्वाज यांनी जाहीर केली. ती अशी :
१. प्राचीन हस्तलिखिते आणि मजकुरांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संस्कृती ही परकीय संस्कृती नाही हे स्पष्ट होते.
२. फ्रेंच आणि संस्कृत भाषेच्या उच्चारात मोठे साम्य आहे. फ्रेंचमध्ये संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या नियमांचाही प्रत्यय येतो.
३. प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतात. यातून असा निष्कर्ष काढता येतो की, आर्य हे भारतातून जगाच्या इतर भागात स्थलांतरित झाले. 
ऋग्वेद हा संस्कृत भाषेतील सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. त्यापेक्षा कोणतेही प्राचीन हस्तलिखित उपलब्ध नाही. मग, भारद्वाज आणखी कोणत्या प्राचीन हस्तलिखिताबाबत बोलत आहेत? फ्रेंच ही मराठी भाषेप्रमाणेच एक आधुनिक भाषा आहे. मराठी जशी प्राकृतापासून बनली, तशी फें्रच ही व्हल्गर लॅटिनपासून बनली. ऋग्वेदानंतर सुमारे ३  हजार वर्षांनी फ्रेंच भाषा अस्तित्वात आली. व्याकरणकार पाणिनीचा जन्मही ऋग्वेद लिहिला गेल्यानंतर २ हजार वर्षांनी झाला. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, फ्रेंच भाषेचा जन्म झाला तेव्हा संस्कृत भाषा मृत झालेली होती आणि पाणिनीने संस्कृताचे व्याकरण लिहिले तेव्हा फ्रेंच भाषेचा जन्मही झालेला नव्हता! असे असले तरी वैदिक संस्कृत, पाणिनी आणि फ्रेंच भाषा  या तिघांचा मेळ घालण्यात येत आहे. या लोकांच्या पांडित्याला सलामच केला पाहिजे.

‘प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतातङ्क, हे वाक्य भारद्वाज यांनी ‘आपण काही तरी महान शोध लावल्या'च्या थाटात उच्चारलेले दिसते. ही शुद्ध लबाडी आहे. मुळात आर्य आक्रमणाचा सिद्धांतच या भाषिक साम्याच्या पायावर उभा आहे. प्रख्यात जर्मन विद्वान मॅक्समुल्लरने हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला. मॅक्समुल्लर भाषाशास्त्रज्ञ होता. तो संस्कृतच्या अभ्यासासाठी भारतात आला होता. प्राथमिक नात्यासंबंधींच्या शब्दांचा अभ्यास करताना त्याला लॅटिन आणि संस्कृतातील साम्य दिसले. उदा. संस्कृतात आईला मातृ म्हणतात. या शब्दात म, त आणि र हे वर्ण येतात. लॅटीनमध्ये आईला मदर म्हणतात. त्याच्या स्पेलिंगमध्ये म, त आणि र हे तीन वर्णच आहेत. संस्कृतात वडिलांना पितृ आणि भावाला भ्रातृ म्हणतात. लॅटिनमध्ये ही नामे अनुक्रमे फादर आणि ब्रदर अशी आहेत. या शब्दांतही वर्णांचे पूर्णतः साम्य आहे. इतरही अनेक समान वर्ण असलेले शब्द त्याला आढळून आले. त्यातून मॅक्समुल्लरने आर्यआक्रमणाचा सिद्धांत मांडला. याच साम्याचा आधार घेऊन दिल्ली विद्यापीठाचा संस्कृत विभाग (पर्यायाने मोदी सरकार) आता ‘आर्य हे भारतातून बाहेर गेले', असा निष्कर्ष काढणार आहे.

मॅक्समुल्लरने भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये एक पॅटर्न शोधून काढला. या भाषांनी दोन वर्तुळे केली आहेत. मधल्या भागात हिंदी आणि तिच्या बोली भाषांचे वर्तुळ असून, बाहेरच्या बाजूने पंजाबी, सिंधी, काश्मिरी, गुजराथी, मराठी, उडिया, बंगाली, आसामी, नेपाळी या प्रादेशिक भाषांचे वर्तुळ आहे. या सर्व भाषा एकमेकांच्या बहिणी आहेत!  या पॅटर्नमधून मॅक्समुल्लरने अंतर्वर्तुळ-बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला. आर्यांनी भारतात टोळ्या टोळ्यांनी असंख्य आक्रमणे केली. आधी आलेल्या टोळ्या सप्तसिंधूंच्या प्रदेशात स्थिर झाल्या होत्या; मात्र नंतर आलेल्या टोळ्यांनी त्यांना गंगेच्या खो-यापर्यंत खाली ढकलले. मागाहून आलेल्या टोळ्यांनी आधी आलेल्या टोळ्यांच्या भोवती कडे केले. मधल्या भागातील आर्यांच्या भाषेतून हिंदी आणि तिच्या बोली भाषा तयार झाल्या, तर बाहेर कडे करून राहिलेल्या आर्यांच्या भाषांतून प्रादेशिक भाषा तयार झाल्या, असे मॅक्समुल्लर म्हणतो. आर्य इथलेच आहेत, असा दावा करायचा असेल, तर मॅक्समुल्लरचा हा सिद्धांत खोडून काढावा लागेल. 
हडप्पा येथील उत्खननात सापडलेला बैलाची मुद्रा असलेला शिक्का.  
आणखीही अनेक मुद्दे आहेत. सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. या उलट ऋग्वेदातील आर्यांच्या संस्कृतीला घोड्याशिवाय अस्तित्वच नाही. सिंधू संस्कृती शहरांची संस्कृती आहे. या उलट भटक्या आर्यांचा मुख्य देव इंद्र हा ‘पुरंदर' म्हणजे शहरे उद्ध्वस्त करणारा आहे. सिंधू संस्कृतीत शेती होत होती; त्यामुळे कालवे आणि धरणे होती. इंद्र मात्र बांधलेले कालवे उद्ध्वस्त करणारा आहे. वृत्रासुराला मारून इंद्राने सप्तसिंधूंचे पाणी मुक्त केले, अशी वर्णने ऋग्वेदात आहेत. अशा प्रकारे या दोन्ही संस्कृतींचे मूळ रंगरूप कुठल्याच बाबतीत जुळत नाही. 

Thursday 16 October 2014

गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!

गांधीजींना पुरस्कार न देणाऱ्या नोबेल समितीला सारे गुन्हे माफ..!

-सूर्यकांत पळसकर


बायबलमध्ये एका प्रसंगात शास्त्रांचा हवाला देत येशू म्हणतो की, ‘गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!' उपेक्षेचे धनी असलेल्यांसाठी हे वचन प्रेरणादायी ठरावे. बालमजुरी आणि मुलांच्या शोषणाविरुद्ध काम करणारे गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा या वचनाची प्रकर्षाने आठवण झाली. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानातील मलाला युसूफझई या तरुणीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे मलालाचे नाव जगातील कानाकोप-यात आधीच दुमदुमत होते. कैलाश सत्यार्थी मात्र भारतातही कोणाला माहिती नव्हते! त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला- कोण हे सत्यार्थी? नोबेल पुरस्कार मिळविण्याएवढे प्रचंड काम करणारा हा माणूस खरेच भारतात राहतो का? राहत असेल, तर आपल्याला कसा काय माहिती नाही? हा माणूस कधी टीव्हीवर दिसला नाही. वृत्तपत्रांतून झळकला नाही. सरकारी पुरस्कारांच्या यादीत कधी दिसला नाही. समाजसेवकांच्या भाऊगर्दीतही नजरेस आला नाही. अचानक त्याचे नाव नोबेलच्या पुरस्कारातच दिसले. अरे आहे तरी कोण हा माणूस?

नोबेलविजेत्या नायकाचे साधे नावही माहिती नसणे, हा काही लोकांचा दोष नाही. सकारात्मक काम करणा-यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणा-या व्यवस्थेचा हा दोष आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्यावरही शेकड्याने पुस्तके लिहिणारी, नाटके-सिनेमे काढणारी ही व्यवस्था गांधीवादी कैलाश सत्यार्थी यांना अनुल्लेखाने मारत राहिली. त्यामुळे त्यांचे नाव कोणाला माहिती असण्याचे कारणच नव्हते.

संस्कृतात भवभूती नावाचा एक मोठा नाटककार आहे. त्याच्या नाटकांना त्याच्या हयातीत कधी लोकमान्यता मिळाली नाही. लोकमान्यता नाही म्हणून भवभूती खंत करीत बसला नाही. व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून तो लिहीत राहिला. जाताना सांगून गेला, ‘पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे. कधी तरी, कोठे तरी माझ्या नाटकांना मान्यता मिळेलच!' आज भवभूती खरोखरच मोठा नाटककार म्हणून ओळखला जातो. भवभूतीचे वचन सत्यार्थी यांच्या नोबेलने पुन्हा एकदा खरे ठरले. भारतीय व्यवस्थेने नाकारलेला हा चौकोनी चिरा नोबेलवाल्यांनी हेरला. आज तो खरोखरच कोनशिला झाला आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोनशिला होण्याची क्षमता असतानाही उपेक्षेच्या लाथा खाणाèयांची संख्या भारतात मोठी आहे. सगळ्यांचेच नशीब कैलाश सत्यार्थी यांच्यासारखे बलदंड नसते.

