Showing posts with label महात्मा गांधी. Show all posts
Showing posts with label महात्मा गांधी. Show all posts

Thursday, 16 October 2014

गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!

गांधीजींना पुरस्कार न देणाऱ्या नोबेल समितीला सारे गुन्हे माफ..!

-सूर्यकांत पळसकर


बायबलमध्ये एका प्रसंगात शास्त्रांचा हवाला देत येशू म्हणतो की, ‘गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!' उपेक्षेचे धनी असलेल्यांसाठी हे वचन प्रेरणादायी ठरावे. बालमजुरी आणि मुलांच्या शोषणाविरुद्ध काम करणारे गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा या वचनाची प्रकर्षाने आठवण झाली. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानातील मलाला युसूफझई या तरुणीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे मलालाचे नाव जगातील कानाकोप-यात आधीच दुमदुमत होते. कैलाश सत्यार्थी मात्र भारतातही कोणाला माहिती नव्हते! त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला- कोण हे सत्यार्थी? नोबेल पुरस्कार मिळविण्याएवढे प्रचंड काम करणारा हा माणूस खरेच भारतात राहतो का? राहत असेल, तर आपल्याला कसा काय माहिती नाही? हा माणूस कधी टीव्हीवर दिसला नाही. वृत्तपत्रांतून झळकला नाही. सरकारी पुरस्कारांच्या यादीत कधी दिसला नाही. समाजसेवकांच्या भाऊगर्दीतही नजरेस आला नाही. अचानक त्याचे नाव नोबेलच्या पुरस्कारातच दिसले. अरे आहे तरी कोण हा माणूस?

नोबेलविजेत्या नायकाचे साधे नावही माहिती नसणे, हा काही लोकांचा दोष नाही. सकारात्मक काम करणा-यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणा-या व्यवस्थेचा हा दोष आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्यावरही शेकड्याने पुस्तके लिहिणारी, नाटके-सिनेमे काढणारी ही व्यवस्था गांधीवादी कैलाश सत्यार्थी यांना अनुल्लेखाने मारत राहिली. त्यामुळे त्यांचे नाव कोणाला माहिती असण्याचे कारणच नव्हते.

संस्कृतात भवभूती नावाचा एक मोठा नाटककार आहे. त्याच्या नाटकांना त्याच्या हयातीत कधी लोकमान्यता मिळाली नाही. लोकमान्यता नाही म्हणून भवभूती खंत करीत बसला नाही. व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून तो लिहीत राहिला. जाताना सांगून गेला, ‘पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे. कधी तरी, कोठे तरी माझ्या नाटकांना मान्यता मिळेलच!' आज भवभूती खरोखरच मोठा नाटककार म्हणून ओळखला जातो. भवभूतीचे वचन सत्यार्थी यांच्या नोबेलने पुन्हा एकदा खरे ठरले. भारतीय व्यवस्थेने नाकारलेला हा चौकोनी चिरा नोबेलवाल्यांनी हेरला. आज तो खरोखरच कोनशिला झाला आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोनशिला होण्याची क्षमता असतानाही उपेक्षेच्या लाथा खाणाèयांची संख्या भारतात मोठी आहे. सगळ्यांचेच नशीब कैलाश सत्यार्थी यांच्यासारखे बलदंड नसते.

कैलाश सत्यार्थी यांना नोबेलच्या आधी जवळपास १२ पुरस्कार मिळाले असल्याचे आता समोर आले आहे. दुर्मिळ योगायोग पाहा, यातील एकही पुरस्कार भारतातील नाही. सगळे पुरस्कार युरोप आणि अमेरिकेतील आहेत. तेथील विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्था यांनी हे पुरस्कार दिले आहेत. इंजिनिअर असलेल्या सत्यार्थी यांनी १९८० साली प्राध्यापकीला रामराम ठोकून ‘बचपन बचाओ आंदोलना'ची सुरुवात केली. १९८० ते २०१४ या ३४ वर्षांच्या काळात भारतात डावे-उजवे, सेक्युलर, हिंदुत्ववादी अशा सर्व पंथीयांची सरकारे आली. यापैकी कोणत्याही सरकारला त्यांच्या कार्याची महती कळाली नाही. या काळात पद्म आणि इतर पुरस्कार किती दिले गेले, याचा हिशेब काढणे अवघड आहे; पण यातील एकाही पुरस्कारावर सत्यार्थी यांचे नाव कोरले गेले नाही. भारत सरकारच्या पुरस्कारांतून इतकी वर्षे ‘सत्य' हरवत राहिले. तेच नोबेलवाल्यांना सापडले.

