Monday 30 July 2018

राजकारण, धर्मकारण आणि गुन्हेगारी

मानवी समाज हा राजकारण, धर्मकारण आणि गुन्हेगारी या तीन सत्तांनी नियंत्रित होतो. मानवी समाजात या तिन्ही सत्तांचा उदय एकाच वेळी झालेला आहे. राज्य, धर्म आणि गुन्हेगारी यांचा मिळून एक त्रिकोण आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता जुळ््या भावंडांसारख्या आहेत. यांच्यात कोणताच भेद नाही. या दोन्ही सत्तांपासून समान अंतरावर गुन्हेगारी आहे. गुन्हेगारी अशा बिंदूवर आहे, जेथे राज्य आणि धर्म यांच्या रेषा येऊन मिळतात आणि एक त्रिकोण सांधला जातो.

गुन्हेगारांची लंगडी सत्ता
गुन्हेगारी सत्ता ही ‘धाक’ या एकाच पायावर उभी आहे. त्यामुळे ही सत्ता लंगडी आहे. अधुरी आहे. परिपूर्ण नाही. राजकीय आणि धार्मिक सत्तांना मात्र धाक आणि आश्वासन असे दोन पाय आहेत. त्यामुळे या दोन्ही सत्ताच खºया अर्थाने सत्ता आहेत. धाक आणि आश्वासन यांना कोणतीच मर्यादा नसल्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील नेत्यांच्या हाती अमर्याद सत्ता एकवटली आहे. गुन्हेगारांना टिकून राहण्यासाठी नेहमीच राजकीय आणि धार्मिक नेत्यांचा आधार घ्यावा लागला आहे. दाऊद इब्राहिम स्वबळावर जगूच शकत नाही. राजसत्तेचे पाठबळ नसेल, तर त्याचे क्षणात एन्काउंटर होईल.

नरकाचा धाक अन् स्वर्गाचे आश्वासनराजकीय नेत्यांची सत्ता कायद्याचा धाक आणि लोककल्याणाचे आश्वासन यावर चालते. धार्मिक सत्ता नरकाचा धाक आणि स्वर्गाचे आश्वासन यावर चालते. राजकीय नेते कशाचेही आश्वासन देऊ शकतात. आधीचे आश्वासन लोकांनी विसरावे यासाठी दुसरे आश्वासन दिले जाते. भय आणि भूकेपासून देशाला मुक्त करण्याचे आश्वासन देऊन वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर १५-१६ वर्षांनी अशाच आशयाची आश्वासने देऊन मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. पण देश ना भयमुक्त झाला ना भूकमुक्त. उलट संपूर्ण देशावर सध्या भीतीचे सावट आहे. दिल्लीतील ताज्या भूकबळींनी भुकमुक्तीच्या घोषणेचीही पोलखोल केली आहे. गरिबी हटावच्या घोषणा तर या देशातील सर्व राजकीय नेत्यांनी दिल्या आहेत. गरिबी हटविणे हा या घोषणेमागील उद्देश नसतो, त्यांना सरकारला सत्तेवरून हटवायचे असते. संपूर्ण जगात हीच स्थिती आहे. कोणताही देश याला अपवाद नाही. 

सेवा करण्यासाठी कोणाला मंत्रीपद हवे आहे?
राजकीय आणि धार्मिक नेत्यांच्या तोंडी लोककल्याण हा परवलीचा शब्द म्हणजे नुसतेच शब्दांचे बुडबुडे आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी कोणाला मंत्रीपद हवे आहे? सेवाच करायची, तर मंत्रीपदच कशाला हवे? धर्मगुरू आणि पुरोहितांचेही तसेच आहे. यजमानाला पुण्य मिळावे म्हणून कोण भटजी अभिषेकाचे मंत्र म्हणतो? भटजींचा मतलब दक्षिणेपुरता आहे. आपल्याला जवळचे म्हणून भटजींचे उदाहरण दिले. सर्वच धर्मांत हीच स्थिती आहे.

खरोखर लोककल्याणाची तळमळ असलेले राजकीय आणि धार्मिक नेतेही या पृथ्वीतलावर होऊन गेले आहेत. पुढेही होतील. सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा गांधी यांसारखे राजकीय क्षेत्रातील नेते; तर बुद्ध-महावीर, नामेदव-तुकाराम, ख्रिस्त-मोहंमद यांसारखे धार्मिक क्षेत्रातील नेते ही याची काही मोजकी उदाहरणे आहेत. तथापि, असे सच्चे राजकीय-धार्मिक नेते हजार-पाचशे वर्षांतून एकदाच जन्म घेतात. त्यांच्या पश्चात खोटी माणसे पुन्हा या सत्तांचा ताबा घेतात.