कैलाश सत्यार्थी यांना नोबेलच्या आधी जवळपास १२ पुरस्कार मिळाले असल्याचे आता समोर आले आहे. दुर्मिळ योगायोग पाहा, यातील एकही पुरस्कार भारतातील नाही. सगळे पुरस्कार युरोप आणि अमेरिकेतील आहेत. तेथील विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्था यांनी हे पुरस्कार दिले आहेत. इंजिनिअर असलेल्या सत्यार्थी यांनी १९८० साली प्राध्यापकीला रामराम ठोकून ‘बचपन बचाओ आंदोलना'ची सुरुवात केली. १९८० ते २०१४ या ३४ वर्षांच्या काळात भारतात डावे-उजवे, सेक्युलर, हिंदुत्ववादी अशा सर्व पंथीयांची सरकारे आली. यापैकी कोणत्याही सरकारला त्यांच्या कार्याची महती कळाली नाही. या काळात पद्म आणि इतर पुरस्कार किती दिले गेले, याचा हिशेब काढणे अवघड आहे; पण यातील एकाही पुरस्कारावर सत्यार्थी यांचे नाव कोरले गेले नाही. भारत सरकारच्या पुरस्कारांतून इतकी वर्षे ‘सत्य' हरवत राहिले. तेच नोबेलवाल्यांना सापडले.

खरे कार्यकर्ते पुरस्कारांसाठी काम करीत नसतात, हे खरे असले तरी पुरस्कार कार्यकत्र्यांना हुरूप देतात. समाजाने कामाची दिलेली ती पोचपावती असते. सत्यार्थी यांच्या कामाची पोचपावती भारतीय समाजाने दिली नाही. पण, म्हणून सत्यार्थी यांचे काम थांबले नाही. ३४ वर्षांच्या काळात जगभरातील १४४ देशांत त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढविला. हा संपूर्ण कालखंड सोपा मात्र नव्हता. या काळात त्यांच्यावर दोन प्राणघातक हल्ले झाले.

सत्यार्थी आणि मलाला यांच्या नोबेल पारितोषिकाने दोन्ही देशांत एक विचित्र योगायोग जुळवून आणला आहे. पाकिस्तान पूर्णतः कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे, तर भारतात कट्टरपंथीयांची घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत गांधीजींनी सांगितलेल्या शांतता आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जाणा-या या दोघांना नोबेल जाहीर झाले आहे. पाकिस्तानच्या मातीला सहिष्णुतेचा जागर तसाही अपरिचितच आहे. भारताचे मात्र तसे नाही. इथल्या मातीला बापूंच्या सहिष्णुतेचा सुगंध आहे. गांधीजींची हत्या होऊन ६६ वर्षे झाली. या संपूर्ण काळात गांधीविचार गाडून टाकण्यासाठी जातीय शक्तींनी आपले सर्व ‘चाणक्य' कामाला लावले होते. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर ‘चाणक्यां'च्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण हाय रे दैवा! गांधींचा विचार नोबेलचा धुमारा घेऊन पुन्हा जमिनीतून वर आला आणि त्याचे स्वागत करण्याची पाळी ‘चाणक्यां'वर आली. काव्यगत न्यायाचे यापेक्षा बळिवंत उदाहरण जगाच्या इतिहासात बहुधा सापडणार नाही. कट्टरपंथीयांच्या दृष्टीने मलाला आणि सत्यार्थी यांचे देश आणि धर्म एकमेकांचे शत्रू आहेत. तरीही दोघांचे मिशन एक होते आणि मार्गही एकच होता. बापूंचा शांतीमार्ग. नोबेल पुरस्काराने आता त्यांना कायमस्वरूपी एकत्र आणले. भविष्यात जेव्हा जेव्हा सत्यार्थी यांचे नाव घेतले जाईल, तेव्हा तेव्हा मलालाचीही आठवण होईल. तसेच मलालाच्या आठवणीसोबत सत्यार्थींचे नावही ओठांवर येईल. दोन्ही देश आणि दोन्ही धर्मांनी शिक्षणासाठी तसेच दहशतवादाच्या विरुद्ध काम करावे, अशी अपेक्षा नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना व्यक्त केली आहे. ती अनाठायी नाही.

अनेक वेळा नामांकन होऊनही नोबेल समितीने महात्मा गांधी यांना नोबेल दिले नाही. भारतातील एका साध्या गांधीवाद्याला शेवटी हा पुरस्कार त्यांनी दिला. नोबेल समितीला सर्व गुन्हे माफ..!

(लेखक लोकमत, औरंगाबादमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
प्रसिद्धी : लोकमत १५ ऑक्टोबर २०१४ 


या विषयावरील सर्व लेख 

Wednesday 15 October 2014

नोबेल, गांधी आणि सत्यार्थी!

नोबेल पारितोषिक पावन झाले 

-सूर्यकांत पळसकर 

महात्मा गांधी यांना ६ वेळा नॉमिनेशन मिळूनही नोबेल पारितोषिक नाकारण्याचे पाप नोबेल समितीने केले होते. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल देऊन आता समितीने या पापाचे क्षाळण केले, असे समजायला हरकत नाही. कैलाश सत्यार्थी हे गांधीवादी आहेत. या पूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्युथर किंग, तिबेटींचे नेते दलाई लामा, म्यानमारच्या लोकशाहीवादी  नेत्या ऑन सॉन स्यू की या गांधीवाद्यांना नोबेल मिळाले आहे. पण हे सारे विदेशी होते. कैलाश सत्यार्थी यांच्या रूपाने भारतीय गांधीवाद्यालाही हा पुरस्कार आता मिळाला. एवढे नोबेल मिळविणारा गांधीविचार हा जगातील एकमेव विचार आहे.

१९३७ साली गांधीजींचे पहिल्यांदा नोबेलसाठी नॉमिनेशन झाले. त्यापुढच्या सलग दोन वर्षी त्यांना पुन्हा नॉमिनेशन मिळाले. १९४७ सालीही त्यांना नॉमिनेशन मिळाले. पण प्रत्येकवेळी समितीने त्यांना पारितोषिक नाकारले. गांधी हे विचारांनी "राष्ट्रवादी" आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दैवदुर्विलास पाहा, गांधी हे "राष्ट्रवादी" नाहीत, असा आरोप करीत नथुराम गोडसे याने त्यांची पुढच्याच वर्षी हत्या केली. गांधीजींचे व्यक्तिमत्व इतके बहुआयामी होते की, रुढ विचारांच्या चौकटीत ते बसतच नव्हते. म्हणूनच नोबेलवाल्यांना ते कडवट राष्ट्रवादी वाटत होते, तर हिन्दुत्वाद्यांना ते राष्ट्रवादी वाटतच नव्हते.

गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९४८ साली त्यांना मरणोत्तर नोबेल देण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला होता. पण, त्यात नियम आडवे आले. गांधीजींचा कोणत्याही संघटनेशी कायदेशीरित्या संबंध नव्हता. कोणत्याही संघटनेचे साधे सदस्यत्वही त्यांच्या नावे नव्हते. त्यांच्या मागे कोणतीही संपत्ती नव्हती. कोणत्याही बँकेत खाते नव्हते. त्यांनी मृत्यूपत्र केलेले नव्हते; त्यामुळे त्यांना कोणी रितसर वारसच नव्हता. मग नोबेलचे स्मृतीचिन्ह आणि रक्कम देणार कोणाला? गांधींचे हे नोबेलही हुकले. पण नोबेल समितीने एक केले, त्या वर्षी कोणालाच नोबेल दिले नाही. "शांततेचे नोबेल पारितोषिक देता येईल, असा कोणीही जिवंत माणूस पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही", असे नोबेल समितीने त्या वर्षी जाहीर केले. ही गांधीजींना श्रद्धांजलीच होती.

पण, बरेच झाले, गांधींना नोबेल मिळाले नाही ते. संतवृत्तीने जगलेल्या या महापुरुषाने आयुष्यात सर्व प्रकारच्या लौकिक उपाध्या नाकारल्या. नियतीने त्यांना नोबेलच्या उपाधीपासूनही दूर ठेवले. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल मिळाल्याने गांधीजींच्या विचारांचा विजय झाला आहे. आज नोबेल पारितोषिकही पावन झाले आहे. 

Thursday 2 October 2014

गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

१ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त लोकमतच्या
संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला माझा लेख.… 

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश
देणारी तीन माकडे  गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली
आहेत, हे कोणालाच माहिती नसते.
सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता', व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट' आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथ्यामधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणारया या तिन्ही विचारांत अद्वैैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवन आकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारांवर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढ्याचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअलङ्क या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तकङ्क अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीताङ्क हे पुस्तक आणि ‘सत्यङ्क हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडून घेतला. 

गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २० ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसèया गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.ङ्क 
जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदयङ्क या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी : 
१. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. 
२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे. 
३. साधे अंगमेहनतीचे शेतकèयाचे जीवन हेच खरे जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे।।' हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वतःचा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ।।' असे वचन लिहून जातात. 

तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला. 

‘गीता' आणि ‘अन्टू धिस लास्ट' या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे : 

पापाची वासना नको दावू डोळा।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । 
बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।...

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसèयाच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी. अअर्ध्या  जगावर राज्य असलेल्या इंग्रजांशी लढताना महात्मा गांधी यांनी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला नाही. त्याऐवजी सत्याग्रह आणि उपोषण ही नवी हत्यारे त्यांनी वापरली. ही हत्यारे गांधीजींनी तुकोबांकडूनच घेतली आहेत.  

-सूर्यकांत पळसकर
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)


लोकमतच्या वेब साईटवर लेखाची लिंक :
गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

Friday 2 May 2014

मोहन अब्दूल फर्नांडिस

दुपारी फटफटीवरून घरी परतत होतो. उन्ह असल्यामुळे लवकर घरी पोहोचण्याची घाई होती. एम-२ च्या कोपर्‍यावर एका माणसाने ‘लिफ्ट प्लिज' म्हणून हात दिला. मी गाडी थांबवली. ‘प्लिज ड्रॉप मी अ‍ॅट नेक्स्ट कार्नर', तो इंग्रजीत बोलला. त्याचे उच्चार स्पष्ट आणि सुटे होते. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. औरंगाबादसारख्या छोटा जीव असलेल्या शहरात रस्त्यावर इंग्रजी बोलणारा गृहस्थ भेटणे ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे. 

त्याचा पेहराव मळका पण इंग्रजी होता. पांढर्‍या शर्टचा रंग खाकवट झाला होता. एवढ्या उन्हातही त्याने टाय बांधलेला होता. कोट मात्र काढून हातावर लटकावला होता. डोळ्यांवर जुन्या वळणाचा जाड फ्रेमचा चष्मा होता. चष्म्याच्या दांड्या कानाकडे थोड्या बारीक होत गेल्या होत्या. मिशा बर्‍याचशा फेंदारलेल्या होत्या. केसांत काळे आणि पांढरे अशी बेरड होती. केसांत तेल लावलेले होते. चेहरा घामेजलेला आणि रापलेला होता. 

मी काही न बोलता त्याला फटफटीवर बसवून घेतले. किलोमीटरभर अंतर कापल्यानंतर त्याला उतरावयाचे असलेल्या कोपर्‍यावर त्याने ‘प्लिज स्टॉप' म्हणून गाडी थांबवायला लावली. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे एकमेकांशी काहीच बोललो नव्हतो. तो हातावरचा कोट सांभाळत उतरला. स्पष्ट आणि सुट्या शब्दांत ‘थँक यू' म्हणाला. जाण्यासाठी वळण्यापूर्वी ‘यूवर गुड नेम प्लिज' असे म्हणत त्याने मला नाव विचारले. मी नाव सांगितले. नंतर ‘व्हॉट डू यू डू' म्हणत उद्योगही विचारला. ‘मी पत्रकार आहे', असे मी म्हणालो. ‘ओऽऽ आयसी' असे म्हणत त्याने भुवया उंचावल्या. मग माझ्या पेपरचे नाव विचारून घेतले. सारे संभाषण तो इंग्रजीतूनच करीत होता. 

आता याने एवढी चौकशी केली आहे, तर आपणही काही तरी बोलून निरोप घ्यावा म्हणून त्याला नाव विचारले. तो म्हणाला, ‘मोहन अब्दूल फर्नांडिस.'

त्याचे नाव ऐकून मी त्याच्याकडे चमकून पाहिले. तो मात्र निर्विकार होता. पूर्वीच्याच स्पष्ट आणि सुट्या शब्दांत तो म्हणाला, ‘पीपल ऑलवेज फिल पझल्ड. येस, इट इज रिअली अ स्ट्रेंज नेम. मोहन हे माझे नाव आहे. अब्दूल हे माझ्या वडिलांचे नाव आहे... आणि फर्नांडिस हे आमचे आडनाव आहे.'

‘असे कसे', मी कुतुहलाने विचारले.

तो सांगू लागला, ‘एक्झाक्टली माझी आई हिंदू होती. तिने मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला. पण दोघांनी एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ केली नाही. माझा जन्म झाल्यानंतर आईने माझे नाव मोहन ठेवले. मी ८ वर्षांचा असताना आम्ही सारेच ख्रिस्ती झालो. पण आम्ही आमची नावे बदलली नाही. फक्त आडनाव बदलले. म्हणून माझे नाव मोहन अब्दूल फर्नांडीस असे झाले.'

तो मराठीही स्पष्ट आणि सुट्या शब्दांत बोलत होता. त्याची शब्दांवर पकड होती. मात्र, चेहर्‍यावर कोणतेच भाव नव्हते. इतका निर्विकार मनुष्य मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्याच्याशी बोललेच पाहिजे, असे मला वाटले. माझी गाडी अजून चालूच होती. मी गाडी बाजूच्या झाडाखाली घेऊन बंद केली आणि स्टँडवर लावली. मग आम्ही बोलू लागलो. 

‘तुम्ही काय करता?', मी विचारले.
‘सध्या बेकार आहे. ते कोपर्‍यावरचे दुकान दिसतेय ना, तिथे मुलाखतीसाठी चाललो आहे.' त्याने बोट वळवून दुकान दाखविले. ते फर्निचरचे दुकान होते. त्याचा मालक माझ्या ओळखीचा होता. त्याच्याकडून आम्ही बरीच खरेदी केलेली होती. 
‘फर्निचरच्या दुकानात तुम्ही काय काम करणार?'
‘नो मॅन. एव्हरी वर्क हॅज इटस ओन स्टँडर्ड. माझ्या गरजा फार कमी आहेत. मी एकटाच राहतो. स्वत:च स्वयंपाक करतो. लष्कराने मला ही शिस्त दिली आहे.'

‘लष्कराने म्हणजे?'
‘मिलिटरी. मी मिलिटरीत होतो.' 

कुठल्याही कोनातून पाहिले तरी तो लष्करी सेवेतला माणूस वाटत नव्हता. हा नक्की खोटं बोलत असावा, असे मला वाटले. तो सांगत होता, ‘मी लष्करात धर्मगुरू होतो. दौंडच्या कॅम्पात मी अनेक वर्षे काम केले.'
‘लष्करात धर्मगुरू कसे काय?'
‘लष्करातील जवानांना आपापल्या धर्मानुसार प्रार्थना आणि इतर कर्मे करता यावीत यासाठी व्यवस्था असते. मी ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून तेथे होतो. आय वाज देअर फॉर ख्रिश्चन रेग्यूलर्स.'

ही माहिती मला नवीन होती. लष्करात अशी काही सोय आहे, याची मला माहिती नव्हती. आता माझ्यातील पत्रकार डोकावू लागला होता. मी त्याला विचारले.

‘हॅव यू एव्हर वर्क्ड फॉर मिशनरीज?'
‘एस. आय अ‍ॅम वर्किग फॉर मोअर दॅन २० इअर्स नाऊ.'
‘व्हाय आर यू डुइंग धिस. व्हॉट मेड यू टू प्रॉसेलिटाईज नेटिव्हज?'
‘सॉरी..?'
‘व्हॉट मेड यू टू ट्राय फॉर कन्हर्जन्स?'
‘नो. वुई डोन्ट मेक कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन ईज व्हेरी अग्ली वर्ड. प्रॉपर वर्ड इज प्रोपागेशन. प्रोपागेशन म्हणजे प्रसार.'
‘धर्मांतर हा खरोखरच कुरूप शब्द आहे. पण धर्मांतर करण्याची कृती त्यापेक्षाही कुरूप आहे.' 
‘तुमचे म्हणणे खरे आहे.'
‘मग तुम्ही धर्मांतरे का करता?'
‘मी सांगितले ना, आम्ही धर्मांतरे करीत नाही. आम्ही लोकांना फक्त सत्य सांगतो. सत्यासारखी पवित्र गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही' 
‘ सत्य काय आहे.'
‘सत्य हेच आहे की, येशू हा तारक आहे. त्याला शरण गेल्यानेच मनुष्याचे तारण होणार आहे.'

मोहन अब्दूल फर्नांडीस बोलत होता. त्याचा चेहरा अजूनही निर्विकार होता. शब्द मात्र ठाम आणि निश्चित होते. मी आता थक्क झालो होतो. 

(मोहन अब्दूल फर्नांडीस याच्यासोबत झालेल्या पुढील चर्चेचा वृत्तांत दुसर्‍या लेखात.)

