Sunday 9 February 2014

संसद हे मंदिर होते

  • सूर्यकांत पळसकर। दि. १२ (औरंगाबाद)
रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. त्यांची विशेष मुलाखत.... प्रसिद्धी : लोकमत , रवि, १३ मे २०१२ .
रिशंग किशिंग : पहिल्या
लोकसभेचे सदस्य
नाव रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही कार्यकाळातील पाच पिढय़ांचे राजकारण पाहिलेले अनुभव समृद्ध व्यक्तिमत्व. तथापि, एवढीच त्यांची ओळख नाही. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. नवी दिल्लीतील तालकटोरा रोडवरील साध्याशा घरात त्यांचा निवास आहे. भिंतीवर त्यांच्या लग्नाचे एक छायाचित्र दिसते. साधासाच सोफा आणि रोपांच्या काही कुंड्या बैठकीच्या खोलीला घनगंभीर वातावरण निर्माण करून देतात. संसदेच्या विषयीच्या त्यांच्या आठवणी पावन आणि पवित्र आहेत. आज राजकारणाचा आखाडा बनलेली संसद पाहिली की, त्यांना वेदना होतात. आमच्या पिढीतील लोकांच्या दृष्टीने संसद ही नुसतीच इमारत नव्हती. ते मंदिर होते. लोकशाहीच्या या मंदिरात आम्ही श्रद्धनेच पाऊल ठेवायचो, असे ते भक्तिभावाने नमूद करतात. रिशंग कैशिंग यांच्याशी केलेली ही बातचीत.

पहिल्या लोकसभेत काम करण्याचे अत्यंत दुर्मिळ असे भाग्य तुम्हाला लाभले आहे. पहिल्या लोकसभेतील कामकाज आणि आताच्या लोकसभेतील कामकाज यात कोणता फरक तुम्ही पाहता?
- मतभेद हे राजकारणाचे अविभाज्य अंग असते. आज जसे मतभेद आहेत, तसेच ते तेव्हाही होतेच. परंतु, काळाच्या ओघात शिस्त हरवली आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही.

स्वातंत्र्य लढय़ातील दिग्गज नेत्यांसोबत तुम्ही काम केले आहे. त्याबद्दल सांगा.
- मी जेव्हा लोकसभेत दाखल झालो. तेव्हा स्वातंत्र्य लढय़ातील सर्व मोठी नेतेमंडळी लोकसभेत होती. देशाचे पहिले पंतप्रधान प. जवाहरलाल नेहरू, पहिले लोकसभाध्यक्ष जी. व्ही. मावळंकर, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, एन. सी. चटर्जी, आचार्य कृपलानी अशी थोर थोर मंडळी त्यात होती. लोकसभेत प्रवेश करताच मंदिराच्या गाभार्‍यात आल्यासारखे वाटायचे. तसेच गांधीटोपी घातलेले लोकसभाध्यक्ष मंदिरातील संतासारखे वाटायचे. 

लोकसभेत वादाचे प्रसंग तेव्हाही आले असतीलच..
- वादाशिवाय राजकारण नसते. मला आठवते. राज्यांची निर्मिती केली जात होती, तेव्हा लोकसभेत वादळी चर्चा व्हायची. पण त्यात कधी आरडा ओरडा झाल्याचे, गोंधळ झाल्याचे मला आठवत नाही. हा विषय अत्यंत संवेदनक्षम होता. अनेक नेत्यांच्या, खासदारांच्या प्रदेशांचे तुकडे झालेले होते. अनेकांचा प्रदेश इतर राज्यांना जोडला गेलेला होता. गोंधळ करण्यासाठी त्यांना अत्यंत ठोस कारण होते. तरीही याविषयावरच्या सर्व चर्चा शांततेतच पार पडल्या. आता असे चित्र दिसतच नाही. थोडक्या थोडक्या गोष्टींवरून गोंधळ होतात. कामकाज बंद पडते. 