खरे कार्यकर्ते पुरस्कारांसाठी काम करीत नसतात, हे खरे असले तरी पुरस्कार कार्यकत्र्यांना हुरूप देतात. समाजाने कामाची दिलेली ती पोचपावती असते. सत्यार्थी यांच्या कामाची पोचपावती भारतीय समाजाने दिली नाही. पण, म्हणून सत्यार्थी यांचे काम थांबले नाही. ३४ वर्षांच्या काळात जगभरातील १४४ देशांत त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढविला. हा संपूर्ण कालखंड सोपा मात्र नव्हता. या काळात त्यांच्यावर दोन प्राणघातक हल्ले झाले.

सत्यार्थी आणि मलाला यांच्या नोबेल पारितोषिकाने दोन्ही देशांत एक विचित्र योगायोग जुळवून आणला आहे. पाकिस्तान पूर्णतः कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे, तर भारतात कट्टरपंथीयांची घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत गांधीजींनी सांगितलेल्या शांतता आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जाणा-या या दोघांना नोबेल जाहीर झाले आहे. पाकिस्तानच्या मातीला सहिष्णुतेचा जागर तसाही अपरिचितच आहे. भारताचे मात्र तसे नाही. इथल्या मातीला बापूंच्या सहिष्णुतेचा सुगंध आहे. गांधीजींची हत्या होऊन ६६ वर्षे झाली. या संपूर्ण काळात गांधीविचार गाडून टाकण्यासाठी जातीय शक्तींनी आपले सर्व ‘चाणक्य' कामाला लावले होते. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर ‘चाणक्यां'च्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण हाय रे दैवा! गांधींचा विचार नोबेलचा धुमारा घेऊन पुन्हा जमिनीतून वर आला आणि त्याचे स्वागत करण्याची पाळी ‘चाणक्यां'वर आली. काव्यगत न्यायाचे यापेक्षा बळिवंत उदाहरण जगाच्या इतिहासात बहुधा सापडणार नाही. कट्टरपंथीयांच्या दृष्टीने मलाला आणि सत्यार्थी यांचे देश आणि धर्म एकमेकांचे शत्रू आहेत. तरीही दोघांचे मिशन एक होते आणि मार्गही एकच होता. बापूंचा शांतीमार्ग. नोबेल पुरस्काराने आता त्यांना कायमस्वरूपी एकत्र आणले. भविष्यात जेव्हा जेव्हा सत्यार्थी यांचे नाव घेतले जाईल, तेव्हा तेव्हा मलालाचीही आठवण होईल. तसेच मलालाच्या आठवणीसोबत सत्यार्थींचे नावही ओठांवर येईल. दोन्ही देश आणि दोन्ही धर्मांनी शिक्षणासाठी तसेच दहशतवादाच्या विरुद्ध काम करावे, अशी अपेक्षा नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना व्यक्त केली आहे. ती अनाठायी नाही.

अनेक वेळा नामांकन होऊनही नोबेल समितीने महात्मा गांधी यांना नोबेल दिले नाही. भारतातील एका साध्या गांधीवाद्याला शेवटी हा पुरस्कार त्यांनी दिला. नोबेल समितीला सर्व गुन्हे माफ..!

(लेखक लोकमत, औरंगाबादमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
प्रसिद्धी : लोकमत १५ ऑक्टोबर २०१४ 


या विषयावरील सर्व लेख 

Wednesday, 15 October 2014

नोबेल, गांधी आणि सत्यार्थी!

नोबेल पारितोषिक पावन झाले 

-सूर्यकांत पळसकर 

महात्मा गांधी यांना ६ वेळा नॉमिनेशन मिळूनही नोबेल पारितोषिक नाकारण्याचे पाप नोबेल समितीने केले होते. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल देऊन आता समितीने या पापाचे क्षाळण केले, असे समजायला हरकत नाही. कैलाश सत्यार्थी हे गांधीवादी आहेत. या पूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्युथर किंग, तिबेटींचे नेते दलाई लामा, म्यानमारच्या लोकशाहीवादी  नेत्या ऑन सॉन स्यू की या गांधीवाद्यांना नोबेल मिळाले आहे. पण हे सारे विदेशी होते. कैलाश सत्यार्थी यांच्या रूपाने भारतीय गांधीवाद्यालाही हा पुरस्कार आता मिळाला. एवढे नोबेल मिळविणारा गांधीविचार हा जगातील एकमेव विचार आहे.

