Showing posts with label लोकमत मधील लेख-१. Show all posts
Showing posts with label लोकमत मधील लेख-१. Show all posts

Friday, 19 December 2014

गीता आणि गाथा!

-सूर्यकांत पळसकर


श्रीमद्भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याविषयीचे सूचक विधान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. गीता कोणी वाचत नाही, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यावर नुकतीच व्यक्त केली. भारत हा बहुभाषिक आणि बहुपंथीय देश आहे. त्यामुळे भारताचा अधिकृत राष्ट्रीय ग्रंथ कोणता व्हावा, याचा निर्णय घेणे सोपे नाही. गीता हा निःसंशय महान ग्रंथ आहे.  तथापि, राष्ट्रीय ग्रंथाचा बहुमान मिळावा, असे इतरही अनेक ग्रंथ या देशात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हा त्यातीलच एक ग्रंथ होय. 

सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय ग्रंथाचा मुद्दा काढला, त्याच्या सुमारे दीडशे वर्षे आधी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे डायरेक्टर जनरल ऑफ पब्लिक इन्स्टड्ढक्शन सर अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांना भारताचे ‘राष्ट्रीय कवी' असे म्हटले होते. राष्ट्रीय कवीच्या रचनांना राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा मिळणे नैसर्गिकच म्हणायला हवे. तुकोबांना राष्ट्रीय कवी म्हणणारे ग्रँटसाहेब काही लहान असामी नव्हते. अमेरिकेत जन्मलेले ग्रँट ब्रिटिश साम्राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षणतज्ज्ञ होते. लंडनच्या एडिनबर्ग विद्यापीठात ते प्राचार्य होते. ब्रिटिश सरकारने नंतर त्यांना भारतात पाठविले. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजचे प्रोफेसर, प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि विधान परिषदेचे सदस्य अशा अनेक जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. मुंबईत असतानाच तुकोबांचे अभंग त्यांच्या वाचनात आले. अभंग वाचून ग्रँटसाहेब भारावून गेले. जानेवारी १८६७च्या ‘फोर्टनाईटली रिव्ह्यू'मध्ये त्यांनी तुकोबांवर एक निबंध प्रसिद्ध केला. तुकोबांच्या काही अभंगांची पद्य भाषांतरेही त्यांनी केली. ग्रँटसाहेब श्रद्धावंत ख्रिश्चन होते. त्यांचा बायबलचा उत्तम अभ्यास होता. तुकोबांच्या अभंगांची बायबलमधील डेव्हिडच्या गीतांशी तुलना करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. बायबलमधील ही गीते ‘डेव्हीड्स साम्स' (David’s psalms) म्हणून प्रसिद्ध आहेत. ही गीते अत्यंत भावगर्भ आहेत. तोच भाव ग्रँटसाहेबांना तुकोबांच्या अभंगांत दिसून आला. ‘सतत देवाच्या जवळ राहिलेल्या व्यक्तीच्या भावनांचा सहज उद्गार', असे वर्णन त्यांनी तुकोबांच्या अभंगांचे केले.

ग्रँटसाहेबांच्या आधीपासून ब्रिटिश अधिका-यांना तुकोबांच्या अभंगांनी आकर्षित केले होते. त्या काळी महाराष्ट्रात ख्रिस्ती मिशनरीही मोठ्या प्रमाणात काम करीत होते. तुकोबांच्या अभंंगांचा वापर करून एतद्देशीय लोकांना ख्रिस्तचरणी आणता येईल, असे अनेक मिशन-यांना वाटत असे. त्या काळी नुकतेच ख्रिश्चन झालेले रे. नारायण वामन टिळक यांचेही असेच मत होते. टिळक हे मूळचे चित्पावन ब्राह्मण होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी धर्मांतराच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते. ब्रिटिश मिशनरी मरे मिचेल (Dr. Murray Mitchell) यांनी याच उद्देशाने तुकोबांच्या अभंगांचा अभ्यास केला. १८४९ साली मरे यांनी महिपतीच्या लिखाणाधारे तुकोबांचे संक्षिप्त चरित्र लिहिले. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात ते छापून आले. मरे यांनी तुकोबांच्या अभंगांचा इतका अभ्यास केला, की त्यांना स्वतःलाच अभंग रचता यायला लागले! अर्थात हा सारा खटाटोप धर्मांतरासाठी होता. ग्रँटसाहेबांना मिशन-यांच्या या कारवाया कळल्या होत्या. याचा समाचार त्यांनी आपल्या लेखात घेतला. ग्रँटसाहेबांनी लिहिले की, ‘ज्यांच्या मुखी तुकारामांची वाणी वसत आहे, त्यांना नैतिकदृष्ट्या ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे, हे पटवून देणे दुरापास्त आहे!'

