Wednesday 26 November 2014

शून्य सेनेचे सेनापती!

सूर्यकांत पळसकर

'काळ प्रतिकूल आहे, तोपर्यंत शत्रूला डोक्यावर घेऊन नाचा. काळ अनुकूल होताच त्याला डोक्यावरूनच खाली आपटा', असे चाणक्याचे एक वचन असल्याचे सांगितले जाते. ‘सांगितले जाते, असे विधान यासाठी केले, की त्याची वैधता तपासण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. आपल्याला हवा असलेला विचार कोणा तरी ऐतिहासिक अथवा पौराणिक व्यक्तीच्या नावे खपवला, की त्याला वैधता प्राप्त होत असते! प्राचीन काळापासून ही खपवाखपवी आपल्याकडे सुरू आहे. चाणक्याच्या नावे तर अचाट विचार रोजच्या रोज प्रसृत होत असतात. त्यात भर म्हणजे चाणक्याचे पेटंट आरएसएसच्या नावे आहे. परिवाराचे कुलदैवत असल्यामुळे चाणक्याने सांगितलेल्या मार्गावरून चालणे भाजपासाठी बंधनकारक आहे! हे सारे समजून घेतले, की भाजपा आपल्या मित्रपक्षांना डोक्यापर्यंत उचलून-उचलून का पटक्या देत आहे, याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार नाही; पण चाणक्याची शत्रूविषयक नीती आणि भाजपाची महाराष्ट्रातील राजकीय धोरणे यांचा मेळ घालताना अनेक पट्टीचे स्वयंसेवकही अवघडून गेले आहेत. वर दिलेला चाणक्य विचार हा शत्रूंसाठी आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेपासून शिवसंग्रामपर्यंतचे सर्व मित्रपक्ष काही पाकिस्तानातील नाहीत. मग त्यांना डोक्यावरून उचलून पटकायचे कारण काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा प्रश्नार्थींसाठी चाणक्याने सांगितलेला दुसरा एक विचार उपयुक्त ठरू शकेल. हा विचार म्हणतो, की ‘राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र नाही अन् कायमस्वरूपी शत्रू नाही!' शत्रू काय नुसते पाकिस्तानातच असतात? राजकारणातले विरोधक हे शत्रूच. त्यांच्यासोबत करायचा व्यवहार चाणक्याने सांगितलेल्या नीतीने करण्यातच खरा मुत्सद्दीपणा आहे, असा याचा अर्थ.

परिवारातील थिंक टँकवाले कोणत्याही प्रश्नांनी विचलित होत नाहीत. प्रत्येक कृतीच्या समर्थनार्थ विचारांचा पुरवठा ते करू शकतात. परिवाराच्या थिंक टँकचे सामर्थ्य खरोखरच अचाट आहे. ते बघून साक्षात चाणक्यही स्वर्गात हसला असेल. विशेषतः रिपाइं नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची सध्या जी फजिती सुरू आहे, ती पाहून तर तो खदाखदा हसला असेल. या नेत्यांनी आधीच चाणक्य वाचला असता, तर अशी फसगत वाट्याला आली नसती! खरे म्हणजे, २५ वर्षांपासूनचा जिगरी दोस्त असलेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने झुलवत-झुलवत झुरळासारखे झटकून टाकले, तेव्हाच आठवले-जानकरादी मित्रांनी सावध व्हायला हवे होते; पण तसे घडले नाही. भाजपासोबत महायुती करून त्यांनी निवडणूक लढविली. भाजपाने मोठ्या मनाने (?) त्यांना २५ जागा दिल्या. आठवले यांना त्यातल्या १४ जागा मिळाल्या होत्या. आठवले एवढे जोशात होते, की निवडणुकीनंतर सत्तेवर येणा-या सरकारमध्ये आपणच उपमुख्यमंत्री होणार, अशी घोषणाच त्यांनी करून टाकली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर महादेव जानकर अक्षरशः भारावून गेले होते. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या पहिल्या बैठकीसाठी आले, तेव्हा त्यांनी विधानभवनाच्या पायèयांवर लोटांगण घातले होते. भावनाविवश झाल्याने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते; पण राजकारण हा सर्वाधिक क्रूर खेळ आहे, तो भावनेवर चालत नाही. शिवसेनेला फेकले त्याप्रमाणे आठवले-जानकरादी मित्रांनाही आता भाजपाने फेकून दिले आहे.