१९३७ साली गांधीजींचे पहिल्यांदा नोबेलसाठी नॉमिनेशन झाले. त्यापुढच्या सलग दोन वर्षी त्यांना पुन्हा नॉमिनेशन मिळाले. १९४७ सालीही त्यांना नॉमिनेशन मिळाले. पण प्रत्येकवेळी समितीने त्यांना पारितोषिक नाकारले. गांधी हे विचारांनी "राष्ट्रवादी" आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दैवदुर्विलास पाहा, गांधी हे "राष्ट्रवादी" नाहीत, असा आरोप करीत नथुराम गोडसे याने त्यांची पुढच्याच वर्षी हत्या केली. गांधीजींचे व्यक्तिमत्व इतके बहुआयामी होते की, रुढ विचारांच्या चौकटीत ते बसतच नव्हते. म्हणूनच नोबेलवाल्यांना ते कडवट राष्ट्रवादी वाटत होते, तर हिन्दुत्वाद्यांना ते राष्ट्रवादी वाटतच नव्हते.

गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९४८ साली त्यांना मरणोत्तर नोबेल देण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला होता. पण, त्यात नियम आडवे आले. गांधीजींचा कोणत्याही संघटनेशी कायदेशीरित्या संबंध नव्हता. कोणत्याही संघटनेचे साधे सदस्यत्वही त्यांच्या नावे नव्हते. त्यांच्या मागे कोणतीही संपत्ती नव्हती. कोणत्याही बँकेत खाते नव्हते. त्यांनी मृत्यूपत्र केलेले नव्हते; त्यामुळे त्यांना कोणी रितसर वारसच नव्हता. मग नोबेलचे स्मृतीचिन्ह आणि रक्कम देणार कोणाला? गांधींचे हे नोबेलही हुकले. पण नोबेल समितीने एक केले, त्या वर्षी कोणालाच नोबेल दिले नाही. "शांततेचे नोबेल पारितोषिक देता येईल, असा कोणीही जिवंत माणूस पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही", असे नोबेल समितीने त्या वर्षी जाहीर केले. ही गांधीजींना श्रद्धांजलीच होती.

पण, बरेच झाले, गांधींना नोबेल मिळाले नाही ते. संतवृत्तीने जगलेल्या या महापुरुषाने आयुष्यात सर्व प्रकारच्या लौकिक उपाध्या नाकारल्या. नियतीने त्यांना नोबेलच्या उपाधीपासूनही दूर ठेवले. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल मिळाल्याने गांधीजींच्या विचारांचा विजय झाला आहे. आज नोबेल पारितोषिकही पावन झाले आहे. 

Thursday, 2 October 2014

गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

१ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त लोकमतच्या
संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला माझा लेख.… 

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश
देणारी तीन माकडे  गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली
आहेत, हे कोणालाच माहिती नसते.
सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता', व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट' आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथ्यामधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणारया या तिन्ही विचारांत अद्वैैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवन आकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारांवर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढ्याचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअलङ्क या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तकङ्क अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीताङ्क हे पुस्तक आणि ‘सत्यङ्क हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडून घेतला. 

गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २० ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसèया गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.ङ्क 
जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदयङ्क या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी : 
१. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. 
२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे. 
३. साधे अंगमेहनतीचे शेतकèयाचे जीवन हेच खरे जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे।।' हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वतःचा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ।।' असे वचन लिहून जातात. 

तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला. 

‘गीता' आणि ‘अन्टू धिस लास्ट' या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे : 

पापाची वासना नको दावू डोळा।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । 
बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।...

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसèयाच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी. अअर्ध्या  जगावर राज्य असलेल्या इंग्रजांशी लढताना महात्मा गांधी यांनी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला नाही. त्याऐवजी सत्याग्रह आणि उपोषण ही नवी हत्यारे त्यांनी वापरली. ही हत्यारे गांधीजींनी तुकोबांकडूनच घेतली आहेत.  

-सूर्यकांत पळसकर
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)


लोकमतच्या वेब साईटवर लेखाची लिंक :
गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

Thursday, 6 February 2014

राष्ट्रपिता ही पदवी सरोजिनी नायडूंची देण!