आज तुकोबांची जी गाथा महाराष्टड्ढात उपलब्ध आहे, त्याचे सारे श्रेय ग्रँटसाहेबांनाच जाते. सर बार्टल फ्रिअर हे तेव्हाचे मुंबई प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते. महाराष्ट्रात विखुरलेले तुकोबांचे अभंग एकत्रित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासाठी २४ हजारांचे अनुदान ग्रँटसाहेबांनी गव्हर्नर बार्टल साहेबांकडून मंजूर करून घेतले. विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांची संपादक म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रकल्पावर देखरेख करण्याची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित यांच्यावर सोपविण्यात आली. १८६९ साली तुकोबांच्या गाथेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्यानंतर चार वर्षांनी १८७३ साली दुसरा भाग प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात त्या काळी उपलब्ध असलेल्या सर्व हस्तलिखितांचा अभ्यास करून हा गाथा प्रसिद्ध झाला. उपलब्ध हस्तलिखितांतील पाठभेदांची नोंदही संपादकांनी करून ठेवली आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने हाच गाथा पुनप्र्रकाशित केला. काही अभंगांचा अपवाद वगळता वारक-यांमध्येही हाच गाथा प्रचलित आहे. अशा प्रकारे तुकोबांचे अभंग जतन करण्याचे महान काम सर अलेक्झांडर ग्रँट यांनी करवून घेतले. या प्रकल्पासाठी ब्रिटिश सरकारने दिलेल्या २४ हजार रुपयांची किंमत आजच्या हिशेबाने किती तरी मोठी होईल. ही मदत केवळ तुकोबांवरील प्रेमातून त्यांनी केली. गो-या साहेबांचे तुकोबांवरचे हे प्रेम त्या काळी महाराष्ट्रातील विद्वान म्हणविणा-या अनेकांच्या पोटदुखीचा विषय झाले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या निरपेक्ष बुद्धीच्या पंडिताने यावर केलेले भाष्यही बघण्याजोगे आहे. चिपळूणकरांनी निबंधमालेत लिहिले की, ‘…जो बिचारा शूद्रकवी आपल्या लंगोटेबहाद्दर व घोंगडीवाल्या भक्तमंडळीतच काय तो रमायचा, किंवा फार झाले तर हरदासांच्या कथाप्रसंगी सत्कार पावायचा, त्यास एकाएकी अरबी गोष्टीतील अबू हसनसारखे मोठे ऐश्वर्य प्राप्त झाले... असो झाली ती गोष्ट बरीच झाली.'

तुकोबांच्या अभंगांच्या प्रेमात पडलेल्या ब्रिटिश अधिकारी लेखक, कवी यांची यादी मोठी आहे. जे. नेल्सन फ्रेझर यांनी तुकोबांच्या अभंगांचे ‘पोएम्स ऑफ तुकाराम' या नावाने भाषांतर केले. फ्रेझर यांचाच ‘द लाइफ अँड टीचिंग ऑफ तुकाराम' हा अभ्यासग्रंथही प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने हा ग्रंथ पूर्ण होण्याआधीच फ्रेझर यांचे निधन झाले. जेम्स एफ. एडवर्ड्स यांनी नंतर तो पूर्ण केला. १९२२ साली हा ग्रंथ दोघांच्या नावे प्रसिद्ध केला. एडवर्ड्स यांचाही बायबलचा सखोल अभ्यास होता. या सा-या गो-या साहेबांनी आपला धर्म विसरून तुकोबांवर प्रेम केले. अभंगांच्या अभ्यासासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खर्ची घातली. भारत सरकारने असेच प्रेम दाखवून तुकोबांना ‘राष्ट्रकवी' म्हणून गौरवायला हवे. 
(लेखक औरंगाबाद लोकमतचे मुख्य उपसंपादक आहेत.)
(प्रसिद्धी : लोकमत १९ डिसेंबर २०१४)



Wednesday, 26 November 2014

शून्य सेनेचे सेनापती!

सूर्यकांत पळसकर

'काळ प्रतिकूल आहे, तोपर्यंत शत्रूला डोक्यावर घेऊन नाचा. काळ अनुकूल होताच त्याला डोक्यावरूनच खाली आपटा', असे चाणक्याचे एक वचन असल्याचे सांगितले जाते. ‘सांगितले जाते, असे विधान यासाठी केले, की त्याची वैधता तपासण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. आपल्याला हवा असलेला विचार कोणा तरी ऐतिहासिक अथवा पौराणिक व्यक्तीच्या नावे खपवला, की त्याला वैधता प्राप्त होत असते! प्राचीन काळापासून ही खपवाखपवी आपल्याकडे सुरू आहे. चाणक्याच्या नावे तर अचाट विचार रोजच्या रोज प्रसृत होत असतात. त्यात भर म्हणजे चाणक्याचे पेटंट आरएसएसच्या नावे आहे. परिवाराचे कुलदैवत असल्यामुळे चाणक्याने सांगितलेल्या मार्गावरून चालणे भाजपासाठी बंधनकारक आहे! हे सारे समजून घेतले, की भाजपा आपल्या मित्रपक्षांना डोक्यापर्यंत उचलून-उचलून का पटक्या देत आहे, याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार नाही; पण चाणक्याची शत्रूविषयक नीती आणि भाजपाची महाराष्ट्रातील राजकीय धोरणे यांचा मेळ घालताना अनेक पट्टीचे स्वयंसेवकही अवघडून गेले आहेत. वर दिलेला चाणक्य विचार हा शत्रूंसाठी आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेपासून शिवसंग्रामपर्यंतचे सर्व मित्रपक्ष काही पाकिस्तानातील नाहीत. मग त्यांना डोक्यावरून उचलून पटकायचे कारण काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा प्रश्नार्थींसाठी चाणक्याने सांगितलेला दुसरा एक विचार उपयुक्त ठरू शकेल. हा विचार म्हणतो, की ‘राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र नाही अन् कायमस्वरूपी शत्रू नाही!' शत्रू काय नुसते पाकिस्तानातच असतात? राजकारणातले विरोधक हे शत्रूच. त्यांच्यासोबत करायचा व्यवहार चाणक्याने सांगितलेल्या नीतीने करण्यातच खरा मुत्सद्दीपणा आहे, असा याचा अर्थ.