खोटेपणाच्या पायावर उभा असलेला धर्म माणसाचे कोणतेही भले करू शकत नाही. राजकारण्यांकडून तर अपेक्षा करणेच चूक आहे.
-सूर्यकांत पळसकर 

Friday 29 June 2018

कच्ची कंध उते काना ऐ

पंजाबी टप्पा

कच्ची कंध उते काना ऐ
मिलणा तां रब नूं है
तेरा पिआर बहाना है।

अर्थ : कच्च्या भिंतीवर एक कावळा बसलेला आहे. भेट तर परमेश्वराची घ्यायची आहे, तुझे प्रेम केवळ एक बहाणा आहे. 

Friday 13 October 2017

उत्तरेतील मराठीचा दिग्विजय!

सूर्यकांत पळसकर

जे इतिहासाला विसरतात, इतिहास त्यांना विसरतो. मराठी भाषिकांचे असेच झाले आहे. आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक इतिहासाबद्दल मराठी भाषिकांएवढा अज्ञानी भाषिक समूह जगात दुसरा सापडणार नाही. भारतात आज बोलल्या जाणा-या भाषांत मराठी एवढा देदिप्यमान इतिहास (आणि कदाचित वर्तमानही) इतर कोणत्याही भाषेला नाही. तरीही दरवर्षी होणा-या साहित्य संमेलनात मराठी जगणार की मरणार याचे वांझोटे चिंतन न विसरता केले जाते. मराठीचा झेंडा पार पाकिस्तान ओलांडून पुढे अफगाणिस्तानापर्यंत फडकत होता, याची माहितीच मराठीच्या पढतपंडितांना नाही. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मराठीची पताका आजही डौलाने फडकत आहे, याचीही जाण त्यांना नाही. पंजाबातील घुमान येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्ताने तरी उत्तरेतील मराठीच्या दिग्विजयाची कहाणी समोर यायला हवी होती. तथापि, असे होताना दिसत नाही. घुमानच्या निमित्ताने उपसला जाणारा इतिहास संत नामदेवांभोवतीच घुटमळत आहे. घुमानला संत नामदेवांची समाधी आहे. त्यामुळेच तेथे संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे स्मरण होणे आवश्यकच आहे. तथापि, मराठी मातीशी सांधा असलेले घुमान हे उत्तरेतील एकमेव ठिकाण नाही. उत्तर भारतात अस्सल मराठमोळ्या महानुभाव पंथाचे प्रचंड मोठे काम आहे.  राजधानी दिल्लीसह, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड या मोठ्या पट्ट्यात महानुभवांचे मठ, आश्रम आणि मंदिरे आहेत. उत्तर प्रदेशातील काशी आणि इतर काही ठिकाणीही पंथाचे अस्तित्व आहे. महानुभाव पंथ उत्तर भारतात जयकृष्णी पंथ म्हणून ओळखला जातो. पंथाचे अनुयायी मराठी भाषिक नाहीत. तरीही पंथाचे रंगरूप मराठीच आहे. पुजाविधान मराठीतच आहे. पंथाचे ग्रंथही मराठीच आहेत. त्यानिमित्ताने या भागात मराठीचा जागर नित्यनेमाने सुरू असतो.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी त्यांच्या अंतिम काळात महानुभाव पंथ उत्तरेत नेला असे मानले जाते. सर्वज्ञांच्या पश्चातही महानुभवांनी पंथप्रसारासाठी मोठे काम केलेले असावे, असे दिसते. अन्यथा आज उत्तरेत पंथाचे अस्तित्व इतक्या व्यापक प्रमाणात दिसले नसते. संत नामदेवांनी महाराष्ट्राचा भक्तिपंथ उत्तरेत नेला. महानुभावांनी मात्र मराठीलाच उत्तरेत नेले. इतकेच नव्हे, तर टिकवूनही ठेवले. पंथाची अधिकृत धर्मभाषा म्हणून मराठीला मान्यता मिळवून दिली. भारतात धर्मभाषा म्हणून मान्यता असलेली संस्कृत हीच एकमेव भाषा समजली जाते. महानुभावांनी मराठीला संस्कृताच्या बरोबरीचे स्थान दिले. बिगर मराठी अनुयायांनीही मराठीचा सन्मानाने स्वीकार केला. हे कार्य अद्वितीय आहे. यासाठी मराठी भाषा महानुभवांच्या सदैव ऋणात राहील.
पामिरच्या पठारापर्यंत
फडकावला मराठीचा झेंडा
सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या अंतिम काळातील हालचालींबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही. तथापि, अंतिम समयी स्वामींनी उत्तरेकडे प्रयाण केले याबाबत सर्वांचे एकमत आहे. स्वामींनी ‘उत्तर पंथे बिजे केले’ असे पंथाचे वाङ्मय सांगते. आख्यायिकेनुसार, सर्वज्ञ प्रवास करीत थेट अफगाणिस्तानात पोहोचले. अंतिम समयी स्वामी अफगाणमधील लाल बदकशान किल्ल्यात होते. स्वामींचा विरह असह्य झाल्यामुळे महाराष्ट्रातील दोन शिष्य त्यांना भेटायला लाल बदकशानमध्ये गेले. तथापि, स्वामींनी त्यांना भेटण्यास