मटका आकड्यावर चालतो. लोकशाहीही आकड्यावरच चालते. ज्याचा आकडा मोठा तो शेर. शिवसेनेकडे किमान ६३ आमदारांचा आकडा तरी आहे. त्या बळावर ते विरोधी पक्ष म्हणून का होईना, पण ताठ उभे आहेत. बार्गेनिंगची शक्ती राखून आहेत. आठवले-जानकरादी नेत्यांचे तसे नाही. जानकरांकडे दौंडचे राहुल कुल यांच्या रूपाने एकुलता एक आमदार आहे. आठवले, शेट्टी, मेटे हे शून्य सेनेचे सेनापती ठरले आहेत. त्यांचा एकही आमदार विधानसभेत नाही. आठवले-जानकरादी नेत्यांकडे छोट्या-छोट्या जाती-समूहांची ताकद होती, ती भाजपाला मिळाली. त्यातून भाजपाची विधानसभेतील सदस्यसंख्या ४४ वरून १२२ झाली. याच्या बदल्यात भाजपाची मते मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पारड्यात जायला हवी होती; मात्र ती गेली नाहीत. ही मते मित्रपक्षांऐवजी शिवसेनेच्या उमेदवाराकडे गेली. तेथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

रामदास आठवले यांच्या पक्षाने परवा याबद्दल नाराजी व्यक्त केली; पण त्याचा आता काहीच उपयोग नाही. असल्या नाराज्या हवेच्या झुळकीसरशी उडून जातात. निवडणुकीआधीच आणाभाका पक्क्या करून घ्यायला हव्या होत्या किंवा निवडणूक संपल्यानंतर लगेच या मुद्याला तोंड फोडायला हवे होते; पण सरकारात आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा या नेत्यांना होती. त्या आशेपोटी ते गप्प बसले. ६३ आमदार असतानाही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवणारा भाजपा शून्य सेनेच्या सेनापतींना सत्तेत खरेच वाटा देईल काय?

मित्रपक्ष ही राजकारणातील एक मोठी कटकट आहे, हा नवा विचार भाजपाने आत्मसात केला आहे. हा भाजपाचा अनुभवसिद्ध विचार आहे. वाजपेयी सरकार असल्यापासून मित्रपक्षांची कटकट भाजपा सोशीत आला आहे. त्यापासून मुक्ती मिळवायची, असा त्यांचा आताचा निर्धार दिसतो. मित्रपक्षांकडून शक्ती मिळवून बलवान व्हायचे, हे या निर्धाराला प्रत्यक्षात उतरवायचे सूत्र दिसते. महाराष्टड्ढ विधानसभा निवडणुकीत त्याचेच प्रत्यंतर आले. हे सूत्र वापरताना भाजपाच्या खेळ्या मात्र अत्यंत सावध आहेत. ‘नाही म्हणायचे नाही आणि काही द्यायचेही नाही', अशी ही खेळी आहे. आपल्याला बोल लागणार नाही, याची काळजी मात्र हा पक्ष घेत आहे. मित्रपक्षांना सत्तेत वाटा देणार का, या प्रश्नावर ‘चर्चा सुरू आहे', असे ठेवणीतले उत्तर भाजपा नेत्यांकडून दिले जाते. हा सावधपणाचा भाग आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, या मुख्यमंत्र्यांच्या ताज्या वक्तव्याकडे त्यामुळे सावधपणेच पाहावे लागते.

(प्रसिद्धी : लोकमत २४ नोव्हेंबर २०१४)

Wednesday 12 November 2014

चला, झोपा काढू या.!