परिवारातील थिंक टँकवाले कोणत्याही प्रश्नांनी विचलित होत नाहीत. प्रत्येक कृतीच्या समर्थनार्थ विचारांचा पुरवठा ते करू शकतात. परिवाराच्या थिंक टँकचे सामर्थ्य खरोखरच अचाट आहे. ते बघून साक्षात चाणक्यही स्वर्गात हसला असेल. विशेषतः रिपाइं नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची सध्या जी फजिती सुरू आहे, ती पाहून तर तो खदाखदा हसला असेल. या नेत्यांनी आधीच चाणक्य वाचला असता, तर अशी फसगत वाट्याला आली नसती! खरे म्हणजे, २५ वर्षांपासूनचा जिगरी दोस्त असलेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने झुलवत-झुलवत झुरळासारखे झटकून टाकले, तेव्हाच आठवले-जानकरादी मित्रांनी सावध व्हायला हवे होते; पण तसे घडले नाही. भाजपासोबत महायुती करून त्यांनी निवडणूक लढविली. भाजपाने मोठ्या मनाने (?) त्यांना २५ जागा दिल्या. आठवले यांना त्यातल्या १४ जागा मिळाल्या होत्या. आठवले एवढे जोशात होते, की निवडणुकीनंतर सत्तेवर येणा-या सरकारमध्ये आपणच उपमुख्यमंत्री होणार, अशी घोषणाच त्यांनी करून टाकली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर महादेव जानकर अक्षरशः भारावून गेले होते. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या पहिल्या बैठकीसाठी आले, तेव्हा त्यांनी विधानभवनाच्या पायèयांवर लोटांगण घातले होते. भावनाविवश झाल्याने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते; पण राजकारण हा सर्वाधिक क्रूर खेळ आहे, तो भावनेवर चालत नाही. शिवसेनेला फेकले त्याप्रमाणे आठवले-जानकरादी मित्रांनाही आता भाजपाने फेकून दिले आहे.

मटका आकड्यावर चालतो. लोकशाहीही आकड्यावरच चालते. ज्याचा आकडा मोठा तो शेर. शिवसेनेकडे किमान ६३ आमदारांचा आकडा तरी आहे. त्या बळावर ते विरोधी पक्ष म्हणून का होईना, पण ताठ उभे आहेत. बार्गेनिंगची शक्ती राखून आहेत. आठवले-जानकरादी नेत्यांचे तसे नाही. जानकरांकडे दौंडचे राहुल कुल यांच्या रूपाने एकुलता एक आमदार आहे. आठवले, शेट्टी, मेटे हे शून्य सेनेचे सेनापती ठरले आहेत. त्यांचा एकही आमदार विधानसभेत नाही. आठवले-जानकरादी नेत्यांकडे छोट्या-छोट्या जाती-समूहांची ताकद होती, ती भाजपाला मिळाली. त्यातून भाजपाची विधानसभेतील सदस्यसंख्या ४४ वरून १२२ झाली. याच्या बदल्यात भाजपाची मते मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पारड्यात जायला हवी होती; मात्र ती गेली नाहीत. ही मते मित्रपक्षांऐवजी शिवसेनेच्या उमेदवाराकडे गेली. तेथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

रामदास आठवले यांच्या पक्षाने परवा याबद्दल नाराजी व्यक्त केली; पण त्याचा आता काहीच उपयोग नाही. असल्या नाराज्या हवेच्या झुळकीसरशी उडून जातात. निवडणुकीआधीच आणाभाका पक्क्या करून घ्यायला हव्या होत्या किंवा निवडणूक संपल्यानंतर लगेच या मुद्याला तोंड फोडायला हवे होते; पण सरकारात आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा या नेत्यांना होती. त्या आशेपोटी ते गप्प बसले. ६३ आमदार असतानाही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवणारा भाजपा शून्य सेनेच्या सेनापतींना सत्तेत खरेच वाटा देईल काय?

मित्रपक्ष ही राजकारणातील एक मोठी कटकट आहे, हा नवा विचार भाजपाने आत्मसात केला आहे. हा भाजपाचा अनुभवसिद्ध विचार आहे. वाजपेयी सरकार असल्यापासून मित्रपक्षांची कटकट भाजपा सोशीत आला आहे. त्यापासून मुक्ती मिळवायची, असा त्यांचा आताचा निर्धार दिसतो. मित्रपक्षांकडून शक्ती मिळवून बलवान व्हायचे, हे या निर्धाराला प्रत्यक्षात उतरवायचे सूत्र दिसते. महाराष्टड्ढ विधानसभा निवडणुकीत त्याचेच प्रत्यंतर आले. हे सूत्र वापरताना भाजपाच्या खेळ्या मात्र अत्यंत सावध आहेत. ‘नाही म्हणायचे नाही आणि काही द्यायचेही नाही', अशी ही खेळी आहे. आपल्याला बोल लागणार नाही, याची काळजी मात्र हा पक्ष घेत आहे. मित्रपक्षांना सत्तेत वाटा देणार का, या प्रश्नावर ‘चर्चा सुरू आहे', असे ठेवणीतले उत्तर भाजपा नेत्यांकडून दिले जाते. हा सावधपणाचा भाग आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, या मुख्यमंत्र्यांच्या ताज्या वक्तव्याकडे त्यामुळे सावधपणेच पाहावे लागते.