नकार दिला. स्वामी भेटतील या आशेवर दोन्ही शिष्य तेथेच मुक्कामी थांबले. स्वामींनी योगबलाच्या साह्याने दोघांची तेथून उचलबांगडी केली. एकाला महाराष्ट्रात आणून टाकले, तर दुस-याला पंजाबात सोडले. महाराष्ट्रातील हा शिष्य पुढे संतोषमुनी कपाटे नावाने, तर पंजाबातील शिष्य कृष्णराज पंजाबी या नावाने प्रसिद्ध झाला. चमत्काराचा भाग वगळता आख्यायिकेतील माहिती इतिहास-भुगोलाशी जुळणारी आहे. बदकशान हा अफगाणिस्तानातील एक प्रांत आहे. ताजिकिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमांना लागून असलेला हा प्रदेश प्राचीन काळापासून मौल्यवान लाल खड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या खड्याला माणिक असेही म्हणतात. इथले लाल खडे जगभरात विक्रीसाठी जात असत. महानुभावांच्या आख्यायिकेत बदकशान प्रांताच्या नावाआधी ‘लाल’ हा शब्द त्यामुळेच आला असावा. हा भाग प्राचीन काळातील रेशीम मार्गावर आहे. व्यापारी तांड्यांच्या प्रवासाचा हा मुख्य मार्ग होता. युरोपात जाण्या-येण्याचाही हा एकच मार्ग त्याकाळी उपलब्ध होता.  सर्वज्ञांच्या प्रवासाशी संबंधित आख्यायिकेला पोषक असेच हे भौगोलिक नेपथ्य आहे. महानुभावांनी आपल्या धर्माची ध्वजा अटकेच्याही पुढे पामिरच्या पठारापर्यंत नेली होती, असे दिसते. पाकिस्तानातही पंथाचे मोठे जाळे होते. कराची आणि रावळपिंडी येथे पंथाची प्रमुख ठाणी होती. फाळणीनंतर हा भाग पंथापासून हळूहळू दुरावला.
लाल बदकशानशी संबंधित आख्यायिकेला लिखित आधार नाही. तथापि, महानुभाव पंथात ही आख्यायिका परंपरेने चालत आली आहे. उत्तर भारतातील पंथाच्या सध्याच्या अस्तित्वाचे पुरावे, या आख्यायिकेला बळकटी देतात. स्वत: चक्रधर स्वामी या भागांत फिरले किंवा नाही, हे सिद्ध करणे कठीण असले तरी, त्यांचे प्रचारक या भागातून फिरले होते, हे निर्विवाद सत्य आहे.
महानुभावांचे वाङ्मय आता हिंदी आणि काही प्रमाणात इंग्रजीतही भाषांतरीत झाले आहे. तथापि, मराठी वाङ्मयाचे महत्त्व कमी झालेले नाही. उत्तर भारतातील सर्व महानुभाव आश्रमांतून मराठी शिकविली जाते. सर्व महंत आणि सेवाधा-यांना मराठी नीट समजते. बोलताही येते! महानुभावांचे उत्तरेतील मठ हे ख-या अर्थाने मराठी भाषा आणि संस्कृतीची मंदिरे आहेत. दुर्दैवाची बाब अशी की, याची माहितीच महाराष्टष्ट्रात कोणाला नाही. पंजाबातील घुमान येथे अखिल मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय झाला तेव्हा केवळ संत नामदेवांचीच आठवण महाराष्ट्राने जागवली. महानुभवांना महाराष्ट्र विसरून गेला. साहित्य संमेलनात तरी हे व्हायला नको. नामदेवांच्या समाधीमुळे पवित्र झालेल्या घुमानची माती महाराष्ट्राने आपल्या भाळावर लावायलाच हवीच; पण उत्तरेत एकच घुमान नाही, याचीही जाण ठेवायला हवी. महानुभाव वाङ्मयाचा घुमानच्या साहित्य संमेलनात योग्य सन्मान व्हायला हवा. ग्रंथदिंडीत महानुभाव ग्रंथा किमान ‘लिळाचरित्रा’चा तरी समावेश व्हायला हवा. एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
दिल्लीसह उत्त्तर भारतात
आजही आहेत महानुभाव मठ
राजधानी दिल्लीत अनेक मुख्य वसाहतींत महानुभवांची मंदिरे आहेत. अशोकनगर, गगनविहार एक्स्टेंशन, करोल बाग, पटेल नगर, प्रितमपुरा, रघुवीरनगर, रघुवीरनगर-गुजराती मोहल्ला, राजापुरी-उत्तमनगर, शक्तिनगर यांचा त्यामध्ये समावेश आहे. चांदणी चौक भागात पंथाचे जुने मंदीर होते. हिमालचल प्रदेशातील सोलन येथे पंथाचे मंदिर आहे. याशिवाय उत्तरेतील कुरुक्षेत्र, करनाल, फरिदाबाद, देहरादून, वृंदावन, सहारणपूर, मीरत, काशी या ठिकाणीही पंथाची मंदिरे आहेत.
पंजाबातील फगवाडा, लुधियाना, कपुरथळा, जालंधर चंदीगड, बटाला, अंबाला, अमृतसर येथे महानुभाव मंदिरे आहेत. उत्तरेतील सर्वाधिक महानुभाव ठाणी पंजाबातच आहेत. त्याखालोखाल क्रमांक लागतो जम्मूचा. जम्मूत महानुभवांची जवळपास १0 मंदिरे आहेत. प्रतापगड, रियासी डाक बंगला, रियासी चौक चबुतरा, वसंतनगर जानीपूर आणि निक्किया येथे ही मंदिरे आहेत.

(सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंजाबातील घुमान येथील साहित्य संमेलनानिमित्त लिहिलेला, पण काही कारणांनी अप्रकाशित राहिलेला लेख)

Saturday 19 August 2017

तुका आकाशा एवढा

अणुरणीया थोकडा,
तुका आकाशा एवढा ॥
अणूरेणूपेक्षा छोटे तरीही आकाशाएवढे मोठे! अफाट कल्पना आहे तकोबांची. पण कविकल्पना नाही. वास्तव आहे. ही माणसाच्या अस्तित्वाची अनुभूती आहे. जन्माच्या आधी माणसाचे अस्तित्व मातेच्या गर्भात अणूएवढेच असते. मृत्यूनंतर ते पुन्हा विश्वाच्या अफाट पसा-यात सूक्ष्म बनून विलीन होऊन होऊन जाते. सूक्ष्म आणि विशाल या दोन्ही अवस्था एकच आहेत. दोन नव्हे.

विज्ञानही हल्ली हीच संकल्पना मांडत आहे. सर्नच्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी अणूंची टक्कर घडवून असे सूक्ष्म कण शोधून काढले जे विश्वाच्या अफाट पसा-याची प्रतिकृती आहेत. त्यांना शास्त्रज्ञांनी "गाॅड पार्टीकल्स" ( God Particles) असे नाव दिले. म्हणजेच जे पिंडी तेच ब्रह्मांडी. जे सूक्ष्म आहे तेच सर्वव्यापी, विशाल आहे. विश्वाची निर्मिती बिगबँगमधून झाली, तेव्हा विश्व अणुएवढेच सूक्ष्म होते. ते नंतर विस्तारत गेले.