तेव्हा लोकसभाध्यक्ष सदस्यांना कसे शांत करीत ? 
- अध्यक्षांच्या कोणत्याही निर्णयाचा सदस्य आदर करीत. सर्वच सदस्य स्वच्छ ह्रदयाचे होते. सर्वांना एकमेकांविषयी प्रेम होते. सभागृहात वाद झडल्यानंतर आम्ही एकत्र यायचो. सभागृहातील चर्चा आणि भाषणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकली जायची. आताच्या सारख्या शाऊटिंग ब्रिगेड्स तेव्हा सभागृहात नव्हत्याच. घोषणाबाजी आणि वेलमध्ये धावण्याचे प्रकारही अजिबात नव्हते.

तुम्ही राजकारणात कसे काय आलात?
- १९४९ साली मी कोलकत्यातील सेंट पॉल्स कॅथेड्रल कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलो. फायरब्रँड समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या ध्येयवादाने मला प्रेरणा दिली. मी त्यांच्या सोश्ॉलिस्ट पार्टीत सामील झालो. १९५२ साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली. पार्टीने मला बाह्य मनिपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही निवडणूक जिंकून मी लोकसभेत दाखल झालो. 

अलिकडे झटपट पक्ष बदलणारे नेतेही दिसतात. तुमच्या काळीही ते होते का?
- बदल तेव्हाही होत पण ते तात्विकच असत. त्यात स्वार्थ नसे. मी स्वत:ही पक्ष बदलला होता. १९६२ साली मी दुसर्‍यांदा लोकसभेवर निवडून गेलो. ही निवडणूकही मी सोश्ॉलिस्ट पार्टीकडूनच जिंकली. तथापि, त्याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले. माझे मणिपूर हे राज्य चीन सीमेवर असल्यामुळे त्याला जबर धोका होता. अशा परिस्थितीत सरकारचे हात मजबूत असायला हवेत, असे मला जाणवले. त्यामुळे मी तडक प. नेहरूंकडे गेलो. मला काँग्रेसमध्ये प्रवेश द्या, अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी ती मान्य केली. 

तुम्ही इंदिरा गांधींसोबतही काम केले आहे. महिला पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांच्या कारकीर्दीचे वर्णन कसे कराल?
इंदिराजी आपला शब्द पाळित. त्या वचनाच्या पक्क्या होत्या, असे त्यांचे एका ओळीतील वर्णन मी करीन. जनता पक्षाचे सरकार असतानाची गोष्ट आहे. इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध मनिपुरात एक खोटा खटला दाखल करण्यात आला होता. त्यांना समन्स बजावण्यात आले. त्यांना इंफाळला बोलावण्यात आले. तेथे त्यांना तीन दिवस कैदेत राहायचे होते. त्या आल्या. तिकिटांची व्यवस्था करण्याचे काम त्यांनी मलाच सांगितले होते. त्यांनी मनिपुरात जाऊ नये, असे लोकांचे म्हणणे होते. त्या ज्या हॉटेलात थांबल्या होत्या, दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना मनिपूरला जायचे होते. त्यांनी आदल्या संध्याकाळी लोकांना सांगितले की, मी येथेच काही दिवस थांबणार आहे. सकाळी त्या मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडल्या आणि थेट विमानतळावर गेल्या. तेथेही लोक होते. विमानाजवळ येताच त्यांनी अक्षरश: साडी खोचली आणि त्या विमानाच्या दिशेने पळत सुटल्या. 

तुमच्या समाजवादी नेत्यांविषयी काय सांगाल?
जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. हे खरोखरच महान नेते होते. त्यांचेही माझ्यावर आतोनात प्रेम होते. 

तुमचे वय आता ९१ वर्षे झाले आहे, तरीही तुम्ही उत्साहाने काम करता. तुम्हाला ही ऊर्जा कोठून मिळते?
मी स्वत:ला लोकांसाठी सर्मपित केले आहे. लोकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. कर्तव्याची ही जाणीव मला कार्यप्रवण करते. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मला या देशाची सेवा करायची आहे.