(प्रसिद्धी : लोकमत २४ नोव्हेंबर २०१४)

Wednesday, 12 November 2014

चला, झोपा काढू या.!

सूर्यकांत पळसकर

सरकार बदलल्याने काय होते? राज्यातील सत्ताबदलानंतर निर्माण झालेला हा प्रश्न आहे. सरकारे येतात आणि जातात. लोकांचे प्रश्न आहे तिथेच राहतात. कुठलाही प्रश्न सहजपणो सुटला असे होत नाही. लोकांना संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हीच लोकांची नियती आहे. निद्रिस्त प्रशासन ही लोकशाहीची नियती ठरल्यामुळे संघर्ष अटळ झाला आहे. निद्रिस्त प्रशासनाला जागे कसे करायचे, हा खरा प्रश्न आहे. पैठण तालुक्यातील शेतक:यांनी यावर अनोखा उपाय शोधून काढला. झोपा काढा आंदोलन! पैठण हे गाव जायकवाडी धरणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जायकवाडी हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सध्या धरणात जवळपास 45 टक्के पाणीसाठाही आहे. तरीही धरणाखालील शेतक:यांचे पोहरे रिकामे. प्यायलाही पाणी नाही. जायकवाडीच्या खाली आपेगाव आणि हिरडपुरी ही छोटी धरणो आहेत. जायकवाडीतून सोडलेले पाणी या छोटय़ा धरणांत जाते. तिथून आजूबाजूच्या गावांना मिळते. अगदी सुटसुटीत व्यवस्था. पण प्रशासनाने ती कधीच नीट पार पाडली नाही. यंदाही तेच झाले. पावसाळा उलटून महिना झाला तरी आपेगाव आणि हिरडपुरीसाठी जायकवाडीचे दरवाजे काही उघडले नाही. अर्ज, विनंत्या सारे करून झाले. प्रशासन हलायला तयार नव्हते. त्यावर उपाय म्हणून शेतक:यांनी ‘झोपा काढा आंदोलन’ पुकारले. गोदावरीच्या पाटबंधा:यांची व्यवस्था पाहणा:या कडा कार्यालयासमोर शे-दोनशे शेतकरी चादरी-कांबळी घेऊन विसावले. या आंदोलनाने प्रशासनाची झोप उडविली! दोन दिवसांत पाणी सोडण्याचा आदेश निघाला. हे आंदोलन करणारी शेतकरी संघर्ष समिती आणि समितीचे नेतृत्व करणारे जयाजीराव सूर्यवंशी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ‘लोहा लोहे को काटता है’, असा शोलेतील एक संवाद आहे. पैठणच्या शेतक:यांनी ‘नींद नींद को काटती है’ असा नवा संवाद या निमित्ताने लिहिला आहे.


पैठण आणि गोदावरीचा हा परिसर संतांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. आपेगाव तर साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचे गाव. माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेय, ‘जो रसनेंद्रियाचा अंकिला । का निद्रेसी जीवे विकला । तो नाही एथ म्हणितला । अधिकारिया ।।’ ही ओवी सांगते, जो खाण्याच्या अधीन आहे, जो झोपेला विकला गेला आहे, तो काही खरा अधिकारी म्हणवला जाऊ शकत नाही. माऊलींची ही ओवी ध्यानयोगाच्या अनुषंगाने आली आहे. पण, आपल्या प्रशासकीय व्यवस्थेला ती अगदी तंतोतंत लागू पडते. ही व्यवस्था नजरेसमोर ठेवूनच जणू माऊलींनी ही ओवी लिहिली. प्रशासन हा पैसे खाण्याचा आणि कामे न करता झोपा काढण्याचा उद्योग झाला आहे. शासकीय कार्यालयात बसलेले अधिकारी या उद्योगात प्याद्याचे काम करीत आहेत. या उद्योगाला सुरुंग लावणो अवघड आहे. कारण तो आता एका बलाढय़ व्यवस्थेत रूपांतरित झाला आहे. व्यवस्था ही खरोखरच बलवान असते. मग ती आजची असो अथवा माऊलींच्या काळातील. माऊलींना वाळीत टाकणारे सनातनी एका व्यवस्थेचाच भाग होते. माऊलींनी आळंदीला जड भिंत चालविली, गोदाकाठी रेडय़ाच्या मुखातून वेद बोलविले. पण, याच वेदांचा आधार घेऊन त्यांना छळणा:या व्यवस्थेला ते जागे करू शकले नाहीत. ते जातिबहिष्कृत म्हणून जगले आणि पतितसावित्रिक म्हणून समाधिस्थ झाले. 

शासकीय यंत्रणोच्या चिरनिद्रेचा फटका दुर्बळांना बसतो. आज शेतकरी हा सर्वाधिक दुर्बळ ठरला आहे. त्यामुळे अनास्थेचा पहिला बळी तोच ठरतो. नवे सरकार सत्तेवर येत असताना विदर्भात 6 शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ही आकडेवारी जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील 4; तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एक शेतक:याने आपली जीवनयात्र संपविली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांत येथील शेतक:यांनी भाजपाचे उमेदवार निवडून दिले. भाजपाला केंद्रात आणि राज्यात अशा दोन्ही ठिकाणी सत्ता मिळाली. शेतक:यांना काय मिळाले? गळफास? 