माणूस एका खोलीच्या घरात राहू शकतो. पण त्याला मोठ्या घराची आस असते. ऐपत वाढताच तो मोठे घर बांधतो. नंतर तेही त्याला कमी पडते. मग तो आणखी मोठे घर बांधतो. पण कितीही मोठे घर बांधले तरी माणसाचे समाधान होत नाही. राजवाडाही माणसाला कमीच पडतो. कारण माणसाचे अस्तित्व विशाल आहे. संतांचे अस्तित्व तर कुठल्याही महालात, राजवाड्यात मावू शकत नाही. संतांना सामावून घेऊ शकेल, असे घर अजून बांधलेच गेले नाही. संतांना सामावून घेण्यासाठी खुले आकाशच हवे. म्हणून तुकोबा आकाशाएवढे आहेत. म्हणून ज्ञानेश्वर सहजपणे म्हणून जातात -
 हे विश्वची माझे घर,
ऐसी मती जयाची स्थिर,
किंबहुना चराचर,
आपण जाहला ॥

Tuesday 1 December 2015

संत काशीनाथ महाराज यांचे देहावसान

जेजुरी : कोल्हाटी समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे व संत गाडगेमहाराज यांचे शिष्य संत काशीनाथ महाराज यांचे मंगळवारी दुपारी येथील विठ्ठल मंदिरात देहावसान झाले. ते १०० वर्षांचे होते. दुपारी १ वाजता जेजुरीतील विठ्ठल मंदिरातून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचे शिष्य प्रल्हाद लाखे यांनी दिली. बुधवारी सकाळी ९ वाजता महाराजांवर येथील वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१५ आॅगस्ट १९१५ रोजी संत काशीनाथ महाराज ऊर्फ काशीनाथ बयाजी मोहोरकर यांचा जन्म झाला. तत्कालीन कोल्हाटी समाजातील मुलींच्या पायात चाळबंधने, लग्नानंतर कुंकू न लावणे आदी रुढी, तसेच अन्य अंधश्रद्धा त्यांच्या आईला मान्य नसल्याने त्याविरुद्ध आपल्या मुलानेच पुढाकार घ्यावा, अशी तिची इच्छा होती. त्यानुसार काशीनाथ महाराजांनी आजन्म ब्रह्मचारी राहून कोल्हाटी समाजाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम केले. 

त्यांनी संत गाडगेमहाराजांचे १९५० मध्ये पंढरपूर येथे शिष्यत्व स्वीकारले. तेव्हापासून विठ्ठलभक्तीचा मार्ग स्वीकारून काशीनाथ महाराजांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता- शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा-व्यसनाचे दुष्परिणाम आणि देवाचे नामस्मरण समाजाला शिकवले.

जेजुरीत त्यांनी कोल्हाटी समाजाच्या वस्तीमध्येच विठ्ठलाचे भव्य मंदिर उभारून त्या ठिकाणी वारकरी सांप्रदायाचे केंद्र बनविले. स्वत: निरक्षर असूनही त्यांनी समाजामध्ये शिक्षणप्रसारक व समाजसुधारक म्हणून मोठे कार्य केले. अखिल भारतीय कोल्हाटी समाजाने त्यांना राष्ट्रीय संत ही उपाधी २० मे २००७ रोजी हभप किसन महाराज साखरे यांच्या हस्ते बहाल केली.

Wednesday 18 November 2015

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी,
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी ।।धृ।।

पहले आए नाद बिंदु से, पीछे जमया पानी हो जी ।
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ।।१।।

वहां से आया पटा लिखाया, तृष्णा तोउ नै बुझाई बुझाई।।
अमृत छोडसो विषय को धावे, उलटी फांस फंसानी हो जी ।।२।।

गगन मंडल में गौ बियानी, भोई पे दही जमाया जमाया ।
माखन माखन संतों ने खाया, छाछ जगत बपरानी हो जी ।।३।।

बिन धरती एक मंडल दीसे, बिन सरोवर जूं पानी रे ।
गगन मंडलू में होए उजियाला, बोले गुरुमुख बाणी हो जी ।।४।।

ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे ।
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी * ।।५।।

कहत कबीरा सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे **।
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी ।।६।।
................................................................

पाठभेद :  || * सुनता जा बेहरानी हो जी || ** जाग अगम के बानी रे

भजनाचा सोप्या भाषेत अर्थ

संत कबीरांचे हे भजन ‘निर्गुण’ प्रकारात मोडते. भारतातील निर्गुण भक्तीचा प्रवाह प्राचीन असून तो स्वत:च्या देहातच इश्वर शोधण्यास सांगतो. निर्गुणवाद्यांच्या मते, इश्वराला कुठलाही आकार, उकार नाही. तो साध्या डोळ्यांनी दिसत नाही, तरीही तो सर्वव्यापी आहे. त्याची अनुभुती घेता येते. अध्यात्म मार्गातील सर्वोच्च स्थितीला हा पंथ आत्मज्ञान म्हणतो. (योग शास्त्रात या स्थितीला समाधी असे म्हणतात ) कबिरांनी या भजनात हेच आत्मज्ञान सांगितले आहे. "मनुष्य निर्गुण इश्वरापासूनच आलेला असून त्याच्याकडेच त्याला परत जायचे आहे," असे या भजनाचे  सार आहे. भजनातील भाषा प्रतीकांची आहे. भजनाचा अर्थ समजून घेताना आपण प्रथमत: प्रतीकांचा नीट उलगडा करून घेऊ या. नंतर त्यांमागील दडलेला मथितार्थ पाहू या. 