सूर्यकांत पळसकर

सरकार बदलल्याने काय होते? राज्यातील सत्ताबदलानंतर निर्माण झालेला हा प्रश्न आहे. सरकारे येतात आणि जातात. लोकांचे प्रश्न आहे तिथेच राहतात. कुठलाही प्रश्न सहजपणो सुटला असे होत नाही. लोकांना संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हीच लोकांची नियती आहे. निद्रिस्त प्रशासन ही लोकशाहीची नियती ठरल्यामुळे संघर्ष अटळ झाला आहे. निद्रिस्त प्रशासनाला जागे कसे करायचे, हा खरा प्रश्न आहे. पैठण तालुक्यातील शेतक:यांनी यावर अनोखा उपाय शोधून काढला. झोपा काढा आंदोलन! पैठण हे गाव जायकवाडी धरणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जायकवाडी हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सध्या धरणात जवळपास 45 टक्के पाणीसाठाही आहे. तरीही धरणाखालील शेतक:यांचे पोहरे रिकामे. प्यायलाही पाणी नाही. जायकवाडीच्या खाली आपेगाव आणि हिरडपुरी ही छोटी धरणो आहेत. जायकवाडीतून सोडलेले पाणी या छोटय़ा धरणांत जाते. तिथून आजूबाजूच्या गावांना मिळते. अगदी सुटसुटीत व्यवस्था. पण प्रशासनाने ती कधीच नीट पार पाडली नाही. यंदाही तेच झाले. पावसाळा उलटून महिना झाला तरी आपेगाव आणि हिरडपुरीसाठी जायकवाडीचे दरवाजे काही उघडले नाही. अर्ज, विनंत्या सारे करून झाले. प्रशासन हलायला तयार नव्हते. त्यावर उपाय म्हणून शेतक:यांनी ‘झोपा काढा आंदोलन’ पुकारले. गोदावरीच्या पाटबंधा:यांची व्यवस्था पाहणा:या कडा कार्यालयासमोर शे-दोनशे शेतकरी चादरी-कांबळी घेऊन विसावले. या आंदोलनाने प्रशासनाची झोप उडविली! दोन दिवसांत पाणी सोडण्याचा आदेश निघाला. हे आंदोलन करणारी शेतकरी संघर्ष समिती आणि समितीचे नेतृत्व करणारे जयाजीराव सूर्यवंशी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ‘लोहा लोहे को काटता है’, असा शोलेतील एक संवाद आहे. पैठणच्या शेतक:यांनी ‘नींद नींद को काटती है’ असा नवा संवाद या निमित्ताने लिहिला आहे.


पैठण आणि गोदावरीचा हा परिसर संतांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. आपेगाव तर साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचे गाव. माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेय, ‘जो रसनेंद्रियाचा अंकिला । का निद्रेसी जीवे विकला । तो नाही एथ म्हणितला । अधिकारिया ।।’ ही ओवी सांगते, जो खाण्याच्या अधीन आहे, जो झोपेला विकला गेला आहे, तो काही खरा अधिकारी म्हणवला जाऊ शकत नाही. माऊलींची ही ओवी ध्यानयोगाच्या अनुषंगाने आली आहे. पण, आपल्या प्रशासकीय व्यवस्थेला ती अगदी तंतोतंत लागू पडते. ही व्यवस्था नजरेसमोर ठेवूनच जणू माऊलींनी ही ओवी लिहिली. प्रशासन हा पैसे खाण्याचा आणि कामे न करता झोपा काढण्याचा उद्योग झाला आहे. शासकीय कार्यालयात बसलेले अधिकारी या उद्योगात प्याद्याचे काम करीत आहेत. या उद्योगाला सुरुंग लावणो अवघड आहे. कारण तो आता एका बलाढय़ व्यवस्थेत रूपांतरित झाला आहे. व्यवस्था ही खरोखरच बलवान असते. मग ती आजची असो अथवा माऊलींच्या काळातील. माऊलींना वाळीत टाकणारे सनातनी एका व्यवस्थेचाच भाग होते. माऊलींनी आळंदीला जड भिंत चालविली, गोदाकाठी रेडय़ाच्या मुखातून वेद बोलविले. पण, याच वेदांचा आधार घेऊन त्यांना छळणा:या व्यवस्थेला ते जागे करू शकले नाहीत. ते जातिबहिष्कृत म्हणून जगले आणि पतितसावित्रिक म्हणून समाधिस्थ झाले. 

शासकीय यंत्रणोच्या चिरनिद्रेचा फटका दुर्बळांना बसतो. आज शेतकरी हा सर्वाधिक दुर्बळ ठरला आहे. त्यामुळे अनास्थेचा पहिला बळी तोच ठरतो. नवे सरकार सत्तेवर येत असताना विदर्भात 6 शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ही आकडेवारी जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील 4; तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एक शेतक:याने आपली जीवनयात्र संपविली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांत येथील शेतक:यांनी भाजपाचे उमेदवार निवडून दिले. भाजपाला केंद्रात आणि राज्यात अशा दोन्ही ठिकाणी सत्ता मिळाली. शेतक:यांना काय मिळाले? गळफास? 