Sunday 9 February 2014

संसद हे मंदिर होते

  • सूर्यकांत पळसकर। दि. १२ (औरंगाबाद)
रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. त्यांची विशेष मुलाखत.... प्रसिद्धी : लोकमत , रवि, १३ मे २०१२ .
रिशंग किशिंग : पहिल्या
लोकसभेचे सदस्य
नाव रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही कार्यकाळातील पाच पिढय़ांचे राजकारण पाहिलेले अनुभव समृद्ध व्यक्तिमत्व. तथापि, एवढीच त्यांची ओळख नाही. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. नवी दिल्लीतील तालकटोरा रोडवरील साध्याशा घरात त्यांचा निवास आहे. भिंतीवर त्यांच्या लग्नाचे एक छायाचित्र दिसते. साधासाच सोफा आणि रोपांच्या काही कुंड्या बैठकीच्या खोलीला घनगंभीर वातावरण निर्माण करून देतात. संसदेच्या विषयीच्या त्यांच्या आठवणी पावन आणि पवित्र आहेत. आज राजकारणाचा आखाडा बनलेली संसद पाहिली की, त्यांना वेदना होतात. आमच्या पिढीतील लोकांच्या दृष्टीने संसद ही नुसतीच इमारत नव्हती. ते मंदिर होते. लोकशाहीच्या या मंदिरात आम्ही श्रद्धनेच पाऊल ठेवायचो, असे ते भक्तिभावाने नमूद करतात. रिशंग कैशिंग यांच्याशी केलेली ही बातचीत.

पहिल्या लोकसभेत काम करण्याचे अत्यंत दुर्मिळ असे भाग्य तुम्हाला लाभले आहे. पहिल्या लोकसभेतील कामकाज आणि आताच्या लोकसभेतील कामकाज यात कोणता फरक तुम्ही पाहता?
- मतभेद हे राजकारणाचे अविभाज्य अंग असते. आज जसे मतभेद आहेत, तसेच ते तेव्हाही होतेच. परंतु, काळाच्या ओघात शिस्त हरवली आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही.

स्वातंत्र्य लढय़ातील दिग्गज नेत्यांसोबत तुम्ही काम केले आहे. त्याबद्दल सांगा.
- मी जेव्हा लोकसभेत दाखल झालो. तेव्हा स्वातंत्र्य लढय़ातील सर्व मोठी नेतेमंडळी लोकसभेत होती. देशाचे पहिले पंतप्रधान प. जवाहरलाल नेहरू, पहिले लोकसभाध्यक्ष जी. व्ही. मावळंकर, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, एन. सी. चटर्जी, आचार्य कृपलानी अशी थोर थोर मंडळी त्यात होती. लोकसभेत प्रवेश करताच मंदिराच्या गाभार्‍यात आल्यासारखे वाटायचे. तसेच गांधीटोपी घातलेले लोकसभाध्यक्ष मंदिरातील संतासारखे वाटायचे. 

लोकसभेत वादाचे प्रसंग तेव्हाही आले असतीलच..
- वादाशिवाय राजकारण नसते. मला आठवते. राज्यांची निर्मिती केली जात होती, तेव्हा लोकसभेत वादळी चर्चा व्हायची. पण त्यात कधी आरडा ओरडा झाल्याचे, गोंधळ झाल्याचे मला आठवत नाही. हा विषय अत्यंत संवेदनक्षम होता. अनेक नेत्यांच्या, खासदारांच्या प्रदेशांचे तुकडे झालेले होते. अनेकांचा प्रदेश इतर राज्यांना जोडला गेलेला होता. गोंधळ करण्यासाठी त्यांना अत्यंत ठोस कारण होते. तरीही याविषयावरच्या सर्व चर्चा शांततेतच पार पडल्या. आता असे चित्र दिसतच नाही. थोडक्या थोडक्या गोष्टींवरून गोंधळ होतात. कामकाज बंद पडते. 

तेव्हा लोकसभाध्यक्ष सदस्यांना कसे शांत करीत ? 
- अध्यक्षांच्या कोणत्याही निर्णयाचा सदस्य आदर करीत. सर्वच सदस्य स्वच्छ ह्रदयाचे होते. सर्वांना एकमेकांविषयी प्रेम होते. सभागृहात वाद झडल्यानंतर आम्ही एकत्र यायचो. सभागृहातील चर्चा आणि भाषणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकली जायची. आताच्या सारख्या शाऊटिंग ब्रिगेड्स तेव्हा सभागृहात नव्हत्याच. घोषणाबाजी आणि वेलमध्ये धावण्याचे प्रकारही अजिबात नव्हते.

तुम्ही राजकारणात कसे काय आलात?
- १९४९ साली मी कोलकत्यातील सेंट पॉल्स कॅथेड्रल कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलो. फायरब्रँड समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या ध्येयवादाने मला प्रेरणा दिली. मी त्यांच्या सोश्ॉलिस्ट पार्टीत सामील झालो. १९५२ साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली. पार्टीने मला बाह्य मनिपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही निवडणूक जिंकून मी लोकसभेत दाखल झालो. 

अलिकडे झटपट पक्ष बदलणारे नेतेही दिसतात. तुमच्या काळीही ते होते का?
- बदल तेव्हाही होत पण ते तात्विकच असत. त्यात स्वार्थ नसे. मी स्वत:ही पक्ष बदलला होता. १९६२ साली मी दुसर्‍यांदा लोकसभेवर निवडून गेलो. ही निवडणूकही मी सोश्ॉलिस्ट पार्टीकडूनच जिंकली. तथापि, त्याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले. माझे मणिपूर हे राज्य चीन सीमेवर असल्यामुळे त्याला जबर धोका होता. अशा परिस्थितीत सरकारचे हात मजबूत असायला हवेत, असे मला जाणवले. त्यामुळे मी तडक प. नेहरूंकडे गेलो. मला काँग्रेसमध्ये प्रवेश द्या, अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी ती मान्य केली. 

तुम्ही इंदिरा गांधींसोबतही काम केले आहे. महिला पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांच्या कारकीर्दीचे वर्णन कसे कराल?
इंदिराजी आपला शब्द पाळित. त्या वचनाच्या पक्क्या होत्या, असे त्यांचे एका ओळीतील वर्णन मी करीन. जनता पक्षाचे सरकार असतानाची गोष्ट आहे. इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध मनिपुरात एक खोटा खटला दाखल करण्यात आला होता. त्यांना समन्स बजावण्यात आले. त्यांना इंफाळला बोलावण्यात आले. तेथे त्यांना तीन दिवस कैदेत राहायचे होते. त्या आल्या. तिकिटांची व्यवस्था करण्याचे काम त्यांनी मलाच सांगितले होते. त्यांनी मनिपुरात जाऊ नये, असे लोकांचे म्हणणे होते. त्या ज्या हॉटेलात थांबल्या होत्या, दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना मनिपूरला जायचे होते. त्यांनी आदल्या संध्याकाळी लोकांना सांगितले की, मी येथेच काही दिवस थांबणार आहे. सकाळी त्या मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडल्या आणि थेट विमानतळावर गेल्या. तेथेही लोक होते. विमानाजवळ येताच त्यांनी अक्षरश: साडी खोचली आणि त्या विमानाच्या दिशेने पळत सुटल्या. 

तुमच्या समाजवादी नेत्यांविषयी काय सांगाल?
जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. हे खरोखरच महान नेते होते. त्यांचेही माझ्यावर आतोनात प्रेम होते. 

तुमचे वय आता ९१ वर्षे झाले आहे, तरीही तुम्ही उत्साहाने काम करता. तुम्हाला ही ऊर्जा कोठून मिळते?
मी स्वत:ला लोकांसाठी सर्मपित केले आहे. लोकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. कर्तव्याची ही जाणीव मला कार्यप्रवण करते. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मला या देशाची सेवा करायची आहे.

Thursday 6 February 2014

सिंगूरच्या ‘ग्राऊंड झीरो'वर

  • सूर्यकांत पळसकर 

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …
सिंगूरचे  रेल्वे स्टेशन.
"… पृथ्वी कोठून आली याच्याशी शेतक-यांना काही कर्तव्य नाही! तिच्या जमिनीची वाटणी कशी झाली हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पृथ्वी स्थिर असो की फिरत, त्यामुळे शेतक-यांच्या जीवनात काय फरक होणार? तुम्हाला हवी तर पृथ्वी लटकावून ठेवा,  नाही तर खिळ्याने ठोकून टाका! शेतक-यांच्या दृष्टीने ती जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे..."  मॅक्झिम गोर्कीची जगप्रसिद्ध कादंबरी ‘आई'मधील हा उतारा. रशियातील बोल्शेविक क्रांतीचे हुंकार म्हणजे ‘आई'! या कादंबरीतील रिबिन नावाचे बंडखोर पात्र एके ठिकाणी वरील उद्गार काढते. डाव्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्क रिबिनच्या या वक्तव्यात आहे. सिंगूरचा दौरा करीत असताना असे असंख्य रिबिन भेटले. त्यांच्या तोंडूनही असाच अंगार बाहेर पडत होता.  ‘शेतक-यांच्या दृष्टीने जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे'  टाटांचा नॅनो प्रकल्प सिंगूरला का उभा राहू शकला नाही, याचे उत्तर या एका वाक्यात मिळते.