आकाशात सूक्ष्म (झीनी-झीनी) आवाज होत आहे.
हा आवाज केवळ जाणता आणि ज्ञानीच ऐकू शकतो. ।।धृ।।

पहिल्यांदा आलेल्या नादबिंदूमुळे सगळे जलमय झाले. पाणी संपूर्ण घटाला पुरेपूर (आतून आणि बाहेरून) व्यापून राहिले आहे. (म्हणजेच आत-बाहेर सर्वत्र इश्वरच आहे.)  तो अलख पुरुष (म्हणजेच चर्मचक्षूंना न दिसणारा इश्वर) शब्दांत वर्णिता येत नाही. तो निर्बानी म्हणजेच अनिर्वचनीय आहे. (या विश्वाची निर्मिती नादातून म्हणजेच शब्दातून झाली असली तरी तो शब्दांच्या पलीकडला आहे, असे कबिरांना सांगायचे आहे!) ।।१।।

तू तेथूनच (म्हणजेच त्याच निर्बानी इश्वरापासून) आला आहेस. पण पृथ्वीवर आल्यानंतर तू पट नोंदणी केलीस , म्हणजेच नामरूपाची उपाधी धारण केलीस आणि नंतर तृष्णेच्या मागे धावत सुटलास. पण तुझी तृष्णा भागलीच नाही. कारण तू इश्वर भक्तीचे अमृत सेवन करायचे सोडून विषय वासनेच्या मागे धावत सुटलास. या अतृप्तीतून तुला सुटायचे असेल, तर उलट दिशेने मार्ग क्रमण करावे लागेल. म्हणजेच ज्या अलख पुरुषापासून आलास त्याच्याकडे परत जावे लागेल. ।।२।।

आकाशात एक गाय जनली आहे. तिच्या दुधापासून भूमीवर दही जमा झाले. त्या दह्यातून निघालेले लोणी संतांनी खाल्ले, उरलेले जग मात्र ताकच आवडीने ओरपत बसले. (येथे गाय हे प्रकृतीचे प्रतीक आहे. गाय जनली म्हणजे विश्वाची निर्मिती झाली. लोणी हे विश्वातील सत् विचारांचे अथवा भक्तीचे प्रतीक आहे.  ताक हे असत् विचारांचे अथवा विषय वासनेचे प्रतीक आहे. सत् विचारांच्या मार्गानेच अलख पुरुषाकडे जाता येते, असे कबिरांना येथे सांगायचे आहे.) ।।३।।

(अलख पुरुषाकडे जाण्याच्या मार्गावर) धरतीचा आधार नसलेले एक मंडल दिसेल, सरोवराविना पाण्याची अनुभूती येईल. गगन मंडलात प्रकाश दिप्तीमान होईल, असे गुरुंनी सांगून ठेवले आहे. (भक्ती मार्गातील दिव्य अनुभूतीचे हे वर्णन आहे.) ।।४।।

इडा पिंगला आणि सुषुम्ना (सुखमन) या नाड्या जेथे मिळतात त्या सुरम्य त्रिकुट धामावर (दोन्ही डोळ्यांच्या मधील बिंदू ) ‘ओहम् सोहम्’चा ध्वनी होत असतो. तो ऐक आणि अध्यात्म विद्येच्या मार्गातील सर्वोच्च टोकावर तुझा ध्वज फडकाव. ।।५।।

कबीर म्हणतात की, साधूंनो ऐका, मन बुद्धीला अगम्य असलेल्या या स्थितीप्रत पोहोचा. दिवसभरातील एक निमिषभर जरी ही स्थिती दिसली तरी ती अवृद्धत्वाची आणि अमरत्वाची खूण ठरेल. ।।६।।