शेतीतील ख:या समस्या समजून घेतल्याशिवाय शेतक:याच्या गळ्यात रुतलेल्या फासाची गाठ सैल होणार नाही. खते आणि बियाणो महाग होत असताना शेतमालाच्या किमती उतरत आहेत. ही शेतीची खरी समस्या आहे. विदर्भ-मराठवाडय़ातील शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके घेतो. या दोन्ही पिकांचे भाव यंदा कोसळले आहेत. गेल्या वर्षी 6 हजार रुपयांच्यावर असलेला कापूस यंदा चार हजारांच्या खाली आला आहे. सत्ता बदलल्याचे हे फळ समजायचे काय? 1995 साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात शेतक:यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले होते. 17 वर्षाच्या मोठय़ा अवकाशानंतर राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे. शेतक:यांत पुन्हा निराशाच दिसून येत आहे. स्वागत कमानींचे गळफास झाले आहेत. शेतक:यांना दिलासा देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागेल. सरकार ते करणार नसेल, तर शेतक:यालाच जागे व्हावे लागेल. पैठणकरांनी आंदोलन आणखी सोपे करून दिले आहे. चादरी आणि कांबळी घेऊन मंत्रलयासमोर झोपा काढायला शेतक:यांनी तयार राहिले पाहिजे. 

नेतृत्वाची पोकळी हे महाराष्ट्रातील शेतीच्या अधोगतीचे प्रमुख कारण असावे. महाराष्ट्रातील शेतक:यांना राज्यव्यापी आवाका असलेला नेताच आजवर मिळालेला नाही. शरद जोशी यांनी शेतक:यांना नेतृत्व देण्याचा प्रय} केला. पण, त्यांचे लक्ष नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांवरच केंद्रित राहिले. त्यांच्यापासून फुटून बाहेर पडलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नजर उसाच्या पलीकडे गेली नाही. आता तर स्वाभिमानीवाल्यांनी भाजपाशी पाट लावून शेतीच्या प्रश्नांपासून फारकतच घेतली आहे. वरील सा:याच नेत्यांचा आवाका छोटा होता. जी काही आंदोलने झाली, ती ऊस आणि द्राक्षांपुरतीच मर्यादित होती. विदर्भ मराठवाडय़ातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक:यांना कोणीही नेता नव्हता. आजही नाही.

Monday 3 November 2014

रमाबाईनगर ते जवखेडे

सूर्यकांत पळसकर 


ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे. ‘पै पायी काटा नेहटे । तव व्यथा जीवी उमटे । तैसा पोळे संकटे । पुढिलांचेनी ।।’ काटा पायात घुसतो, अश्रू मात्र डोळ्यांत येतात आणि जीव तळमळतो, त्याचप्रमाणे सज्जन मनुष्य दुसऱ्याची दु:खे पाहून तळमळतो. सामाजिक समतेच्या वर्णनासाठी यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण सापडणार नाही. नगर जिल्ह्यातील नेवासे येथे बसून माऊलींनी ही ओवी लिहिली. तोच नगर जिल्हा सध्या जवखेडे खालासा येथील दलित कुटुंबाच्या हत्याकांडाने गाजतो आहे. भर दिवाळीत हे हत्याकांड घडले. येथील संजय जाधव त्यांची पत्नी जयश्री आणि त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुनील यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. हे हत्याकांड इतके निर्घृण आहे की, क्रौर्याच्या साऱ्या उपमा येथे थिट्या पडाव्यात. लज्जेलाही लाज वाटावी अशी ही घटना; पण तिने महाराष्ट्राच्या पोटातील पाणी हलले नाही. दिवाळीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. फटाके उडत राहिले. फराळाची ताटे सजत राहिली. दलित समाजामधून निषेधाचे क्षीण सूर उमटले. उरलेल्या मराठी समाजाच्या मनावर साधा ओरखडाही उमटला नाही. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला ‘दुसऱ्यांच्या संकटांनी पोळणारा’ सज्जनपणा कुठे आहे? की त्याचाही खून झाला आहे?

जवखेडे हत्याकांडानंतर महाराष्ट्राने दाखविलेल्या कोरड्या ढिम्मपणाच्या पार्श्वभूमीवर निर्भया हत्याकांडानंतर उठलेल्या गदारोळाची आठवण टचटचीतपणे समोर येते. महाराष्ट्रापासून दीड हजार किमी दूर असलेल्या दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या देशव्यापी आक्रोशात महाराष्ट्रातील झाडून सारी माध्यमे सहभागी झाली होती. चकचकीतपणा मिरविणारा मराठी मध्यमवर्ग हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरला होता. ही माध्यमे आणि मेणबत्त्यावाले आता कुठे आहेत? दीड हजार किलोमीटर अंतरावरील निर्भयाचा आवाज ऐकून विव्हळ होणाऱ्या मराठी माणसाला आपल्याच गावकुसावरील जवखेडेचा आवाज ऐकू आला नाही. कारण, ही माणसे दलित होती. जगण्याचे जाऊच द्या, मृत्यूची किंमतही येथे समान नाही.


