Sunday 19 July 2015

पंढरपूरचा विठोबा आणि साहित्यिक

सूर्यकांत पळसकर
साहित्य आणि वारकरी चळवळ यांचे अतूट नाते आहे. सर्व वारकरी संत हे कवी होते. मराठी साहित्याचा पाया या संतकवींनीच रचला आहे. आधुनिक काळातही कवी-लेखकांना पंढरपूरच्या विठोबाने भुरळ घातल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच्या अगदी उलट आपल्या लेखनाने काही लेखकांनी वारकèयांचा रोषही ओढवून घेतला आहे. 

साने गुरुजींचे उपोषण
‘श्यामची आई' या बाल कादंबरीचे लेखक साने गुरूजी यांची विठ्ठलावर गाढ श्रद्धा होती. विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी पंढरपुरातील तणपुरे महाराज मठात १ मे १९४७ रोजी उपोषण सुरू केले. १० मे रोजी या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. साने गुरुजी यांच्या उपोषणाचे पडसाद तेव्हा दिल्लीपर्यंत उमटले होते. पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष बनलेल्या गणेश वासुदेव मावळंकर यांनी महात्मा गांधी यांच्याकडे या प्रकरणी रदबदली केली होती. महात्मा गांधी यांनी हस्तक्षेप करून सरकारला कामाला लावले आणि विठोबाची दारे दलितांसाठी खुली झाली. 

ओ विठू यू आर माय बॉफफ्रेंड!
प्रख्यात विदुषी इरावती कर्वे या आधुनिक विचारांच्या होत्या. देव-धर्मावर त्यांचा विश्वास नव्हता. एकदा त्या पंढरपूरला आल्या. आलोच आहोत, तर विठोबाचे दर्शन घेऊया, असे म्हणून त्या मंदिरात गेल्या. विठ्ठलाला पाहिल्यानंतर मात्र त्यांची अवस्था भावविभोर झाली. त्यांनी उत्स्फूर्त उद्गार काढले, ‘ओ विठू, यू आर माय बॉयफ्रेंड!' संत मीराबार्इंनी श्रीकृष्णाला आपला प्रियकर मानले होते. इरावतीबार्इंची भावनिक अवस्था याच पातळीवर गेल्याचे दिसून येते.

दांडेकरांच्या प्रवचनाला अत्र्यांची हजेरी
संतसाहित्याचे गाढे अभ्यासक शं. वा. उपाख्य मामासाहेब दांडेकर हे पुण्यातील प्रख्यात एस.पी. कॉलेजात प्राचार्य होते. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. पण, त्याहीपेक्षा ते एक प्रवचनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील लोकप्रिय वक्ते, कवी, पत्रकार आणि महान लेखक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे त्यांच्या प्रवचनाला येत असत. दांडेकरांचे ‘वारकरी पंथाचा इतिहास' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी वारकरी सांप्रदायाचा सुमारे हजारभर वर्षांचा इतिहास मांडला आहे. 

मूळ विठ्ठल मूर्ती माढ्यात!
प्रख्यात संशोधक रा.चिं. ढेरे यांचा ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात ढेरे यांनी विठ्ठल हे दैवत आणि पंढरपूर यांचा विस्तृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथात त्यांनी काढलेले काही निष्कर्ष मात्र वादग्रस्त ठरले आहेत. विठ्ठलाची मूळ मूर्ती सोलापूर जिल्ह्यातील माढे येथे असल्याचा दावा ग्रंथात करण्यात आला आहे. अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा त्याने अनेक देवळांचा विध्वंस केला होता. त्याच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी बडव्यांनी विठ्ठलाची मूर्ती माढ्याला हलविली. नंतर ती परत आणलीच नाही, असा दावा ढेèयांनी केला आहे. तसेच विठ्ठल हे दैवत मूळचे कुरुब धनगरांचे असून इतर जातींनी फार नंतर त्याचा स्वीकार केला, असाही एक दावा त्यांनी केला आहे. ढेरे यांचे हे निष्कर्ष संशोधकांत अद्याप तरी मान्य झालेले नाही. तरीही त्यांचा हा ग्रंथ मौलिक समजला जातो.

राजवाड्यांनी जाळले ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीची सर्वांत जुनी प्रत शोधून काढल्याचा दावा केला होता. पदरमोड करून त्यांनी ही प्रत प्रसिद्धही केली. आपली ही प्रत साक्षात ज्ञानेश्वरांच्या काळातील असून, उपलब्ध प्रतींपैकी सर्वांत शद्ध आहे, असा त्यांचा दावा होता. आपल्या या संशोधनाचे वारकरी सांप्रदायात जोरदार स्वागत होईल, असे राजवाड्यांना वाटले होते. तथापि, वारकऱ्यांनी राजवाड्यांची ही ज्ञानेश्वरी स्वीकारण्यास नकार दिला! या प्रकाराने राजवाडे अत्यंत निराश झाले. त्यांनी या प्रतीचे मूळ हस्तलिखितच जाळून टाकले. राजवाड्यांच्या दाव्यातील तथ्यांश तपासण्याचा मार्गच त्यामुळे खुंटला.

यादवांवर वारकरी कोपले!
प्रख्यात ग्रामीण साहित्यिक आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम' आणि ‘लोकसखा ज्ञानेश्वर' या कादंबऱ्या वादग्रस्त ठरल्या. संशोधन करून आपण या संतांची जीवन चरित्रे लिहिल्याचा दावा यादवांनी केला होता. २००९ साली यादव यांची महाबळेश्वर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंर या कादंबऱ्यातील वादग्रस्त मजकुर समोर आला. चिडलेल्या वारकऱ्यांनी संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. यावर काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे यादव या संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही. अध्यक्षांविणा झालेले एकमेव साहित्य संमेलन अशी त्याची ख्याती झाली! या कादंबऱ्याना न्यायालयातही आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने या कादंबऱ्या नष्ट करण्याचा आदेश दिला. त्यानंतरच हा वाद संपुष्टात आला.
(प्रसिद्धी  : लोकमत/१८-७-२०१५/औरंगाबाद)  

No comments:

Post a Comment