शेतीतील ख:या समस्या समजून घेतल्याशिवाय शेतक:याच्या गळ्यात रुतलेल्या फासाची गाठ सैल होणार नाही. खते आणि बियाणो महाग होत असताना शेतमालाच्या किमती उतरत आहेत. ही शेतीची खरी समस्या आहे. विदर्भ-मराठवाडय़ातील शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके घेतो. या दोन्ही पिकांचे भाव यंदा कोसळले आहेत. गेल्या वर्षी 6 हजार रुपयांच्यावर असलेला कापूस यंदा चार हजारांच्या खाली आला आहे. सत्ता बदलल्याचे हे फळ समजायचे काय? 1995 साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात शेतक:यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले होते. 17 वर्षाच्या मोठय़ा अवकाशानंतर राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे. शेतक:यांत पुन्हा निराशाच दिसून येत आहे. स्वागत कमानींचे गळफास झाले आहेत. शेतक:यांना दिलासा देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागेल. सरकार ते करणार नसेल, तर शेतक:यालाच जागे व्हावे लागेल. पैठणकरांनी आंदोलन आणखी सोपे करून दिले आहे. चादरी आणि कांबळी घेऊन मंत्रलयासमोर झोपा काढायला शेतक:यांनी तयार राहिले पाहिजे. 

नेतृत्वाची पोकळी हे महाराष्ट्रातील शेतीच्या अधोगतीचे प्रमुख कारण असावे. महाराष्ट्रातील शेतक:यांना राज्यव्यापी आवाका असलेला नेताच आजवर मिळालेला नाही. शरद जोशी यांनी शेतक:यांना नेतृत्व देण्याचा प्रय} केला. पण, त्यांचे लक्ष नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांवरच केंद्रित राहिले. त्यांच्यापासून फुटून बाहेर पडलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नजर उसाच्या पलीकडे गेली नाही. आता तर स्वाभिमानीवाल्यांनी भाजपाशी पाट लावून शेतीच्या प्रश्नांपासून फारकतच घेतली आहे. वरील सा:याच नेत्यांचा आवाका छोटा होता. जी काही आंदोलने झाली, ती ऊस आणि द्राक्षांपुरतीच मर्यादित होती. विदर्भ मराठवाडय़ातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक:यांना कोणीही नेता नव्हता. आजही नाही.

Monday, 3 November 2014

रमाबाईनगर ते जवखेडे

सूर्यकांत पळसकर 


ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे. ‘पै पायी काटा नेहटे । तव व्यथा जीवी उमटे । तैसा पोळे संकटे । पुढिलांचेनी ।।’ काटा पायात घुसतो, अश्रू मात्र डोळ्यांत येतात आणि जीव तळमळतो, त्याचप्रमाणे सज्जन मनुष्य दुसऱ्याची दु:खे पाहून तळमळतो. सामाजिक समतेच्या वर्णनासाठी यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण सापडणार नाही. नगर जिल्ह्यातील नेवासे येथे बसून माऊलींनी ही ओवी लिहिली. तोच नगर जिल्हा सध्या जवखेडे खालासा येथील दलित कुटुंबाच्या हत्याकांडाने गाजतो आहे. भर दिवाळीत हे हत्याकांड घडले. येथील संजय जाधव त्यांची पत्नी जयश्री आणि त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुनील यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. हे हत्याकांड इतके निर्घृण आहे की, क्रौर्याच्या साऱ्या उपमा येथे थिट्या पडाव्यात. लज्जेलाही लाज वाटावी अशी ही घटना; पण तिने महाराष्ट्राच्या पोटातील पाणी हलले नाही. दिवाळीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. फटाके उडत राहिले. फराळाची ताटे सजत राहिली. दलित समाजामधून निषेधाचे क्षीण सूर उमटले. उरलेल्या मराठी समाजाच्या मनावर साधा ओरखडाही उमटला नाही. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला ‘दुसऱ्यांच्या संकटांनी पोळणारा’ सज्जनपणा कुठे आहे? की त्याचाही खून झाला आहे?

जवखेडे हत्याकांडानंतर महाराष्ट्राने दाखविलेल्या कोरड्या ढिम्मपणाच्या पार्श्वभूमीवर निर्भया हत्याकांडानंतर उठलेल्या गदारोळाची आठवण टचटचीतपणे समोर येते. महाराष्ट्रापासून दीड हजार किमी दूर असलेल्या दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या देशव्यापी आक्रोशात महाराष्ट्रातील झाडून सारी माध्यमे सहभागी झाली होती. चकचकीतपणा मिरविणारा मराठी मध्यमवर्ग हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरला होता. ही माध्यमे आणि मेणबत्त्यावाले आता कुठे आहेत? दीड हजार किलोमीटर अंतरावरील निर्भयाचा आवाज ऐकून विव्हळ होणाऱ्या मराठी माणसाला आपल्याच गावकुसावरील जवखेडेचा आवाज ऐकू आला नाही. कारण, ही माणसे दलित होती. जगण्याचे जाऊच द्या, मृत्यूची किंमतही येथे समान नाही.