जवखेडेच्या निमित्ताने एक क्रूर योगायोग जुळून आला आहे. ११ जुलै १९९७ रोजी मुंबईच्या घाटकोपर भागातील रमाबाई नगरात दलित हत्याकांड झाले होते. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करणाऱ्या दलितांवर राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी बेछुट गोळीबार केला होता. त्यात १0 दलित ठार झाले होते, तर २६ जखमी झाले होते. ही घटना घडली तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. जवखेडे येथील घटना घडली तेव्हा भाजपाचे सरकार सत्ता हाती घेत आहे. एक विखारी वर्तुळ पूर्ण झाले आहे. या वर्तुळाला रमाबाई नगर आणि जवखेडे असे दोनच बिंदू आहेत, असे मात्र नव्हे. खैरलांजीसह अनेक बिंदूंनी हे वर्तुळ व्यापले आहे. प्रत्येक बिंदूवर क्रौर्याची परिसीमाच दिसून येते.

१९९७ ते २0१४ या सतरा वर्षांच्या काळात महाराष्ट्राने अनेक बदल पाहिले. महाराष्ट्राचे राजकारण, तर पूर्ण ३६0 अंशांत फिरले आहे. रमाबाईनगरातील हत्याकांड घडले तेव्हा दलित संघटना या शिवसेना-भाजपा युतीच्या विरोधात होत्या. आज आठवले यांच्या रूपाने दलित संघटनांमधील एक मोठा घटक भाजपासोबत आहे. दोन निवडणुका त्यांनी एकत्रित लढल्या आणि जिंकल्या आहेत. राज्यात सत्ताबदलही झाला; पण दलितांचे दु:ख मात्र बदलले नाही. अस्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेसारखे ते भळभळतच आहे. जवखेडे खालसा हत्याकांड ही या जखमेची ताजी चिळकांडी आहे. रमाबाई नगरातील हत्याकांडात पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. जवखेडे खालसा प्रकरणात त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही मान्यवर नागरिकांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून तरी हेच वास्तव समोर येत आहे. राज्यात भाजपा सरकारच्या शपथविधीच्या दिवशीच हा अहवाल वर्तमानपत्रांच्या पानांवर झळकला. जवखेडेमधील जाधव कुटुंबाच्या हत्येशी संबंधित आरोपी स्थानिक भाजपा आमदारांचे जवळचे नातेवाईक असल्याने पोलीस कारवाई करण्यास कचरत आहेत, असा स्पष्ट ठपका समितीने ठेवला आहे. नगरचे शिवसेना जिल्हा उपप्रमुखही आरोपींचे जवळचे नातेवाईक असल्याचे समितीने म्हटले आहे. हा अहवाल देणारी नागरी सत्यशोधन समिती सरकारने स्थापन केलेली नाही. त्यामुळे तिला वैधानिक अधिकार नसला, तरी नैतिक अधिकार नक्कीच आहे. समितीवरील सदस्यांची नावे पाहिली, समितीचे नैतिक वजन लक्षात येईल. प्रख्यात साहित्यिक रंगनाथ पाठारे हे समितीवर आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, उत्तम जहागिरदार, सुधाकर कश्यप, फिरोज मिठीबोरवाला, अंजन वेलदूरकर, बेला साखरे यांसारखी समाजाच्या सर्व स्तरांतील मंडळी समितीवर आहे. गावाला भेट देऊन समितीने आपला अहवाल तयार केला आहे. त्याची दखल नव्या सरकारला घ्यावी लागेल. आपली माणसे म्हणून कोणालाही माफी देता येणार नाही.

१९९७च्या रमाबाई नगर हत्याकांडाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधाची धार होती. ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे’ हा शिवसेना-भाजपा युती सरकारच्या अजेंड्यावरील एक प्रमुख मुद्दा होता. हा कायदा रद्द करण्यासाठी युती सरकारने निकराचे प्रयत्नही करून पाहिले. तथापि, जनरेट्यामुळे ते यशस्वी झाले नाहीत. कायदा कायम राहिला; पण त्यामुळे परिस्थिती बदलली नाही. कायदा कायम राहिला म्हणून दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा चिंतेचा मुद्दा आहे; पण सर्वच कायद्यांचा गैरवापर होत आला आहे. मग सगळेच कायदे रद्द करणार का? अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणी मागील कारणे विषमतेत रुतलेली आहेत. इथल्या मातीलाच विषमतेचा वास आहे. या वासाने नगरला माऊलींची ओवी घुसमटली. ही घुसमट इथल्या संपूर्ण समाजाची घुसमट ठरेल, त्या दिवशी समानतेची पहाट उगवेल. तोपर्यंत जवखेडेमागून जवखेडे घडत राहतील.
 (लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)