लोकमतच्या रविवार दि. ८ एप्रिल २०१२ रोजीच्या
अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण. 
महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही बिरुदावली कोणी लावली, हा प्रश्न सध्या देशभरात गाजतो आहे. यासंबंधी कोणत्याही प्रकारचा ठोस लिखित पुरावा भारत सरकारकडे उपलब्ध असल्याचे ज्ञात नाही. तथापि, त्या काळातील वरिष्ठ काँग्रेस नेत्या तसेच ‘भारत कोकिळा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींना उद्देशून राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम वापरली, असा एक पुरावा प्रतिनिधीला सापडला आहे.

लखनौ येथील इयात्ता सहावीची विद्यार्थिनी ऐश्वर्या पराशर हिने पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात एक याचिका दाखल करून ‘गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली' अशी माहिती विचारली होती. ही याचिका पंतप्रधान कार्यालयाकने गृहमंत्रालयाकडे पाठविली. नंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडे पाठविण्यात आली. तथापि, या सर्व प्रवासात राष्टड्ढपिता ही बिरुदावली गांधीजींना कोणी लावली, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आमच्याकडील कागदपत्रांद्वारे तुम्हीच संशोधन करा, असे पत्र पुरातत्व विभागाने ऐश्वर्याला पाठविले. शेवटी तिचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी गांधीजींना ही बिरुदावली पहिल्यांदा लावली, असा प्रवाद आहे. या बिरुदावलीचे श्रेय कोणी सुभाषचंद्र बोस यांनाही देतात. तथापि, यासबंधीचा ठोस लिखित पुरावा कोणीही देऊ शकलेले नाही.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी सदर प्रतिनिधीने राज्यातील जुन्या जाणत्या लोकांकडे विचारणा केली, तेव्हा सरोजिनी नायडू यांचे नाव समोर आले. तथापि, त्यासाठी ठोस लिखित पुरावा उपलब्ध नव्हता. जुन्या पुस्तकांत काही उल्लेख सापडू शकतात, हे गृहीत धरून प्रतिनिधीने औरंगाबादेतील फुटपाथवर जुनी पुस्तके विकणा-या लोकांकडे धांडोळा घेतला. तेव्हा, अद्भूत योगायोग जुळून आला आणि प. जवाहरलाल नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या ‘रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज' पुस्तकाच्या मराठी अनुवादाची एक जीर्ण प्रत हाती लागली. महात्मा गांधी यांना सरोजिनी नायडू यांनी राष्ट्रपिता हे संबोधन सर्वप्रथम वापरले, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात मथाई यांनी केला आहे. प्रतिनिधीच्या हाती आलेल्या या पुस्तकाची सुरूवातीची आणि शेवटची काही पाने गायब आहेत. त्यामुळे त्याचा प्रकाशक कोण हे कळू शकलेले नाही.


२८ मार्च १९४७ रोजी मिळाले राष्ट्रपिता संबोधन
गांधीजींना राष्ट्रपिता हे संबोधन कसे प्राप्त झाले, याची माहिती असलेला पुस्तकातील तपशील असा : ब-याच लोकांची अशी कल्पना आहे की, गांधीजींना ‘राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम नेहंनी लावली. ते बरोबर नाही. श्रीमती सरोजिनी नायडूंनी हा शब्दप्रयोग प्रथम आमलात आणला. त्यावेळचा प्रसंग असा : २८ मार्च ते २ एप्रिल १९४७ या काळात नवी दिल्लीत आशियायी परिषद भरली होती. श्रीमती नायडू परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. गांधीजी झपझप पावले टाकीत व्यासपीठाच्या दिशेने येत असताना श्रीमती सरोजिनी नायडूंनी आपल्या पल्लेदार स्वरात त्यांचे आगमन घोषित करताना गांधींचा उल्लेख ‘आमचे राष्ट्रपिता' या शब्दांत केला.

अजोड भक्ती 
सरोजिनी नायडू यांची महात्मा गांधींवरील भक्ती किती अजोड होती, याचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केल्यानंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या शोकाला तर पारावार राहिला नाही. मथाई यांनी लिहिले आहे : शोकसागरात बुडालेल्या काँग्रेसजनांना उद्देशून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, ‘‘अरे बाबांनो, महात्म्याला शोभेल असेच मरण बापूंना आले आहे. वृद्ध होऊन, अपचनासारख्या विकाराने त्यांना मृत्यू यायला हवा होता की काय?'