जवखेडेच्या निमित्ताने एक क्रूर योगायोग जुळून आला आहे. ११ जुलै १९९७ रोजी मुंबईच्या घाटकोपर भागातील रमाबाई नगरात दलित हत्याकांड झाले होते. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करणाऱ्या दलितांवर राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी बेछुट गोळीबार केला होता. त्यात १0 दलित ठार झाले होते, तर २६ जखमी झाले होते. ही घटना घडली तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. जवखेडे येथील घटना घडली तेव्हा भाजपाचे सरकार सत्ता हाती घेत आहे. एक विखारी वर्तुळ पूर्ण झाले आहे. या वर्तुळाला रमाबाई नगर आणि जवखेडे असे दोनच बिंदू आहेत, असे मात्र नव्हे. खैरलांजीसह अनेक बिंदूंनी हे वर्तुळ व्यापले आहे. प्रत्येक बिंदूवर क्रौर्याची परिसीमाच दिसून येते.

१९९७ ते २0१४ या सतरा वर्षांच्या काळात महाराष्ट्राने अनेक बदल पाहिले. महाराष्ट्राचे राजकारण, तर पूर्ण ३६0 अंशांत फिरले आहे. रमाबाईनगरातील हत्याकांड घडले तेव्हा दलित संघटना या शिवसेना-भाजपा युतीच्या विरोधात होत्या. आज आठवले यांच्या रूपाने दलित संघटनांमधील एक मोठा घटक भाजपासोबत आहे. दोन निवडणुका त्यांनी एकत्रित लढल्या आणि जिंकल्या आहेत. राज्यात सत्ताबदलही झाला; पण दलितांचे दु:ख मात्र बदलले नाही. अस्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेसारखे ते भळभळतच आहे. जवखेडे खालसा हत्याकांड ही या जखमेची ताजी चिळकांडी आहे. रमाबाई नगरातील हत्याकांडात पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. जवखेडे खालसा प्रकरणात त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही मान्यवर नागरिकांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून तरी हेच वास्तव समोर येत आहे. राज्यात भाजपा सरकारच्या शपथविधीच्या दिवशीच हा अहवाल वर्तमानपत्रांच्या पानांवर झळकला. जवखेडेमधील जाधव कुटुंबाच्या हत्येशी संबंधित आरोपी स्थानिक भाजपा आमदारांचे जवळचे नातेवाईक असल्याने पोलीस कारवाई करण्यास कचरत आहेत, असा स्पष्ट ठपका समितीने ठेवला आहे. नगरचे शिवसेना जिल्हा उपप्रमुखही आरोपींचे जवळचे नातेवाईक असल्याचे समितीने म्हटले आहे. हा अहवाल देणारी नागरी सत्यशोधन समिती सरकारने स्थापन केलेली नाही. त्यामुळे तिला वैधानिक अधिकार नसला, तरी नैतिक अधिकार नक्कीच आहे. समितीवरील सदस्यांची नावे पाहिली, समितीचे नैतिक वजन लक्षात येईल. प्रख्यात साहित्यिक रंगनाथ पाठारे हे समितीवर आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, उत्तम जहागिरदार, सुधाकर कश्यप, फिरोज मिठीबोरवाला, अंजन वेलदूरकर, बेला साखरे यांसारखी समाजाच्या सर्व स्तरांतील मंडळी समितीवर आहे. गावाला भेट देऊन समितीने आपला अहवाल तयार केला आहे. त्याची दखल नव्या सरकारला घ्यावी लागेल. आपली माणसे म्हणून कोणालाही माफी देता येणार नाही.

१९९७च्या रमाबाई नगर हत्याकांडाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधाची धार होती. ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे’ हा शिवसेना-भाजपा युती सरकारच्या अजेंड्यावरील एक प्रमुख मुद्दा होता. हा कायदा रद्द करण्यासाठी युती सरकारने निकराचे प्रयत्नही करून पाहिले. तथापि, जनरेट्यामुळे ते यशस्वी झाले नाहीत. कायदा कायम राहिला; पण त्यामुळे परिस्थिती बदलली नाही. कायदा कायम राहिला म्हणून दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा चिंतेचा मुद्दा आहे; पण सर्वच कायद्यांचा गैरवापर होत आला आहे. मग सगळेच कायदे रद्द करणार का? अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणी मागील कारणे विषमतेत रुतलेली आहेत. इथल्या मातीलाच विषमतेचा वास आहे. या वासाने नगरला माऊलींची ओवी घुसमटली. ही घुसमट इथल्या संपूर्ण समाजाची घुसमट ठरेल, त्या दिवशी समानतेची पहाट उगवेल. तोपर्यंत जवखेडेमागून जवखेडे घडत राहतील.
 (लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)

Wednesday, 22 October 2014

इतिहासाची रंगरंगोटी!

सूर्यकांत पळसकर


केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इतिहासाची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडे रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले आहे. मोदी सरकारला भारताचा संपूर्ण इतिहासच आरएसएसच्या विचारांनी रंगवून घ्यायचा आहे. आधी प्राचीन भारताचा इतिहास रंगविला जाईल, असे दिसते. प्राचीन इतिहास नव्याने लिहिण्यासाठी एक संशोधन प्रकल्प संस्कृत विभागाने जाहीर केला आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधी काही निष्कर्षही विभागाने जाहीर केले आहेत. ‘आर्य हे मूळचे भारतीयच आहेत. ते बाहेरून भारतात आले नसून, भारतातून जगाच्या इतर भागात गेले. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथे सापडलेली प्राचीन सिंधू संस्कृती ही मूळची आर्यांचीच संस्कृती आहे.' हा या निष्कर्षांचा गोषवारा सांगता येईल. इतिहासातील पुरावे पाहून निष्कर्ष काढण्याची प्रथा जगभरातील इतिहासकार पाळतात. दिल्ली विद्यापीठाने मात्र आधी निष्कर्ष जाहीर केले आहेत.