सिंगूर येथील टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर असलेला केळीचा फड.
घरावर सावली धरणारी किमान २० फूट उंचीची अशी केळीची झाडे
मी प्रथमच पाहिली. 
प. बंगालमध्ये डावा विचार इतका खोलवर रुजलाय की, राज्याच्या कोणत्याही भागातील मूठभर माती घेऊन कानाला लावली, तर "लाल सलाम, लाल सलाम" असे शब्द कानी पडतील! सिंगूरमधला अनुभवही असाच होता. गावात पोहोचलो तेव्हा घराघरांवर फडफडणा-या लाल बावट्यांनी स्वागत केले. ग्रामीण पेहरावाचे छोटेसे गाव. रापलेला काळा रंग आणि आयुष्यभराच्या कष्टाच्या खाणाखुणा अंगावर मिरविणारी माणसे. नॅनो प्रकल्पाबद्दल राग जसा येथे आढळून आला तसाच हा प्रकल्प उभा राहू शकला नाही या बाबत खंत आणि विषादही आढळून आल्या. टाटांचा प्रकल्प सिंगूरच्या नावे ओळखला जात असला तरी सिंगूर या गावापासून किमान अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर, कोलकता-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प आहे. महामार्गाला लागताच आजूबाजूची पिके शेतीचा सुपीक पोत सांगायला सुरुवात करतात. टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर केळीचा मोठा फड डोलत होता. केळीच्या झाडांची उंची किमान २० फूट होती. घरावर सावली धरणारी केळीची झाडे मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिली. असली शेती कोणता शेतकरी सहजासहजी सोडणार? गोर्कीची आठवण मला येथेच पहिल्यांदा झाली. नंतर या ना त्या कारणांनी गोर्की आठवतच राहिला.

सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाच्या
 प्रवेशद्वारावरील कडक बंदोबस्त. 
नॅनो प्रकल्पासाठी जवळपास १ हजार हेक्टर जमीन प. बंगाल सरकारने अधिगृहित केली होती. सिंगूर परिसरातील १० ते १५ गावांच्या शिवारातली ही जमीन आहे. येथे टाटांचा नॅनो प्रकल्प अर्धवट बांधलेल्या अवस्थेत उभा आहे. आता गेटवर झाडे-झुडपे वाढली आहेत. वातावरणात निर्जीवता आणि विषण्णता  जाणवली. शस्त्रधारी सुरक्षा जवानांचाच काय तो वावर. मुख्य दरवाजावर आम्हाला अडविण्यात आले. ‘आत जाण्यास कोणालाच परवानगी नाही', असे सांगून त्यांनी बंदुकीचा दस्ता उगाचच कुरवाळला. आम्ही काय ते समजलो.

टाटाची कमाई : सायकल स्टँड!
हा प्रकल्प अर्धवट राहिल्यामुळे जमिनी देणा-या गावांची दुर्दशा झाली आहे. या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी हाती घेण्यात आलेली रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. आम्ही एका रिक्षामधून दोबंडी, बाबूरबेरी, बेराबेरी यांसारख्या काही गावांना भेटी दिल्या. सर्वच ठिकाणचे वातावरण सुतकी होते. प्रकल्प उभा राहिला नसला, तरी जमिनी टाटाच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे शेतक-यांना दुहेरी फटका बसला आहे. कसायला जमिनी नाहीत आणि हाताला कामही नाही. ‘तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे' अशी त्यांची अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पोटापाण्यासाठी अनेक लोकांनी गावे सोडली. जे लोक गावांतच थांबले ते कामासाठी कोलकत्यात जातात. या गावांपासून सिंगूर रेल्वे स्टेशन सरासरी ५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. तिथपर्यंत लोक सायकलीने जातात. सायकली सिंगूरमध्ये पार्किंग स्टँडवर लावतात आणि रेल्वेने कोलकत्याला पोहोचतात. सिंगूर गावात सायकली सांभाळणारे असे किमान ५० पार्किंग स्टँड उभे राहिले आहेत. टाटा प्रकल्पाची कमाई काय असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा लोक या स्टँडकडे बोट दाखवतात.

भाकपाच्या हुगळी जिल्हा
कमिटीचा सदस्य माणिक दास
भाकपाच्या हुगळी जिल्हा कमिटीचा सदस्य माणिक दास याचा स्वत:चा एक स्टँड सिंगूर स्टेशनजवळ आहे. त्याची भेट झाली. त्याच्या बोलण्यात आक्रमकता होती. विषाद होता. त्याने सांगितले की, "या भागात आमची (भाकपा आणि माकपा) ताकद होती. इथल्या बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात होत्या. तरीही आंदोलन आमच्या हातून निसटले. अधिगृहित करण्यात आलेल्या जमिनीवर १५ ते २० हजार लोकांची उपजीविका अवलंबून होती. ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नोक-यांची हमी दिली गेली नाही. प्रत्यक्ष टाटाच्या साईटवर काम करणारे मजूरही कंत्राटदारांनी बाहेरून आणलेले होते. जमिनी गेल्या, हाताला कामही नाही, त्यामुळे लोक बिथरले."

लढायचे कोणासाठी?
डावे कार्यकर्तेही नॅनोविरोधातील आंदोलनात सहभागी होते, असे अनेकांनी येथे सांगितले. हे कार्यकर्ते कोण, हे सांगायचे धाडस मात्र कोणीही दाखविले नाही, तसेच हे कार्यकर्तेही उघडपणे समोर आले नाहीत. एक छुपी दहशत येथे दिसून आली. माकपाच्या एका कार्यकर्त्याशी चर्चा झाली.  "तुमचे स्वत:चे कार्यकर्ते का विरोधात गेले", असा थेट प्रश्न मी त्याला विचारला. तो म्हणाला, ‘त्यांच्याही जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. लढायचे कोणासाठी, कुटुंबासाठी की सरकारसाठी, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांनी कुटुंबाची निवड केली."

कुळांचा प्रश्न
माकपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, एके काळी जमिनदार असलेल्या श्रीमंतांच्या जमिनी या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जमिनी स्थानिक कुळे कसतात. टाटासाठी दिलेल्या जमिनींचा मोबदला मूळ मालकांना मिळाला. कुळे निराधारच राहिली. आंदोलन झाले, तेव्हा ही कुळे लढण्यात आघाडीवर होती. कारण त्यांचे सर्वस्व गेले होते.

सिंगूरच्या गावकुसाला असलेल्या बटाट्याच्या
चाळीत काम करणारे मजूर. 
बटाट्याच्या चाळीतला संघर्ष
या परिसरात बटाटा मोठ्या प्रमाणात पिकतो. सिंगूरच्या गावकुसाला बटाट्यांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर आहेत. या चाळींवरही कुळेच राबतात. आम्ही या चाळींची छायाचित्रे घेतली. हे कळताच कंत्राटदारांचे लोक धावून आले. त्यांनी कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मदतनिसाने परिस्थिती निभावून नेली. ‘माझा पाहुणा आहे. हौस म्हणून फोटो काढले',  अशी थाप त्याने मारली. बटाट्याच्या चाळींमध्ये कुळांना बेठबिगारासारखे राबवून घेतले जाते, असे भाकपाचा एक कार्यकर्ता गौतम बॅनर्जी याने सांगितले.

फक्त नॅनोलाच विरोध का?
‘नॅनो फियास्को'नंतर प. बंगालच्या राजकारणाचा गुरुत्त्वमध्य सिंगूरला हलला आहे, असे या दौ-यात जाणवले. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला यश मिळाले. सिंगूर, नंदिग्राम आणि लालगड येथील संघर्षात या निवडणूक निकालाचे मूळ आहे, असे कोलकत्यात तज्ज्ञांशी बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर भाकपाचे प्रदेश सेक्रेटरी मंजू मुजुमदार यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, "सिंगूरच्या परिसरात अनेक उद्योग आहेत. नॅनो प्रकल्पापासून अवघ्या १०-१५ कि.मी. अंतरावर बिर्लांचा ‘हिंदुस्थान मोटर्स' हा कारखाना आहे. तो सुखेनैव चालू आहे. नॅनोला केवळ राजकारण म्हणून विरोध झाला. उद्योगजगतातील टाटांच्या विरोधकांनीही नॅनोविरोधी आंदोलनाला रसद पुरविली"
सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाचे
सुरू न होऊ शकलेले पॉवर स्टेशन. 
प. बंगालात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी होणार आहे. तुमची सलग सत्ता कायम राहील असे वाटते का, असा प्रश्न विचारला त्यावर ठामपणे ‘होय' असे उत्तर देण्याचे मंजू मुजुमदार यांनी टाळले. ते म्हणाले, "क्रांती हे आमचे ध्येय आहे. निवडणूक ही क्रांतीच्या मार्गातील एक लढाई आहे. ती आम्ही लढू".