Sunday 26 July 2015

बाबासाहेब पुरंदरे आणि गोविंद पानसरे

सूर्यकांत पळसकर

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे न सापडणारे मारेकरी या दोन गोष्टी सध्या महाराष्ट्रात गाजत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास लिहिला असा आरोप करून काही संघटना महाराष्ट्रात आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण गाजत असतानाच पानसऱ्यांचे मारेकरी सरकारला सापडले आहेत, मात्र त्यांना अटक करण्याची हिंमत सरकार दाखवित नाही, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पुरंदरे यांचा महाराष्ट्रा भूषण पुरस्कार आणि कॉ. पानसरे यांची हत्या या घटनांचा थेट संबंध नसला तरी त्यांत एक आंतरिक दुवा आहे. पुरंदरे आणि पानसरे हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्ससीम भक्त असून, दोघेही लेखक आहेत. पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती' हे पुस्तक लोकप्रिय आहे, तर पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. खपाच्या बाबतीत दोन्ही पुस्तके तोडीस तोड आहेत. एकाच विषयावर, एकाच राज्यात, एकाच भाषेत आणि एकाच कालखंडात पुस्तके लिहिणारे हे दोन लेखक. एकाची गोळ्या घालून हत्या होते, तर दुस-याला राज्यातील सर्वांत मोठा पुरस्कार मिळतो! असे का व्हावे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी मराठीचा थोडा साहित्यिक इतिहास धुंडाळून पाहू या. 

इतिहास आणि अद्भूत कथा यांविषयीचे महाराष्ट्राला असलेले वेड अचंबित करणारे आहे. आधुनिक मराठी साहित्याच्या उदयकाळीच अद्भूतरम्य आणि ऐतिहासिक कादंब-या निर्माण झाल्या. पुढे त्यांचे स्वतंत्र प्रवाह बनले. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अद्भूतरम्य कादंबरी आणि ऐतिहासिक कादंबरी यांची सीमा रेषा अत्यंत धुसर आहे. भालचंद्र नेमाडे यांनी ऐतिहासिक कादंब-यांना याच एका मुद्यावर कडाडून विरोध केला आहे. नेमाड्यांच्या मते, ‘ऐतिहासिक कादंब-या या ऐतिहासिक नसतातच. त्या अद्भुतरम्यच असतात. या कादंब-यांत इतिहासातील पात्रे नुसतीच नावापुरती असतात. या पात्रांभोवतीचे प्रसंग आणि घटना काल्पनिकच असतात.'  नेमाडे यांनी कादंब-यांविषयीच्या आपल्या प्रबंधात या विषयी सविस्तर लिहिले आहे. नेमाडे यांनी हा प्रबंध लिहिल्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. काळ इतका बदलला आहे की, ऐतिहासिक कादंब-यांनाच इतिहास समजले जाऊ लागले आहे. खरे म्हणजे, रणजीत देसाई यांनी शिवरायांच्या चरित्रावर लिहिलेल्या ‘श्रीमान योगी' या कादंबरीने अशा प्रकारच्या अद्भूतरम्य इतिहासाची सुरुवात आधीच करून दिली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे नेमाड्यांची ‘कोसला' आणि देसायांची ‘श्रीमान योगी' या दोन्ही कादंब-या एकाच कालखंडात प्रसिद्ध झाल्या. अद्भुताचे लेणे लेवून आलेल्या ‘श्रीमान योगी'चा एकूणच थाट राजेशाही होता. तिच्या महागड्या आवृत्त्या निघाल्या. प्रसारमाध्यमांत ती झळकत राहिली. कादंबरी आणि इतिहास यांचे अद्भूत मिश्रण ‘श्रीमान योगी'ने मराठीत निर्माण केले. या उलट कोसलाची स्थिती होती. वास्तवाचा पदर धरून आलेल्या ‘कोसला'च्या नशिबी थाटमाट आला नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी तिला दुर्लक्षून टाकले. ही कादंबरी गरिबाघरचे पोर बनून आली. मात्र हे पोर धडधाकट होते. ते जगले आणि वाढले. ‘श्रीमान योगी'च्या बरोबरीने ‘कोसला'च्याही आवृत्त्या निघत राहिल्या. मराठीच्या सुजान वाचकांची ही कृपा. 