Thursday 6 February 2014

सिंगूरच्या ‘ग्राऊंड झीरो'वर

  • सूर्यकांत पळसकर 

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …
सिंगूरचे  रेल्वे स्टेशन.
"… पृथ्वी कोठून आली याच्याशी शेतक-यांना काही कर्तव्य नाही! तिच्या जमिनीची वाटणी कशी झाली हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पृथ्वी स्थिर असो की फिरत, त्यामुळे शेतक-यांच्या जीवनात काय फरक होणार? तुम्हाला हवी तर पृथ्वी लटकावून ठेवा,  नाही तर खिळ्याने ठोकून टाका! शेतक-यांच्या दृष्टीने ती जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे..."  मॅक्झिम गोर्कीची जगप्रसिद्ध कादंबरी ‘आई'मधील हा उतारा. रशियातील बोल्शेविक क्रांतीचे हुंकार म्हणजे ‘आई'! या कादंबरीतील रिबिन नावाचे बंडखोर पात्र एके ठिकाणी वरील उद्गार काढते. डाव्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्क रिबिनच्या या वक्तव्यात आहे. सिंगूरचा दौरा करीत असताना असे असंख्य रिबिन भेटले. त्यांच्या तोंडूनही असाच अंगार बाहेर पडत होता.  ‘शेतक-यांच्या दृष्टीने जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे'  टाटांचा नॅनो प्रकल्प सिंगूरला का उभा राहू शकला नाही, याचे उत्तर या एका वाक्यात मिळते.

सिंगूर येथील टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर असलेला केळीचा फड.
घरावर सावली धरणारी किमान २० फूट उंचीची अशी केळीची झाडे
मी प्रथमच पाहिली. 
प. बंगालमध्ये डावा विचार इतका खोलवर रुजलाय की, राज्याच्या कोणत्याही भागातील मूठभर माती घेऊन कानाला लावली, तर "लाल सलाम, लाल सलाम" असे शब्द कानी पडतील! सिंगूरमधला अनुभवही असाच होता. गावात पोहोचलो तेव्हा घराघरांवर फडफडणा-या लाल बावट्यांनी स्वागत केले. ग्रामीण पेहरावाचे छोटेसे गाव. रापलेला काळा रंग आणि आयुष्यभराच्या कष्टाच्या खाणाखुणा अंगावर मिरविणारी माणसे. नॅनो प्रकल्पाबद्दल राग जसा येथे आढळून आला तसाच हा प्रकल्प उभा राहू शकला नाही या बाबत खंत आणि विषादही आढळून आल्या. टाटांचा प्रकल्प सिंगूरच्या नावे ओळखला जात असला तरी सिंगूर या गावापासून किमान अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर, कोलकता-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प आहे. महामार्गाला लागताच आजूबाजूची पिके शेतीचा सुपीक पोत सांगायला सुरुवात करतात. टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर केळीचा मोठा फड डोलत होता. केळीच्या झाडांची उंची किमान २० फूट होती. घरावर सावली धरणारी केळीची झाडे मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिली. असली शेती कोणता शेतकरी सहजासहजी सोडणार? गोर्कीची आठवण मला येथेच पहिल्यांदा झाली. नंतर या ना त्या कारणांनी गोर्की आठवतच राहिला.

सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाच्या
 प्रवेशद्वारावरील कडक बंदोबस्त. 
नॅनो प्रकल्पासाठी जवळपास १ हजार हेक्टर जमीन प. बंगाल सरकारने अधिगृहित केली होती. सिंगूर परिसरातील १० ते १५ गावांच्या शिवारातली ही जमीन आहे. येथे टाटांचा नॅनो प्रकल्प अर्धवट बांधलेल्या अवस्थेत उभा आहे. आता गेटवर झाडे-झुडपे वाढली आहेत. वातावरणात निर्जीवता आणि विषण्णता  जाणवली. शस्त्रधारी सुरक्षा जवानांचाच काय तो वावर. मुख्य दरवाजावर आम्हाला अडविण्यात आले. ‘आत जाण्यास कोणालाच परवानगी नाही', असे सांगून त्यांनी बंदुकीचा दस्ता उगाचच कुरवाळला. आम्ही काय ते समजलो.