भाकपाचा ‘होल टाईमर' गौतम बॅनर्जी.
अशा कार्यकत्र्यांच्या बळावरच
प. बंगालमधील  डाव्यांचे साम्राज्य अद्याप
टिकून  आहे. गौतम सोबत होता, म्हणून
 सिंगूर परिसरात मला फिरता आले. 
जमिनींचे काय होणार?
‘दीदींची (ममता बॅनर्जी) सत्ता आल्यावर आम्हाला जमिनी परत मिळणार आहेत", असे प्रकल्पग्रस्त लोक छातीठोकपणे सांगत होते. याविषयी मुजुमदार यांना छेडले. त्यावर ते म्हणाले, "तृणमूलवाल्यांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. १८९४ सालच्या भूसंपादन कायद्यान्वये ही जमीन अधिगृहित करण्यात आली आहे. या कायद्यात जमीन परत करण्याची तरतूदच नाही. जमिनी परत करायच्या असतील, तर केंद्र सरकारला कायदा बदलावा लागेल, तसेच आता जमिनीचे सपाटीकरण झाले आहे. बांधकामे झाली आहेत. ही जमीन शेतीसाठी कशी वापरणार. कोणाची जमीन कुठे होती हे कसे शोधणार"

 प. बंगाल सरकारने नॅनो प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचे अखेर होणार तरी काय, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता. या संपूर्ण दौ-यात त्याचे उत्तर मात्र कोठेच मिळाले नाही. प. बंगालमधील डाव्यांच्या सरकारचे काय होणार हा आणखी एक प्रश्न कोलकता सोडताना मनात येऊन गेला. त्याचे ठोस उत्तर हाती लागले नसले, तरी अंदाज मात्र येत होता. डाव्यांच्या या गडाला मोठे खिंडार पडले आहे. खिंडार पडले की, गड पडायला फार वेळ लागत नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. 

राष्ट्रपिता ही पदवी सरोजिनी नायडूंची देण!

लोकमतच्या रविवार दि. ८ एप्रिल २०१२ रोजीच्या
अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण. 
महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही बिरुदावली कोणी लावली, हा प्रश्न सध्या देशभरात गाजतो आहे. यासंबंधी कोणत्याही प्रकारचा ठोस लिखित पुरावा भारत सरकारकडे उपलब्ध असल्याचे ज्ञात नाही. तथापि, त्या काळातील वरिष्ठ काँग्रेस नेत्या तसेच ‘भारत कोकिळा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींना उद्देशून राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम वापरली, असा एक पुरावा प्रतिनिधीला सापडला आहे.

लखनौ येथील इयात्ता सहावीची विद्यार्थिनी ऐश्वर्या पराशर हिने पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात एक याचिका दाखल करून ‘गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली' अशी माहिती विचारली होती. ही याचिका पंतप्रधान कार्यालयाकने गृहमंत्रालयाकडे पाठविली. नंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडे पाठविण्यात आली. तथापि, या सर्व प्रवासात राष्टड्ढपिता ही बिरुदावली गांधीजींना कोणी लावली, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आमच्याकडील कागदपत्रांद्वारे तुम्हीच संशोधन करा, असे पत्र पुरातत्व विभागाने ऐश्वर्याला पाठविले. शेवटी तिचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी गांधीजींना ही बिरुदावली पहिल्यांदा लावली, असा प्रवाद आहे. या बिरुदावलीचे श्रेय कोणी सुभाषचंद्र बोस यांनाही देतात. तथापि, यासबंधीचा ठोस लिखित पुरावा कोणीही देऊ शकलेले नाही.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी सदर प्रतिनिधीने राज्यातील जुन्या जाणत्या लोकांकडे विचारणा केली, तेव्हा सरोजिनी नायडू यांचे नाव समोर आले. तथापि, त्यासाठी ठोस लिखित पुरावा उपलब्ध नव्हता. जुन्या पुस्तकांत काही उल्लेख सापडू शकतात, हे गृहीत धरून प्रतिनिधीने औरंगाबादेतील फुटपाथवर जुनी पुस्तके विकणा-या लोकांकडे धांडोळा घेतला. तेव्हा, अद्भूत योगायोग जुळून आला आणि प. जवाहरलाल नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या ‘रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज' पुस्तकाच्या मराठी अनुवादाची एक जीर्ण प्रत हाती लागली. महात्मा गांधी यांना सरोजिनी नायडू यांनी राष्ट्रपिता हे संबोधन सर्वप्रथम वापरले, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात मथाई यांनी केला आहे. प्रतिनिधीच्या हाती आलेल्या या पुस्तकाची सुरूवातीची आणि शेवटची काही पाने गायब आहेत. त्यामुळे त्याचा प्रकाशक कोण हे कळू शकलेले नाही.


२८ मार्च १९४७ रोजी मिळाले राष्ट्रपिता संबोधन
गांधीजींना राष्ट्रपिता हे संबोधन कसे प्राप्त झाले, याची माहिती असलेला पुस्तकातील तपशील असा : ब-याच लोकांची अशी कल्पना आहे की, गांधीजींना ‘राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम नेहंनी लावली. ते बरोबर नाही. श्रीमती सरोजिनी नायडूंनी हा शब्दप्रयोग प्रथम आमलात आणला. त्यावेळचा प्रसंग असा : २८ मार्च ते २ एप्रिल १९४७ या काळात नवी दिल्लीत आशियायी परिषद भरली होती. श्रीमती नायडू परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. गांधीजी झपझप पावले टाकीत व्यासपीठाच्या दिशेने येत असताना श्रीमती सरोजिनी नायडूंनी आपल्या पल्लेदार स्वरात त्यांचे आगमन घोषित करताना गांधींचा उल्लेख ‘आमचे राष्ट्रपिता' या शब्दांत केला.

अजोड भक्ती 
सरोजिनी नायडू यांची महात्मा गांधींवरील भक्ती किती अजोड होती, याचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केल्यानंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या शोकाला तर पारावार राहिला नाही. मथाई यांनी लिहिले आहे : शोकसागरात बुडालेल्या काँग्रेसजनांना उद्देशून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, ‘‘अरे बाबांनो, महात्म्याला शोभेल असेच मरण बापूंना आले आहे. वृद्ध होऊन, अपचनासारख्या विकाराने त्यांना मृत्यू यायला हवा होता की काय?'

नेहरुंचा गांधीजींविषयीचा पितृभाव
नेहंनाही महात्मा गांधी यांच्याबद्दल पित्यासमान भक्ती होती. नेहंच्या या भावनेला मथाई ‘फादर कॉम्प्लेक्सङ्क असे नाव देतात. महात्मा गांधी यांच्याजवळ नेहरू आपले मन पूर्णतः रिकामे करीत. एखाद्या लहान मुलाने आपल्या पित्याला आपली सर्व रहस्ये सांगावी, अशी ही भावना होती. शुक्रवार दि. ३० जानेवारी १९५८ रोजी सायंकाळी ५.१७ वा. गांधीजींजी हत्या झाली. नेहरू सैरभैर झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांच्या भावना इतक्या अस्सल आणि उत्कट होत्या की, कोणतीही पूर्व तयारी न करता, नेहंनी आकाशवाणीवरून त्या दिवशी राष्टड्ढाला उद्देशून भाषण केले. त्यांच्या भाषणाचे पहिले वाक्य होते : ‘द लाईट हॅज गॉन आऊट ऑफ अवर लाईफ...' नेहरुंचे हे भाषण याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. पंतप्रधान नेहरू यांचे निवासस्थान १७, यॉर्क रोड हे होते. नेहरुंच्या निवासस्थानातील चूल त्या संध्याकाळी पेटली नाही. नेहरूंपासून नोकरापर्यंत कोणीही त्या रात्री जेवले नाही, अशी माहिती मथाई देतात.

एम. ओ. मथाई यांच्या 'रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज'
या पुस्तकाचे मुखपृष्ठ. या छायाचित्रात 
नेहरूंसोबत मथाई (उभे असलेले) दिसत आहेत.
कोण होते मथाई?
दक्षिण भारतातून आलेले एम ओ मथाई स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील ‘युनायटेड स्टेट्स आर्मीङ्कच्या सेवेत होते. १९४६ साली ते युएस आर्मीचा राजीनामा देऊन नेहंचे स्वीय सहायक म्हणून सेवेत रूजू झाले. ते २४ तास नेहंसोबत असत. नेहंच्या प्रत्येक निर्णयाचे ते साक्षीदार होते, असे मानले जाते. कालांतराने त्यांच्यावर ‘घटनाबाह्य सत्ताकेंद्रङ्क बनल्याचे आरोप झाले. कम्युनिस्टांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे १९५९ साली त्यांनी नेहंच्या स्वीय सहायक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य चेन्नईत घालवले. १९८१ साली वयाच्या ७२ व्या वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले. मथाई यांनी नेहंशी संबंधित दोन पुस्तके लिहिली. १. रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज (१९७८) २. माय डेज विथ नेहरू (१९७८). मात्र ही दोन्ही पुस्तके वादग्रस्त ठरली. त्यात त्यांनी अनेक स्फोटक गोष्टी लिहिल्या होत्या. विशेषतः त्यांचे पहिले पुस्तक सर्वाधिक वादग्रस्त ठरले. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्यावर बंदी घातली.