अलीकडेच गुजरातच्या राज्यपालपदी बसलेले भाजपाचे कडवे नेते ओ.पी. कोहली यांच्या खास उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा झाली. ‘इतिहास संशोधना'चा हा प्रकल्प हाती घेण्याची गरज का भासली याची तीन प्रमुख कारणे संस्कृत विभाग प्रमुख रमेश भारद्वाज यांनी जाहीर केली. ती अशी :
१. प्राचीन हस्तलिखिते आणि मजकुरांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संस्कृती ही परकीय संस्कृती नाही हे स्पष्ट होते.
२. फ्रेंच आणि संस्कृत भाषेच्या उच्चारात मोठे साम्य आहे. फ्रेंचमध्ये संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या नियमांचाही प्रत्यय येतो.
३. प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतात. यातून असा निष्कर्ष काढता येतो की, आर्य हे भारतातून जगाच्या इतर भागात स्थलांतरित झाले. 
ऋग्वेद हा संस्कृत भाषेतील सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. त्यापेक्षा कोणतेही प्राचीन हस्तलिखित उपलब्ध नाही. मग, भारद्वाज आणखी कोणत्या प्राचीन हस्तलिखिताबाबत बोलत आहेत? फ्रेंच ही मराठी भाषेप्रमाणेच एक आधुनिक भाषा आहे. मराठी जशी प्राकृतापासून बनली, तशी फें्रच ही व्हल्गर लॅटिनपासून बनली. ऋग्वेदानंतर सुमारे ३  हजार वर्षांनी फ्रेंच भाषा अस्तित्वात आली. व्याकरणकार पाणिनीचा जन्मही ऋग्वेद लिहिला गेल्यानंतर २ हजार वर्षांनी झाला. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, फ्रेंच भाषेचा जन्म झाला तेव्हा संस्कृत भाषा मृत झालेली होती आणि पाणिनीने संस्कृताचे व्याकरण लिहिले तेव्हा फ्रेंच भाषेचा जन्मही झालेला नव्हता! असे असले तरी वैदिक संस्कृत, पाणिनी आणि फ्रेंच भाषा  या तिघांचा मेळ घालण्यात येत आहे. या लोकांच्या पांडित्याला सलामच केला पाहिजे.

‘प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतातङ्क, हे वाक्य भारद्वाज यांनी ‘आपण काही तरी महान शोध लावल्या'च्या थाटात उच्चारलेले दिसते. ही शुद्ध लबाडी आहे. मुळात आर्य आक्रमणाचा सिद्धांतच या भाषिक साम्याच्या पायावर उभा आहे. प्रख्यात जर्मन विद्वान मॅक्समुल्लरने हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला. मॅक्समुल्लर भाषाशास्त्रज्ञ होता. तो संस्कृतच्या अभ्यासासाठी भारतात आला होता. प्राथमिक नात्यासंबंधींच्या शब्दांचा अभ्यास करताना त्याला लॅटिन आणि संस्कृतातील साम्य दिसले. उदा. संस्कृतात आईला मातृ म्हणतात. या शब्दात म, त आणि र हे वर्ण येतात. लॅटीनमध्ये आईला मदर म्हणतात. त्याच्या स्पेलिंगमध्ये म, त आणि र हे तीन वर्णच आहेत. संस्कृतात वडिलांना पितृ आणि भावाला भ्रातृ म्हणतात. लॅटिनमध्ये ही नामे अनुक्रमे फादर आणि ब्रदर अशी आहेत. या शब्दांतही वर्णांचे पूर्णतः साम्य आहे. इतरही अनेक समान वर्ण असलेले शब्द त्याला आढळून आले. त्यातून मॅक्समुल्लरने आर्यआक्रमणाचा सिद्धांत मांडला. याच साम्याचा आधार घेऊन दिल्ली विद्यापीठाचा संस्कृत विभाग (पर्यायाने मोदी सरकार) आता ‘आर्य हे भारतातून बाहेर गेले', असा निष्कर्ष काढणार आहे.

मॅक्समुल्लरने भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये एक पॅटर्न शोधून काढला. या भाषांनी दोन वर्तुळे केली आहेत. मधल्या भागात हिंदी आणि तिच्या बोली भाषांचे वर्तुळ असून, बाहेरच्या बाजूने पंजाबी, सिंधी, काश्मिरी, गुजराथी, मराठी, उडिया, बंगाली, आसामी, नेपाळी या प्रादेशिक भाषांचे वर्तुळ आहे. या सर्व भाषा एकमेकांच्या बहिणी आहेत!  या पॅटर्नमधून मॅक्समुल्लरने अंतर्वर्तुळ-बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला. आर्यांनी भारतात टोळ्या टोळ्यांनी असंख्य आक्रमणे केली. आधी आलेल्या टोळ्या सप्तसिंधूंच्या प्रदेशात स्थिर झाल्या होत्या; मात्र नंतर आलेल्या टोळ्यांनी त्यांना गंगेच्या खो-यापर्यंत खाली ढकलले. मागाहून आलेल्या टोळ्यांनी आधी आलेल्या टोळ्यांच्या भोवती कडे केले. मधल्या भागातील आर्यांच्या भाषेतून हिंदी आणि तिच्या बोली भाषा तयार झाल्या, तर बाहेर कडे करून राहिलेल्या आर्यांच्या भाषांतून प्रादेशिक भाषा तयार झाल्या, असे मॅक्समुल्लर म्हणतो. आर्य इथलेच आहेत, असा दावा करायचा असेल, तर मॅक्समुल्लरचा हा सिद्धांत खोडून काढावा लागेल. 
हडप्पा येथील उत्खननात सापडलेला बैलाची मुद्रा असलेला शिक्का.  
आणखीही अनेक मुद्दे आहेत. सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. या उलट ऋग्वेदातील आर्यांच्या संस्कृतीला घोड्याशिवाय अस्तित्वच नाही. सिंधू संस्कृती शहरांची संस्कृती आहे. या उलट भटक्या आर्यांचा मुख्य देव इंद्र हा ‘पुरंदर' म्हणजे शहरे उद्ध्वस्त करणारा आहे. सिंधू संस्कृतीत शेती होत होती; त्यामुळे कालवे आणि धरणे होती. इंद्र मात्र बांधलेले कालवे उद्ध्वस्त करणारा आहे. वृत्रासुराला मारून इंद्राने सप्तसिंधूंचे पाणी मुक्त केले, अशी वर्णने ऋग्वेदात आहेत. अशा प्रकारे या दोन्ही संस्कृतींचे मूळ रंगरूप कुठल्याच बाबतीत जुळत नाही. 