टाटाची कमाई : सायकल स्टँड!
हा प्रकल्प अर्धवट राहिल्यामुळे जमिनी देणा-या गावांची दुर्दशा झाली आहे. या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी हाती घेण्यात आलेली रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. आम्ही एका रिक्षामधून दोबंडी, बाबूरबेरी, बेराबेरी यांसारख्या काही गावांना भेटी दिल्या. सर्वच ठिकाणचे वातावरण सुतकी होते. प्रकल्प उभा राहिला नसला, तरी जमिनी टाटाच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे शेतक-यांना दुहेरी फटका बसला आहे. कसायला जमिनी नाहीत आणि हाताला कामही नाही. ‘तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे' अशी त्यांची अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पोटापाण्यासाठी अनेक लोकांनी गावे सोडली. जे लोक गावांतच थांबले ते कामासाठी कोलकत्यात जातात. या गावांपासून सिंगूर रेल्वे स्टेशन सरासरी ५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. तिथपर्यंत लोक सायकलीने जातात. सायकली सिंगूरमध्ये पार्किंग स्टँडवर लावतात आणि रेल्वेने कोलकत्याला पोहोचतात. सिंगूर गावात सायकली सांभाळणारे असे किमान ५० पार्किंग स्टँड उभे राहिले आहेत. टाटा प्रकल्पाची कमाई काय असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा लोक या स्टँडकडे बोट दाखवतात.

भाकपाच्या हुगळी जिल्हा
कमिटीचा सदस्य माणिक दास
भाकपाच्या हुगळी जिल्हा कमिटीचा सदस्य माणिक दास याचा स्वत:चा एक स्टँड सिंगूर स्टेशनजवळ आहे. त्याची भेट झाली. त्याच्या बोलण्यात आक्रमकता होती. विषाद होता. त्याने सांगितले की, "या भागात आमची (भाकपा आणि माकपा) ताकद होती. इथल्या बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात होत्या. तरीही आंदोलन आमच्या हातून निसटले. अधिगृहित करण्यात आलेल्या जमिनीवर १५ ते २० हजार लोकांची उपजीविका अवलंबून होती. ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नोक-यांची हमी दिली गेली नाही. प्रत्यक्ष टाटाच्या साईटवर काम करणारे मजूरही कंत्राटदारांनी बाहेरून आणलेले होते. जमिनी गेल्या, हाताला कामही नाही, त्यामुळे लोक बिथरले."

लढायचे कोणासाठी?
डावे कार्यकर्तेही नॅनोविरोधातील आंदोलनात सहभागी होते, असे अनेकांनी येथे सांगितले. हे कार्यकर्ते कोण, हे सांगायचे धाडस मात्र कोणीही दाखविले नाही, तसेच हे कार्यकर्तेही उघडपणे समोर आले नाहीत. एक छुपी दहशत येथे दिसून आली. माकपाच्या एका कार्यकर्त्याशी चर्चा झाली.  "तुमचे स्वत:चे कार्यकर्ते का विरोधात गेले", असा थेट प्रश्न मी त्याला विचारला. तो म्हणाला, ‘त्यांच्याही जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. लढायचे कोणासाठी, कुटुंबासाठी की सरकारसाठी, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांनी कुटुंबाची निवड केली."

कुळांचा प्रश्न
माकपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, एके काळी जमिनदार असलेल्या श्रीमंतांच्या जमिनी या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जमिनी स्थानिक कुळे कसतात. टाटासाठी दिलेल्या जमिनींचा मोबदला मूळ मालकांना मिळाला. कुळे निराधारच राहिली. आंदोलन झाले, तेव्हा ही कुळे लढण्यात आघाडीवर होती. कारण त्यांचे सर्वस्व गेले होते.