कादंबरी आणि इतिहास यांचे अद्भूतरम्य मिश्रण आणखी नशिले करण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती' या कादंबरीने केले. या मिश्रणात त्यांनी धार्मिकता ओतली. त्यामुळे पुरंदरे यांचे पुस्तक नुसतेच लोकप्रियता, राजमान्यता याचे प्रतिक न राहता अस्मितेचेही प्रतिक बनले. या पुस्तकातील मजकूर इतिहासापेक्षा अद्भूताला अधिक अनुसरतो, या वास्तवाकडे त्यामुळे डोळेझाक झाली. पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सध्या जो वाद सुरू आहे, त्याच्या मुळाशी असलेले हे वास्तव समजून घेतले पाहिजे. मानवी मनाला अद्भूताचे प्रचंड आकर्षण आहे. ‘लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा लोकांना फशी पाडतात. वास्तवात असे काही नसते, हे मग त्यांना पटतच नाही. तानाजीने स्वतःचा प्राण देऊन कोंढाणा किल्ला घेतला हे वास्तव असले तरी त्यात अद्भूत असे काही नाही. लढाईसारखी ती लढाई. पण, या लढाईला ‘यशवंती घोरपडी'ची जोड दिली की, ती अद्भूतरम्य बनते. मनाची पकड घेते. घोरपडीच्या कमरेला दोर बांधून डोंगराचा कडा चढता येणे वास्तवात शक्य नाही, हा विचारही कोणाच्या डोक्यात शिरत नाही. वर नमूद केलेल्या नशिल्या मिश्रणाचा हा परिणाम आहे. वाचकांच्या मनावर ताबा मिळविला की, लेखकाला अंतस्थ हेतूने मनाच्या चार गोष्टी ठोकून देता येतात. पुरंदरे यांनी नेमके हेच केले. त्यांनी उभा केलेला शिवाजी मुस्लिम विरोधी राजकारणाला पुरक होता. राज्यात हिंदुत्ववादी सरकार येताच पुरंदरे यांना महाराष्ट्रा भूषण पुरस्कार जाहीर झाला. शिवचरित्राला दिलेल्या ट्विस्टची पुरंदरे यांना मिळालेली ही बक्षिसी आहे. 

पुरद-यांनी शिवरायांचे जे चित्र उभे केले त्याच्या अगदी विरोधी चित्र पानरस-यांनी उभे केले. पुरंदरे यांचा शिवाजी गो-ब्राह्मण प्रतिपाळक आहे, तर पानसरे यांचा शिवाजी रयतेचा प्रतिपाळक आहे! पानस-यांनी ‘शिवाजी' या नावाभोवती तयार झालेले अद्भूताचे वलय बाजूला सारून वास्तवातला शिवाजी आपल्या पुस्तकात उभा केला. शिवरायांच्या फौजेतच नव्हे, तर अंगरक्षकांच्या ताफ्यातही मुसलमान होते, महाराज आग्य्राहून निसटले तेव्हा त्यांच्या जागी झोपून आपला जीव जोखमीत घालणारा मदारी मेहतर हाही मुसलमानच होता, हे वास्तव पानस-यांनी मांडले. ‘मुस्लिम विरोध' या एकाच तत्त्वावर ज्यांचे समग्र राजकारण उभे आहे, त्यांना असा शिवाजी अगदीच गैरसोयीचा आहे. हे पुस्तक वाचकांत लोकप्रिय असले तरी, माध्यमांत कधी गाजले वाजले नाही. छुप्या पद्धतीने हिंदुत्वाची जातीय भक्ती करणा-या माध्यांनी या पुस्तकालाही ‘कोसला'प्रमाणे दुर्लक्षून टाकले. 

पानस-यांच्या मारेक-यांच्या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी केलेले आरोप अशा व्यापक पाश्र्वभूमीवर तपासून पाहायला हवेत , इतकेच यानिमित्ताने म्हणावेसे वाटते.

जाता जाता...
बाबा पदमनजी यांची ‘यमुना पर्यटन' ही मराठीतील पहिली कादंबरी आहे, तसेच ती मराठीतील पहिली ‘वास्तववादी' कादंबरीही आहे. बाबा पदमनजी हे ख्रिस्ती धर्म प्रसारक होते. हिंदू धर्मातील त्या काळच्या विधवांचा प्रश्न त्यांनी या कादंबरीत मांडला आहे. पदमनजी यांनी ज्या काळी ही कादंबरी लिहिली, त्याकाळी हिंदू धर्माभिमाणी लेखक ‘मोचनगढ' आणि ‘मंजुघोषा' यांसारख्या अद्भूरम्य, काल्पनिक आणि मनोरंजक कादंब-या लिहित होते. वास्तवाकडे पाठ फिरविणे हा आपला स्वभाव धर्म आहे का?
(प्रसिद्धी : लोकमत औरंगाबाद आवृत्ती २६/०७/२०१५)