- सूर्यकांत पळसकर

Thursday 30 January 2014

गांधी भाय!

अफ्रिकेतील कुली लोकेशन्स!

संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस' ने गांधीविचाराचा नवा अवतार जगापुढे पेश केला. एका ‘भाई'ची गांधीगिरी आपण या चित्रपटात पाहिली. पण गांधीजींनाही खरोखरच एकदा ‘भाई' व्हावे लागले होते. याची कहाणी रोचक तशीच हृदयद्रावक आहे. काळ आपले काम करीत असतो. भारतीय समाजाने हजारो वर्षे दीन-दलितांना अस्पृश्य ठेवले. याची किंमत भारतीयांना इंग्रजी राजवटीत चुकवावी लागली. उच्चवर्णीय भारतीय दलितांना अस्पृश्यतेचे चटके देत होते. गोरया इंग्रजांच्या दृष्टीने संपूर्ण भारतीय समाजच अस्पृश्य होता. गांधीजी दक्षिण अफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना या अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. दक्षिण अफ्रिकेत भारतीयांच्या वसाहती वेगळ्या बाजूला काढण्यात आल्या होत्या. त्यांना गोरयांच्या वसाहतीत घर मिळत नसे. या भारतीय वस्त्यांना 'कुली लोकेशन्स' म्हटले जाई. कुली म्हणजे हमाल. असेच एक कुली लोकेशन जोहान्सबर्गमध्ये होते. तेथे भारतीयांनी ९९ वर्षांच्या लीजवर प्लॉट खरेदी केले होते. पुढील काळात जोहान्सबर्गमध्ये येणारे भारतीय याच लोकेशनमध्ये एकवटत गेले. जागा मात्र तेवढीच राहिली. परिणामी येथील घरांत लोक जनावरांसारखे कोंबून कोंबून भरले गेले. ही वसाहत महानगरपालिकेच्या दृष्टीने अस्तित्वात नव्हतीच . तिथे कोणत्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या. गांधीजींनी येथे राहणारया लोकांची तुलना निर्जन बेटावर अडकून पडलेल्या रॉबिन्सन क्रुसोशी केली आहे.१

कमाई न करणारा बॅरिस्टर
महानगरपालिकेच्या ‘क्रिमिनल निग्लिजन्स'मुळे जोहान्सबर्गच्या या कुली लोकेशनची अवस्था अमानवी झाली होती. या वसाहतीला सुविधा पुरविण्याऐवजी महानगरपालिकेने ही वसाहन राहण्यास अयोग्य ठरवून उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक प्रशासनाकडून तसा आदेशही मिळविला. महात्मा गांधी जोहान्सबर्गमध्ये आले तेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर आली. त्यांनी या अस्पृश्य भारतीयांसाठी न्यायालयात खटला लढविण्याचा निर्णय घेतला. गांधीजी बॅरिस्टर होते, तरी पैसे कमावणे हा हेतू त्यांनी कधीच मनात ठेवला नाही; त्यामुळे त्यांनी नाममात्र फीसमध्ये हे खटले चालविले. हा खटला लीज धारकाने जिंकला तर कायद्यानुसार लीजधारकास नुकसान भरपाई आणि न्यायालयीन खर्च मिळणे बंधनकारक होते. खटला जिंकल्यास पालिकेकडून मिळणारा न्यायालयीन खर्च लीज धारकांनी गांधीजींना देण्याचे मान्य केले. तसेच खटल्याचा निकाल काहीही लागला तरी १० पाऊंड गांधीजींना ते देणार होते. फीस अत्यंत कमी असल्यामुळे सर्व लीजधारकांची प्रकरणे गांधीजींकडेच आली. सुमारे ७० खटले गांधीजींनी चालविले. त्यापैकी फक्त एक खटला ते हरले. बाकीचे सर्व जिंकले त्यामुळे त्यांना १,६०० पाऊंडांची भरघोस कमाई झाली. त्यातला अर्धा पैसा गांधीजींनी याच कुली लोकेशनला हॉस्पिटल आणि इतर सोयींसाठी दिला.

गांधीजींच्या या निरिच्छ वृत्तीमुळे या सर्वांनाच गहिवरून आले. त्यांच्यात केवळ वकील आणि पक्षकार असे औपचारिक नाते राहिलेच नव्हते. गांधीजी त्यांच्यातीलच एक बनून गेले होते. या लीजधारकांपैकी एक होते अब्दुल्ला सेठ. खटल्याच्या काळात ते गांधीजींना साहेब कधीच म्हणत नसत. पण नुसतेच 'गांधी' म्हणून अवमानितही करीत नसत. ते त्यांना ‘गांधी भाय' म्हणत. हळूहळू सगळेच लीजधारक गांधीजींना 'भाई' म्हणू लागले. गांधीजी म्हणतात, मी अशा प्रकारे येथील भारतीयांचा ‘भाई' झालो.२

स्वतंत्र भारतातील बिहारी आज पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोप-यात जाताना दिसतात. मुंबईत बिहारींची संख्या खूप मोठी आहे. मुंबईत दक्षिण भारतीयांची संख्याही मोठी आहे. या लोकांना हाकलून लावण्यासाठी ठाकरयांची मुंबईतील हिंसक आंदोलने सर्वज्ञात आहेत. योगायोग पाहा जोहान्सबर्गच्या कुली लोकेशनमध्ये राहणारया भारतीयांत बहुतांश लोक बिहारी होते. तसेच काही जण दक्षिण भारतीय होते! जोहान्सबर्गच्या प्रशासनाने त्यांना हाकलण्याच्या प्रयत्न केला, तर गांधीजींनी त्यांना बेघर होण्यापासून वाचविले. ठाकरे आणि गांधी यांच्यातील हा फरक आहे.

- सूर्यकांत पळसकर, औरंगाबाद.

Tuesday 28 January 2014

अद्भूत ज्योतिषशास्त्र

‘रुद्र कौल तत्तीय' हा ग्रंथ सध्या वाचतो आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रावरील हा ग्रंथ महाराष्ट्री प्राकृतात आहे. त्याचे संस्कृत भाषेत भाषांतर झालेले आहे. संस्कृतातील सूत्र ग्रंथांसारखी याची रचना आहे. ‘रुद्र कौल तत्तीय'च्या प्रभावातूनच संस्कृतातील सूत्र ग्रंथ निर्माण झाले असावेत, असे दिसते. 

रुद्र कौलात ग्रहता-यांचा सूक्ष्म वेध घेतलेला आहे. ‘निर्णयसिन्धू'वरही या ग्रंथाचा प्रभाव आहे, असे जाणवते. आज भारतात ग्रहता-यांवर आधारित ज्योतिषशास्त्रापेक्षा या ग्रंथातील ज्योतिष अगदी भिन्न आहे. 

महाराष्ट्रात कौल लावण्याची जी पद्धत आज अस्तित्त्वात आहे, तिच्याशी ही ज्योतिषपद्धती बरीचशी मिळती जुळती आहे. रुद्र कौल ज्योतिषविद्येचे अवशेष म्हणून कौल लावण्याच्या पद्धतीकडे पाहता येईल. 

रुद्र म्हणजे शिव. शैवांमध्ये कौलमत प्रसिद्धच आहे. प्राचीन महाराष्ट्रात शैवांचा प्रभाव होता. लेण्यांमध्ये कोरलेल्या शिवालायांतून हे दिसून येते. शिव हा आदिम देव आहे. त्याच प्रमाणे रुद्र कौल ज्योतिष हेही सर्वांत जुने ज्योतिषशास्त्र आहे. 

Wednesday 8 January 2014

ट्रेन टू कोलकता

माणूस पायावर नव्हे, पोटावर चालतो!

  • सूर्यकांत पळसकर

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …

कोलकत्याचा मानबिन्दू हावडा पूल. हावडा स्टेशनवरील
 हॉटेलच्या खिडकीतून टिपलेले छायाचित्र.
 ‘वंग आमुचा खरा सहोदर' ही काव्यपंक्ती लहानपणी केव्हा तरी कानांवरून गेलेली. प. बंगालच्या दौ-यासाठी रेल्वेत पाऊल ठेवले तेव्हा ही ओळ अचानक ओठांवर आली. स्वातंत्र्यपूर्व काळात दोन्ही राज्यांतील क्रांतिकारी चळवळ आणि सामाजिक सुधारणांची चळवळ, अशी दुहेरी पाश्र्वभूमी या काव्यपंक्तीला आहे; मात्र गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत काळ बदलला. कोलकत्याच्या हावडा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ही काव्यपंक्ती अजूनही आपला अर्थ टिकवून आहे का, या प्रश्नावर येऊन ठेचकाळलो. पुढे संपूर्ण दौ-यात ठेचकाळतच राहिलो.