सिंगूरच्या गावकुसाला असलेल्या बटाट्याच्या
चाळीत काम करणारे मजूर. 
बटाट्याच्या चाळीतला संघर्ष
या परिसरात बटाटा मोठ्या प्रमाणात पिकतो. सिंगूरच्या गावकुसाला बटाट्यांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर आहेत. या चाळींवरही कुळेच राबतात. आम्ही या चाळींची छायाचित्रे घेतली. हे कळताच कंत्राटदारांचे लोक धावून आले. त्यांनी कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मदतनिसाने परिस्थिती निभावून नेली. ‘माझा पाहुणा आहे. हौस म्हणून फोटो काढले',  अशी थाप त्याने मारली. बटाट्याच्या चाळींमध्ये कुळांना बेठबिगारासारखे राबवून घेतले जाते, असे भाकपाचा एक कार्यकर्ता गौतम बॅनर्जी याने सांगितले.

फक्त नॅनोलाच विरोध का?
‘नॅनो फियास्को'नंतर प. बंगालच्या राजकारणाचा गुरुत्त्वमध्य सिंगूरला हलला आहे, असे या दौ-यात जाणवले. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला यश मिळाले. सिंगूर, नंदिग्राम आणि लालगड येथील संघर्षात या निवडणूक निकालाचे मूळ आहे, असे कोलकत्यात तज्ज्ञांशी बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर भाकपाचे प्रदेश सेक्रेटरी मंजू मुजुमदार यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, "सिंगूरच्या परिसरात अनेक उद्योग आहेत. नॅनो प्रकल्पापासून अवघ्या १०-१५ कि.मी. अंतरावर बिर्लांचा ‘हिंदुस्थान मोटर्स' हा कारखाना आहे. तो सुखेनैव चालू आहे. नॅनोला केवळ राजकारण म्हणून विरोध झाला. उद्योगजगतातील टाटांच्या विरोधकांनीही नॅनोविरोधी आंदोलनाला रसद पुरविली"
सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाचे
सुरू न होऊ शकलेले पॉवर स्टेशन. 
प. बंगालात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी होणार आहे. तुमची सलग सत्ता कायम राहील असे वाटते का, असा प्रश्न विचारला त्यावर ठामपणे ‘होय' असे उत्तर देण्याचे मंजू मुजुमदार यांनी टाळले. ते म्हणाले, "क्रांती हे आमचे ध्येय आहे. निवडणूक ही क्रांतीच्या मार्गातील एक लढाई आहे. ती आम्ही लढू".

भाकपाचा ‘होल टाईमर' गौतम बॅनर्जी.
अशा कार्यकत्र्यांच्या बळावरच
प. बंगालमधील  डाव्यांचे साम्राज्य अद्याप
टिकून  आहे. गौतम सोबत होता, म्हणून
 सिंगूर परिसरात मला फिरता आले. 
जमिनींचे काय होणार?
‘दीदींची (ममता बॅनर्जी) सत्ता आल्यावर आम्हाला जमिनी परत मिळणार आहेत", असे प्रकल्पग्रस्त लोक छातीठोकपणे सांगत होते. याविषयी मुजुमदार यांना छेडले. त्यावर ते म्हणाले, "तृणमूलवाल्यांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. १८९४ सालच्या भूसंपादन कायद्यान्वये ही जमीन अधिगृहित करण्यात आली आहे. या कायद्यात जमीन परत करण्याची तरतूदच नाही. जमिनी परत करायच्या असतील, तर केंद्र सरकारला कायदा बदलावा लागेल, तसेच आता जमिनीचे सपाटीकरण झाले आहे. बांधकामे झाली आहेत. ही जमीन शेतीसाठी कशी वापरणार. कोणाची जमीन कुठे होती हे कसे शोधणार"

 प. बंगाल सरकारने नॅनो प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचे अखेर होणार तरी काय, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता. या संपूर्ण दौ-यात त्याचे उत्तर मात्र कोठेच मिळाले नाही. प. बंगालमधील डाव्यांच्या सरकारचे काय होणार हा आणखी एक प्रश्न कोलकता सोडताना मनात येऊन गेला. त्याचे ठोस उत्तर हाती लागले नसले, तरी अंदाज मात्र येत होता. डाव्यांच्या या गडाला मोठे खिंडार पडले आहे. खिंडार पडले की, गड पडायला फार वेळ लागत नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. 