नेहरुंचा गांधीजींविषयीचा पितृभाव
नेहंनाही महात्मा गांधी यांच्याबद्दल पित्यासमान भक्ती होती. नेहंच्या या भावनेला मथाई ‘फादर कॉम्प्लेक्सङ्क असे नाव देतात. महात्मा गांधी यांच्याजवळ नेहरू आपले मन पूर्णतः रिकामे करीत. एखाद्या लहान मुलाने आपल्या पित्याला आपली सर्व रहस्ये सांगावी, अशी ही भावना होती. शुक्रवार दि. ३० जानेवारी १९५८ रोजी सायंकाळी ५.१७ वा. गांधीजींजी हत्या झाली. नेहरू सैरभैर झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांच्या भावना इतक्या अस्सल आणि उत्कट होत्या की, कोणतीही पूर्व तयारी न करता, नेहंनी आकाशवाणीवरून त्या दिवशी राष्टड्ढाला उद्देशून भाषण केले. त्यांच्या भाषणाचे पहिले वाक्य होते : ‘द लाईट हॅज गॉन आऊट ऑफ अवर लाईफ...' नेहरुंचे हे भाषण याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. पंतप्रधान नेहरू यांचे निवासस्थान १७, यॉर्क रोड हे होते. नेहरुंच्या निवासस्थानातील चूल त्या संध्याकाळी पेटली नाही. नेहरूंपासून नोकरापर्यंत कोणीही त्या रात्री जेवले नाही, अशी माहिती मथाई देतात.

एम. ओ. मथाई यांच्या 'रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज'
या पुस्तकाचे मुखपृष्ठ. या छायाचित्रात 
नेहरूंसोबत मथाई (उभे असलेले) दिसत आहेत.
कोण होते मथाई?
दक्षिण भारतातून आलेले एम ओ मथाई स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील ‘युनायटेड स्टेट्स आर्मीङ्कच्या सेवेत होते. १९४६ साली ते युएस आर्मीचा राजीनामा देऊन नेहंचे स्वीय सहायक म्हणून सेवेत रूजू झाले. ते २४ तास नेहंसोबत असत. नेहंच्या प्रत्येक निर्णयाचे ते साक्षीदार होते, असे मानले जाते. कालांतराने त्यांच्यावर ‘घटनाबाह्य सत्ताकेंद्रङ्क बनल्याचे आरोप झाले. कम्युनिस्टांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे १९५९ साली त्यांनी नेहंच्या स्वीय सहायक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य चेन्नईत घालवले. १९८१ साली वयाच्या ७२ व्या वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले. मथाई यांनी नेहंशी संबंधित दोन पुस्तके लिहिली. १. रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज (१९७८) २. माय डेज विथ नेहरू (१९७८). मात्र ही दोन्ही पुस्तके वादग्रस्त ठरली. त्यात त्यांनी अनेक स्फोटक गोष्टी लिहिल्या होत्या. विशेषतः त्यांचे पहिले पुस्तक सर्वाधिक वादग्रस्त ठरले. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्यावर बंदी घातली.

- सूर्यकांत पळसकर

Thursday, 30 January 2014

गांधी भाय!

अफ्रिकेतील कुली लोकेशन्स!

संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस' ने गांधीविचाराचा नवा अवतार जगापुढे पेश केला. एका ‘भाई'ची गांधीगिरी आपण या चित्रपटात पाहिली. पण गांधीजींनाही खरोखरच एकदा ‘भाई' व्हावे लागले होते. याची कहाणी रोचक तशीच हृदयद्रावक आहे. काळ आपले काम करीत असतो. भारतीय समाजाने हजारो वर्षे दीन-दलितांना अस्पृश्य ठेवले. याची किंमत भारतीयांना इंग्रजी राजवटीत चुकवावी लागली. उच्चवर्णीय भारतीय दलितांना अस्पृश्यतेचे चटके देत होते. गोरया इंग्रजांच्या दृष्टीने संपूर्ण भारतीय समाजच अस्पृश्य होता. गांधीजी दक्षिण अफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना या अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. दक्षिण अफ्रिकेत भारतीयांच्या वसाहती वेगळ्या बाजूला काढण्यात आल्या होत्या. त्यांना गोरयांच्या वसाहतीत घर मिळत नसे. या भारतीय वस्त्यांना 'कुली लोकेशन्स' म्हटले जाई. कुली म्हणजे हमाल. असेच एक कुली लोकेशन जोहान्सबर्गमध्ये होते. तेथे भारतीयांनी ९९ वर्षांच्या लीजवर प्लॉट खरेदी केले होते. पुढील काळात जोहान्सबर्गमध्ये येणारे भारतीय याच लोकेशनमध्ये एकवटत गेले. जागा मात्र तेवढीच राहिली. परिणामी येथील घरांत लोक जनावरांसारखे कोंबून कोंबून भरले गेले. ही वसाहत महानगरपालिकेच्या दृष्टीने अस्तित्वात नव्हतीच . तिथे कोणत्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या. गांधीजींनी येथे राहणारया लोकांची तुलना निर्जन बेटावर अडकून पडलेल्या रॉबिन्सन क्रुसोशी केली आहे.१

