Wednesday 18 November 2015

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी,
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी ।।धृ।।

पहले आए नाद बिंदु से, पीछे जमया पानी हो जी ।
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ।।१।।

वहां से आया पटा लिखाया, तृष्णा तोउ नै बुझाई बुझाई।।
अमृत छोडसो विषय को धावे, उलटी फांस फंसानी हो जी ।।२।।

गगन मंडल में गौ बियानी, भोई पे दही जमाया जमाया ।
माखन माखन संतों ने खाया, छाछ जगत बपरानी हो जी ।।३।।

बिन धरती एक मंडल दीसे, बिन सरोवर जूं पानी रे ।
गगन मंडलू में होए उजियाला, बोले गुरुमुख बाणी हो जी ।।४।।

ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे ।
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी * ।।५।।

कहत कबीरा सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे **।
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी ।।६।।
................................................................

पाठभेद :  || * सुनता जा बेहरानी हो जी || ** जाग अगम के बानी रे

भजनाचा सोप्या भाषेत अर्थ

संत कबीरांचे हे भजन ‘निर्गुण’ प्रकारात मोडते. भारतातील निर्गुण भक्तीचा प्रवाह प्राचीन असून तो स्वत:च्या देहातच इश्वर शोधण्यास सांगतो. निर्गुणवाद्यांच्या मते, इश्वराला कुठलाही आकार, उकार नाही. तो साध्या डोळ्यांनी दिसत नाही, तरीही तो सर्वव्यापी आहे. त्याची अनुभुती घेता येते. अध्यात्म मार्गातील सर्वोच्च स्थितीला हा पंथ आत्मज्ञान म्हणतो. (योग शास्त्रात या स्थितीला समाधी असे म्हणतात ) कबिरांनी या भजनात हेच आत्मज्ञान सांगितले आहे. "मनुष्य निर्गुण इश्वरापासूनच आलेला असून त्याच्याकडेच त्याला परत जायचे आहे," असे या भजनाचे  सार आहे. भजनातील भाषा प्रतीकांची आहे. भजनाचा अर्थ समजून घेताना आपण प्रथमत: प्रतीकांचा नीट उलगडा करून घेऊ या. नंतर त्यांमागील दडलेला मथितार्थ पाहू या. 

आकाशात सूक्ष्म (झीनी-झीनी) आवाज होत आहे.
हा आवाज केवळ जाणता आणि ज्ञानीच ऐकू शकतो. ।।धृ।।

पहिल्यांदा आलेल्या नादबिंदूमुळे सगळे जलमय झाले. पाणी संपूर्ण घटाला पुरेपूर (आतून आणि बाहेरून) व्यापून राहिले आहे. (म्हणजेच आत-बाहेर सर्वत्र इश्वरच आहे.)  तो अलख पुरुष (म्हणजेच चर्मचक्षूंना न दिसणारा इश्वर) शब्दांत वर्णिता येत नाही. तो निर्बानी म्हणजेच अनिर्वचनीय आहे. (या विश्वाची निर्मिती नादातून म्हणजेच शब्दातून झाली असली तरी तो शब्दांच्या पलीकडला आहे, असे कबिरांना सांगायचे आहे!) ।।१।।

तू तेथूनच (म्हणजेच त्याच निर्बानी इश्वरापासून) आला आहेस. पण पृथ्वीवर आल्यानंतर तू पट नोंदणी केलीस , म्हणजेच नामरूपाची उपाधी धारण केलीस आणि नंतर तृष्णेच्या मागे धावत सुटलास. पण तुझी तृष्णा भागलीच नाही. कारण तू इश्वर भक्तीचे अमृत सेवन करायचे सोडून विषय वासनेच्या मागे धावत सुटलास. या अतृप्तीतून तुला सुटायचे असेल, तर उलट दिशेने मार्ग क्रमण करावे लागेल. म्हणजेच ज्या अलख पुरुषापासून आलास त्याच्याकडे परत जावे लागेल. ।।२।।

आकाशात एक गाय जनली आहे. तिच्या दुधापासून भूमीवर दही जमा झाले. त्या दह्यातून निघालेले लोणी संतांनी खाल्ले, उरलेले जग मात्र ताकच आवडीने ओरपत बसले. (येथे गाय हे प्रकृतीचे प्रतीक आहे. गाय जनली म्हणजे विश्वाची निर्मिती झाली. लोणी हे विश्वातील सत् विचारांचे अथवा भक्तीचे प्रतीक आहे.  ताक हे असत् विचारांचे अथवा विषय वासनेचे प्रतीक आहे. सत् विचारांच्या मार्गानेच अलख पुरुषाकडे जाता येते, असे कबिरांना येथे सांगायचे आहे.) ।।३।।

(अलख पुरुषाकडे जाण्याच्या मार्गावर) धरतीचा आधार नसलेले एक मंडल दिसेल, सरोवराविना पाण्याची अनुभूती येईल. गगन मंडलात प्रकाश दिप्तीमान होईल, असे गुरुंनी सांगून ठेवले आहे. (भक्ती मार्गातील दिव्य अनुभूतीचे हे वर्णन आहे.) ।।४।।

इडा पिंगला आणि सुषुम्ना (सुखमन) या नाड्या जेथे मिळतात त्या सुरम्य त्रिकुट धामावर (दोन्ही डोळ्यांच्या मधील बिंदू ) ‘ओहम् सोहम्’चा ध्वनी होत असतो. तो ऐक आणि अध्यात्म विद्येच्या मार्गातील सर्वोच्च टोकावर तुझा ध्वज फडकाव. ।।५।।

कबीर म्हणतात की, साधूंनो ऐका, मन बुद्धीला अगम्य असलेल्या या स्थितीप्रत पोहोचा. दिवसभरातील एक निमिषभर जरी ही स्थिती दिसली तरी ती अवृद्धत्वाची आणि अमरत्वाची खूण ठरेल. ।।६।।

No comments:

Post a Comment