राष्ट्रपिता ही पदवी सरोजिनी नायडूंची देण!

लोकमतच्या रविवार दि. ८ एप्रिल २०१२ रोजीच्या
अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण. 
महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही बिरुदावली कोणी लावली, हा प्रश्न सध्या देशभरात गाजतो आहे. यासंबंधी कोणत्याही प्रकारचा ठोस लिखित पुरावा भारत सरकारकडे उपलब्ध असल्याचे ज्ञात नाही. तथापि, त्या काळातील वरिष्ठ काँग्रेस नेत्या तसेच ‘भारत कोकिळा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींना उद्देशून राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम वापरली, असा एक पुरावा प्रतिनिधीला सापडला आहे.

लखनौ येथील इयात्ता सहावीची विद्यार्थिनी ऐश्वर्या पराशर हिने पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात एक याचिका दाखल करून ‘गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली' अशी माहिती विचारली होती. ही याचिका पंतप्रधान कार्यालयाकने गृहमंत्रालयाकडे पाठविली. नंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडे पाठविण्यात आली. तथापि, या सर्व प्रवासात राष्टड्ढपिता ही बिरुदावली गांधीजींना कोणी लावली, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आमच्याकडील कागदपत्रांद्वारे तुम्हीच संशोधन करा, असे पत्र पुरातत्व विभागाने ऐश्वर्याला पाठविले. शेवटी तिचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी गांधीजींना ही बिरुदावली पहिल्यांदा लावली, असा प्रवाद आहे. या बिरुदावलीचे श्रेय कोणी सुभाषचंद्र बोस यांनाही देतात. तथापि, यासबंधीचा ठोस लिखित पुरावा कोणीही देऊ शकलेले नाही.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी सदर प्रतिनिधीने राज्यातील जुन्या जाणत्या लोकांकडे विचारणा केली, तेव्हा सरोजिनी नायडू यांचे नाव समोर आले. तथापि, त्यासाठी ठोस लिखित पुरावा उपलब्ध नव्हता. जुन्या पुस्तकांत काही उल्लेख सापडू शकतात, हे गृहीत धरून प्रतिनिधीने औरंगाबादेतील फुटपाथवर जुनी पुस्तके विकणा-या लोकांकडे धांडोळा घेतला. तेव्हा, अद्भूत योगायोग जुळून आला आणि प. जवाहरलाल नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या ‘रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज' पुस्तकाच्या मराठी अनुवादाची एक जीर्ण प्रत हाती लागली. महात्मा गांधी यांना सरोजिनी नायडू यांनी राष्ट्रपिता हे संबोधन सर्वप्रथम वापरले, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात मथाई यांनी केला आहे. प्रतिनिधीच्या हाती आलेल्या या पुस्तकाची सुरूवातीची आणि शेवटची काही पाने गायब आहेत. त्यामुळे त्याचा प्रकाशक कोण हे कळू शकलेले नाही.


२८ मार्च १९४७ रोजी मिळाले राष्ट्रपिता संबोधन
गांधीजींना राष्ट्रपिता हे संबोधन कसे प्राप्त झाले, याची माहिती असलेला पुस्तकातील तपशील असा : ब-याच लोकांची अशी कल्पना आहे की, गांधीजींना ‘राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम नेहंनी लावली. ते बरोबर नाही. श्रीमती सरोजिनी नायडूंनी हा शब्दप्रयोग प्रथम आमलात आणला. त्यावेळचा प्रसंग असा : २८ मार्च ते २ एप्रिल १९४७ या काळात नवी दिल्लीत आशियायी परिषद भरली होती. श्रीमती नायडू परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. गांधीजी झपझप पावले टाकीत व्यासपीठाच्या दिशेने येत असताना श्रीमती सरोजिनी नायडूंनी आपल्या पल्लेदार स्वरात त्यांचे आगमन घोषित करताना गांधींचा उल्लेख ‘आमचे राष्ट्रपिता' या शब्दांत केला.

