ज्या काळी वर्णव्यवस्था अस्तित्वात आली, त्या काळी भारतात राज्य आणि धर्म या दोन संस्था समाज व्यवस्थेचा मुख्य गाभा होता. या गाभ्या भोवती समाज व्यवस्थेची उभारणी झाली होती. त्यानुसार, धर्माची कामे पाहणारा वर्ग (ब्राह्मण), राज्यव्यवस्था पाहणारा वर्ग (क्षत्रिय), व्यापार उदिम पाहणारा वर्ग (वैश्य) आणि सेवा देणारा वर्ग (शुद्र)अशा ४ लोकसमूहांची गरज समाजाला भासली. त्यातून ४ वर्णांची रचना केली गेली, असे दिसते. राज्य आणि धर्म या दोन संस्था प्रमुख असल्यामुळे अर्थातच त्यांना जास्तीचे महत्त्व येत गेले. कालांतराने हे जास्तीचे महत्त्व इतके वाढले की, हेच दोन वर्ग प्रबळ झाले. त्यामुळे, भारतीय पुराणेतिहास म्हणजे याच दोन वर्णांचा इतिहास आहे. खालच्या दोन वर्णांची फारच थोडी माहिती पुराण ग्रंथांत आहे.
राजो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरू: ।।
तीर्थसंसेवया चांहो जह्यङ्गच्युतचेतन: ।।४१।।
भागवत महापुराण. स्कंध : ९ वा. अध्याय : १५ श्लोक ४१
अर्थ : सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे. हे पाप धुवून काढण्यासाठी भगवंताचे स्मरण करीत तीर्थयात्रा कर.
वर्णव्यवस्थेचा क्रम कालौघात हा क्रम बदलत राहिला असावा, अशी एक शक्यता आहे. वर्णव्यवस्थेचा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र असा सांगितला जातो. ॠगवेदातील पुरूषसुक्तातून हा क्रम आला आहे. तथापि, पुरूष सुक्तच मुळात प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते. पुरूषसुक्त हे बरेच मागाहून ॠगवेदात घातले गेले आहे, असे अनेक विद्वानांनी दाखवून दिले आहे. पुराणेतिहासात वर्णव्यवस्थेचा क्रम क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शुद्र असा आहे. पुराणेतिहासातील वर्णव्यवस्थेचा हा क्रम पाहिला म्हणजे पुरूषसुक्ताच्या विश्वसनीयतेला तडा जातो. पुराण काळात राज्यव्यवस्था प्रधान होती. त्यामुळे क्षत्रियांचे महत्त्व वाढले असावे, असे दिसते. साधारणत: ब्रह्महत्या हे सर्वांत मोठे पाप आहे, असे मानण्याचा प्रघात आहे. तथापि, भागवत पुराणात ब्रह्महत्येपेक्षाही राजहत्या हे मोठे पाप असल्याचे वर्णन येते. त्याची संगती लावणे अवघड होऊन बसते. पुराण काळात राजसत्ता केंद्रस्थानी आल्याचा हा परिणाम असावा, असे दिसते.
परशुराम कार्तवीर्याची हत्या करतो तेव्हा परशुरामचा पिता जमदग्नी त्याची निर्भत्सना करतो. जमदग्नी म्हणतो की, "अवधीन्नरदेवं यत सर्वदेवमयं.." राजाला नरदेव म्हणतात. कारण त्याच्या शरिरात सर्व देवांचा वास असतो. त्याची हत्या करायची नसते. इतकेच नव्हे, तर राजहत्या हे ब्रह्महत्येपेक्षाही मोठे पाप आहे, असे जमदग्नी सांगतो. राजहत्येचे पाप धुवून काढण्यासाठी तीर्थयात्रा करण्याचा आदेश जमदग्नी परशुरामाला देतो. त्यानुसार, परशुराम तीर्थयात्रा करतो. आणि शेवटी महेंद्र पर्वतावर जाऊन ध्यानधारणेत लीन होतो. असे वर्णन भागवतात येते.
जमदग्नी परशुरामाला म्हणतो :
तीर्थसंसेवया चांहो जह्यङ्गच्युतचेतन: ।।४१।।
भागवत महापुराण. स्कंध : ९ वा. अध्याय : १५ श्लोक ४१
अर्थ : सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे. हे पाप धुवून काढण्यासाठी भगवंताचे स्मरण करीत तीर्थयात्रा कर.
सूर्यकांत पळसकर
No comments:
Post a Comment