'सैन्य पायावर नव्हे, तर पोटावर चालते', असे पूर्वी म्हटले जायचे. हा नियम आता सामान्य माणसालाच जास्त लागू पडतो. ‘माणूस पायावर नव्हे पोटावर चालतो,' हे  कोलकत्याच्या प्रवासात जाणवले. गीतांजली एक्स्प्रेसच्या एस-६ डब्यातून प्रवास करीत होतो. डब्यात बंगाल्यांची संख्या अधिक होती. त्यातही पांढरपेशे अधिक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी नोक-या करणारे हे लोक. माझ्या समोरच्या सीटवर औरंगाबादेतील गादिया विहारमध्ये राहणारे एक कुटुंब होते. मुंबईत नोकरी करणारे नीरज घोष गँगवे जवळच्या आडव्या सीटवर होते. एक कुटुंब भुसावळहून रेल्वेत चढले होते. पोटापाण्यासाठी दोन हजार कि.मी.पेक्षाही जास्त प्रवास करून हे लोक महाराष्ट्रात आले होते; पण घराची, गावाची ओढ सुटलेली नव्हती. उत्तर दिवाळीचा मोसम होता. सुट्या काढून  ते आपल्या गावी चाललेले होते. बंगालातच रोजगार मिळाला असता, तर हे लोक महाराष्ट्रात आले असते? कदाचित नाही.

बदल हवा बदल
गाडीने महाराष्ट्र सोडला. दिवस केव्हाच बुडाला होता. प्रवासी आडवे झाले होते. मीही माझ्या बर्थवर लवंडलो होतो. तरुणांचा एक गट मात्र दंगामस्ती करीत जागा होता. त्यांच्या गटात दोन तरुणीही होत्या. ते बंगाली आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. सहज चौकशी केली तेव्हा कळले की, ते बी.पी.एड.चे विद्यार्थी असून, वर्ध्याच्या चिंतामणी बी.पी.एड. कॉलेजात ते शिकत होते. दिवाळीच्या सुट्यांत ते घरी चालले होते. त्यांच्यातलाच एक सनातन बर्मन. उत्तर बंगालातील दक्षिण दिनाजपूरचा. आयुष्याची स्वप्ने त्याच्या नजरेत होती; पण मनात साशंकता होती. साध्या बी.पी.एड.च्या पदवीसाठी इतक्या दूर का आलास, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, ‘आमच्या उत्तर बंगालच्या सहा जिल्ह्यांत फक्त तीन बी.पी.एड. कॉलेजेस आहेत. तेथे प्रवेश मिळाला नाही.' बंगालात शिक्षण आणि आरोग्याची फार दुरवस्था झाली आहे, अशी त्याची तक्रार होती. आम्ही शिकायला महाराष्ट्रात आलो, तसे इतर राज्यांतील विद्यार्थी बंगालात येतील, तो ‘शोनार दिवस' असेल, असे स्वप्न सनातनने बोलून दाखवले. प. बंगालातील डाव्या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरएसपीचा तो समर्थक होता. क्षिती गोस्वामी हा त्याचा आवडता नेता; पण त्याला ममता बॅनर्जींबद्दल आस्था होती. संपूर्ण बंगालच्या नेत्या म्हणून वावरण्यात ममता कमी पडतात. रेल्वेमंत्री एवढीच त्यांची ‘इमेज' आहे, असे मत त्याने व्यक्त केले. ‘बदल हवा, त्याशिवाय बंगालचा उद्धार होणार नाही,' असे तो कोलकत्यात उतरताना म्हणाला. 

जुन्यांनो दूर व्हा!
सनातन बर्मन बोलण्यात चतुर होता. राजकारणात जाशील का, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला- ‘विचार केला नाही; पण नवीन नेतृत्व उदयास येत नाही, अशी एक तक्रार नेहमी कानावर येते. माझे जुन्यांना एवढेच सांगणे आहे की, तुम्ही बाजूला व्हा, नवे नेते आपोआप तयार होतील!' सनातनचे वक्तव्य म्हणजे डाव्यांसाठी इशारा आहे, असे मला वाटून गेले. 

‘बिहारी' कोलकता
मुनसिन्ग यादव. मूळचा बिहारातील मधुबनीचा
असलेला मुनसिन्ग १९७० सालापासून कोलकत्यात
आहे. असे हजारो बिहारी लोक कोलकत्यात
पोटापाण्यासाठी आलेले आहेत.
कोलकत्यात प्रवास करीत असताना मुनसिंग यादव भेटला. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून आलेला. १९७० साली पोटापाण्यासाठी घर सोडले. कोलकत्यात टॅक्सी चालवतो. ७७ पर्यंत जुटाच्या कारखान्यात नोकरी करायचा. कारखाना बंद पडला, तेव्हापासून टॅक्सीचे स्टिअरिंग हाती आले. गावाकडे पत्नी, ग्रॅज्युएशन करणारा मुलगा, दीड बिघा शेती आणि १ बैल आहे. तो म्हणाला, ‘बिहारातले लोक पोटामागे धावताना भारतभर पांगले आहेत. गावाकडे शेती करायला मजूर मिळत नाही. म्हणून खरीप (जून) आणि रबी (दिवाळी) अशा दोन्ही पेरण्यांच्या वेळी गावाकडे जातो. दिवाळीला गेलो की, पेरणीबरोबरच भाताची काढणीही करून घेतो. बाकी वर्षभर कोलकत्यात असतो. दोन बैल ठेवायला परवडत नाही, म्हणून एकच ठेवलाय. एक शेजा-याचा आहे. बैल महाग झालेत. वर्षभर टॅक्सी चालवली तरी एका बैलाची किंमत वसूल होत नाही.'

१० दिवसांच्या काळात मी कोलकत्यात भरपूर प्रवास केला; परंतु एकही बंगाली टॅक्सीवाला मला भेटला नाही. बहुतांश टॅक्सीवाले बिहार, झारखंडमधून आलेले होते. कोलकत्यात बिहारींची संख्या मोठी आहे. मी तेथे होतो तेव्हा छठ महोत्सव सुरू होता. संपूर्ण कोलकता शहरातील वाहतूक छठवाल्या बिहारी बायकांच्या वाहनांनी ठप्प केलेली होती. एकेदिवशी हावडा पूल ओलांडण्यासाठी मला ४५ मिनिटे लागली, एवढे ट्रॅफिक जॅम होते.

मुंबई-कोलकता कनेक्शन!
छोटू यादव. मुंबईत सागर डान्सबारमध्ये काम करायचा.
डान्सबार बंद झाल्यानंतर कोलकत्यातील हॉटेलात काम करतो.
मी थांबलो होतो त्या ‘भीमसेन हॉटेल'ची इमारत इंग्रजी राजवटीतली होती. ते चालवणारा मालक परप्रांतीय होता, तसेच बहुतांश स्टाफही परप्रांतीयच होता. त्यातलाच एक छोटू यादव. तो पाटणाजवळच्या एका खेड्यातून आलेला. आधी मुंबईत होता. विरार भागात कुठेतरी सागर नावाच्या डान्सबारमध्ये काम करायचा. आर.आर. पाटलांनी डान्सबारबंदी आणली तेव्हा त्याची नोकरी गेली. मुंबईहून त्याने थेट कोलकत्याची ‘ट्रेन' पकडली. ‘मुंबईत होतो तेव्हा चांगली कमाई व्हायची. आता दिवस ढकलतोय', अशी खंत त्याने व्यक्त केली. छोटूचा बाप कोलकत्यातील जुटाच्या कारखान्यात कामाला होता. कारखाना बंद पडल्यानंतर तो गावाकडे परतला. छोटूचे शिक्षण त्यामुळे होऊ शकले नाही. कळायला लागले तेव्हापासून तो पडेल ती कामे करतोय.

मी कोलकता सोडले त्याच्या आदल्या दिवशी छोटूने दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी ट्रेन पकडली. कोलकत्याला येणा-या आणि कोलकता सोडणा-या ट्रेन हाऊसफुल्लच असतात. दोन्ही ट्रेनमधली ही सारी गर्दी ‘पोटा'च्या पायांनी चालत असते; पण दोन्हींत एक सूक्ष्म फरक असतो. कोलकत्यात येणा-यांत छोटू यादव, मुनसिंग यादव यांच्या वर्गातील लोकांची संख्या अधिक असते, तर कोलकता सोडणारे -विशेषत: मुंबईच्या मार्गावर धावणारे लोक- सनातन बर्मन, नीरज घोष यांच्या वर्गातले असतात. हा प्रवास उलटा व्हावा, ही सनातनने व्यक्त केलेली भावना बहुतांश बंगाली माणसांत मला जाणवली. बंगाली राजकारण्यांना ती केव्हा जाणवेल कोणास ठावूक?