अजोड भक्ती 
सरोजिनी नायडू यांची महात्मा गांधींवरील भक्ती किती अजोड होती, याचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केल्यानंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या शोकाला तर पारावार राहिला नाही. मथाई यांनी लिहिले आहे : शोकसागरात बुडालेल्या काँग्रेसजनांना उद्देशून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, ‘‘अरे बाबांनो, महात्म्याला शोभेल असेच मरण बापूंना आले आहे. वृद्ध होऊन, अपचनासारख्या विकाराने त्यांना मृत्यू यायला हवा होता की काय?'

नेहरुंचा गांधीजींविषयीचा पितृभाव
नेहंनाही महात्मा गांधी यांच्याबद्दल पित्यासमान भक्ती होती. नेहंच्या या भावनेला मथाई ‘फादर कॉम्प्लेक्सङ्क असे नाव देतात. महात्मा गांधी यांच्याजवळ नेहरू आपले मन पूर्णतः रिकामे करीत. एखाद्या लहान मुलाने आपल्या पित्याला आपली सर्व रहस्ये सांगावी, अशी ही भावना होती. शुक्रवार दि. ३० जानेवारी १९५८ रोजी सायंकाळी ५.१७ वा. गांधीजींजी हत्या झाली. नेहरू सैरभैर झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांच्या भावना इतक्या अस्सल आणि उत्कट होत्या की, कोणतीही पूर्व तयारी न करता, नेहंनी आकाशवाणीवरून त्या दिवशी राष्टड्ढाला उद्देशून भाषण केले. त्यांच्या भाषणाचे पहिले वाक्य होते : ‘द लाईट हॅज गॉन आऊट ऑफ अवर लाईफ...' नेहरुंचे हे भाषण याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. पंतप्रधान नेहरू यांचे निवासस्थान १७, यॉर्क रोड हे होते. नेहरुंच्या निवासस्थानातील चूल त्या संध्याकाळी पेटली नाही. नेहरूंपासून नोकरापर्यंत कोणीही त्या रात्री जेवले नाही, अशी माहिती मथाई देतात.

एम. ओ. मथाई यांच्या 'रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज'
या पुस्तकाचे मुखपृष्ठ. या छायाचित्रात 
नेहरूंसोबत मथाई (उभे असलेले) दिसत आहेत.
कोण होते मथाई?
दक्षिण भारतातून आलेले एम ओ मथाई स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील ‘युनायटेड स्टेट्स आर्मीङ्कच्या सेवेत होते. १९४६ साली ते युएस आर्मीचा राजीनामा देऊन नेहंचे स्वीय सहायक म्हणून सेवेत रूजू झाले. ते २४ तास नेहंसोबत असत. नेहंच्या प्रत्येक निर्णयाचे ते साक्षीदार होते, असे मानले जाते. कालांतराने त्यांच्यावर ‘घटनाबाह्य सत्ताकेंद्रङ्क बनल्याचे आरोप झाले. कम्युनिस्टांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे १९५९ साली त्यांनी नेहंच्या स्वीय सहायक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य चेन्नईत घालवले. १९८१ साली वयाच्या ७२ व्या वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले. मथाई यांनी नेहंशी संबंधित दोन पुस्तके लिहिली. १. रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज (१९७८) २. माय डेज विथ नेहरू (१९७८). मात्र ही दोन्ही पुस्तके वादग्रस्त ठरली. त्यात त्यांनी अनेक स्फोटक गोष्टी लिहिल्या होत्या. विशेषतः त्यांचे पहिले पुस्तक सर्वाधिक वादग्रस्त ठरले. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्यावर बंदी घातली.

- सूर्यकांत पळसकर