कमाई न करणारा बॅरिस्टर
महानगरपालिकेच्या ‘क्रिमिनल निग्लिजन्स'मुळे जोहान्सबर्गच्या या कुली लोकेशनची अवस्था अमानवी झाली होती. या वसाहतीला सुविधा पुरविण्याऐवजी महानगरपालिकेने ही वसाहन राहण्यास अयोग्य ठरवून उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक प्रशासनाकडून तसा आदेशही मिळविला. महात्मा गांधी जोहान्सबर्गमध्ये आले तेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर आली. त्यांनी या अस्पृश्य भारतीयांसाठी न्यायालयात खटला लढविण्याचा निर्णय घेतला. गांधीजी बॅरिस्टर होते, तरी पैसे कमावणे हा हेतू त्यांनी कधीच मनात ठेवला नाही; त्यामुळे त्यांनी नाममात्र फीसमध्ये हे खटले चालविले. हा खटला लीज धारकाने जिंकला तर कायद्यानुसार लीजधारकास नुकसान भरपाई आणि न्यायालयीन खर्च मिळणे बंधनकारक होते. खटला जिंकल्यास पालिकेकडून मिळणारा न्यायालयीन खर्च लीज धारकांनी गांधीजींना देण्याचे मान्य केले. तसेच खटल्याचा निकाल काहीही लागला तरी १० पाऊंड गांधीजींना ते देणार होते. फीस अत्यंत कमी असल्यामुळे सर्व लीजधारकांची प्रकरणे गांधीजींकडेच आली. सुमारे ७० खटले गांधीजींनी चालविले. त्यापैकी फक्त एक खटला ते हरले. बाकीचे सर्व जिंकले त्यामुळे त्यांना १,६०० पाऊंडांची भरघोस कमाई झाली. त्यातला अर्धा पैसा गांधीजींनी याच कुली लोकेशनला हॉस्पिटल आणि इतर सोयींसाठी दिला.

गांधीजींच्या या निरिच्छ वृत्तीमुळे या सर्वांनाच गहिवरून आले. त्यांच्यात केवळ वकील आणि पक्षकार असे औपचारिक नाते राहिलेच नव्हते. गांधीजी त्यांच्यातीलच एक बनून गेले होते. या लीजधारकांपैकी एक होते अब्दुल्ला सेठ. खटल्याच्या काळात ते गांधीजींना साहेब कधीच म्हणत नसत. पण नुसतेच 'गांधी' म्हणून अवमानितही करीत नसत. ते त्यांना ‘गांधी भाय' म्हणत. हळूहळू सगळेच लीजधारक गांधीजींना 'भाई' म्हणू लागले. गांधीजी म्हणतात, मी अशा प्रकारे येथील भारतीयांचा ‘भाई' झालो.२

स्वतंत्र भारतातील बिहारी आज पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोप-यात जाताना दिसतात. मुंबईत बिहारींची संख्या खूप मोठी आहे. मुंबईत दक्षिण भारतीयांची संख्याही मोठी आहे. या लोकांना हाकलून लावण्यासाठी ठाकरयांची मुंबईतील हिंसक आंदोलने सर्वज्ञात आहेत. योगायोग पाहा जोहान्सबर्गच्या कुली लोकेशनमध्ये राहणारया भारतीयांत बहुतांश लोक बिहारी होते. तसेच काही जण दक्षिण भारतीय होते! जोहान्सबर्गच्या प्रशासनाने त्यांना हाकलण्याच्या प्रयत्न केला, तर गांधीजींनी त्यांना बेघर होण्यापासून वाचविले. ठाकरे आणि गांधी यांच्यातील हा फरक आहे.

- सूर्यकांत पळसकर, औरंगाबाद.