Thursday, 16 October 2014

गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!

गांधीजींना पुरस्कार न देणाऱ्या नोबेल समितीला सारे गुन्हे माफ..!

-सूर्यकांत पळसकर


बायबलमध्ये एका प्रसंगात शास्त्रांचा हवाला देत येशू म्हणतो की, ‘गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!' उपेक्षेचे धनी असलेल्यांसाठी हे वचन प्रेरणादायी ठरावे. बालमजुरी आणि मुलांच्या शोषणाविरुद्ध काम करणारे गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा या वचनाची प्रकर्षाने आठवण झाली. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानातील मलाला युसूफझई या तरुणीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे मलालाचे नाव जगातील कानाकोप-यात आधीच दुमदुमत होते. कैलाश सत्यार्थी मात्र भारतातही कोणाला माहिती नव्हते! त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला- कोण हे सत्यार्थी? नोबेल पुरस्कार मिळविण्याएवढे प्रचंड काम करणारा हा माणूस खरेच भारतात राहतो का? राहत असेल, तर आपल्याला कसा काय माहिती नाही? हा माणूस कधी टीव्हीवर दिसला नाही. वृत्तपत्रांतून झळकला नाही. सरकारी पुरस्कारांच्या यादीत कधी दिसला नाही. समाजसेवकांच्या भाऊगर्दीतही नजरेस आला नाही. अचानक त्याचे नाव नोबेलच्या पुरस्कारातच दिसले. अरे आहे तरी कोण हा माणूस?

नोबेलविजेत्या नायकाचे साधे नावही माहिती नसणे, हा काही लोकांचा दोष नाही. सकारात्मक काम करणा-यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणा-या व्यवस्थेचा हा दोष आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्यावरही शेकड्याने पुस्तके लिहिणारी, नाटके-सिनेमे काढणारी ही व्यवस्था गांधीवादी कैलाश सत्यार्थी यांना अनुल्लेखाने मारत राहिली. त्यामुळे त्यांचे नाव कोणाला माहिती असण्याचे कारणच नव्हते.

संस्कृतात भवभूती नावाचा एक मोठा नाटककार आहे. त्याच्या नाटकांना त्याच्या हयातीत कधी लोकमान्यता मिळाली नाही. लोकमान्यता नाही म्हणून भवभूती खंत करीत बसला नाही. व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून तो लिहीत राहिला. जाताना सांगून गेला, ‘पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे. कधी तरी, कोठे तरी माझ्या नाटकांना मान्यता मिळेलच!' आज भवभूती खरोखरच मोठा नाटककार म्हणून ओळखला जातो. भवभूतीचे वचन सत्यार्थी यांच्या नोबेलने पुन्हा एकदा खरे ठरले. भारतीय व्यवस्थेने नाकारलेला हा चौकोनी चिरा नोबेलवाल्यांनी हेरला. आज तो खरोखरच कोनशिला झाला आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोनशिला होण्याची क्षमता असतानाही उपेक्षेच्या लाथा खाणाèयांची संख्या भारतात मोठी आहे. सगळ्यांचेच नशीब कैलाश सत्यार्थी यांच्यासारखे बलदंड नसते.

कैलाश सत्यार्थी यांना नोबेलच्या आधी जवळपास १२ पुरस्कार मिळाले असल्याचे आता समोर आले आहे. दुर्मिळ योगायोग पाहा, यातील एकही पुरस्कार भारतातील नाही. सगळे पुरस्कार युरोप आणि अमेरिकेतील आहेत. तेथील विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्था यांनी हे पुरस्कार दिले आहेत. इंजिनिअर असलेल्या सत्यार्थी यांनी १९८० साली प्राध्यापकीला रामराम ठोकून ‘बचपन बचाओ आंदोलना'ची सुरुवात केली. १९८० ते २०१४ या ३४ वर्षांच्या काळात भारतात डावे-उजवे, सेक्युलर, हिंदुत्ववादी अशा सर्व पंथीयांची सरकारे आली. यापैकी कोणत्याही सरकारला त्यांच्या कार्याची महती कळाली नाही. या काळात पद्म आणि इतर पुरस्कार किती दिले गेले, याचा हिशेब काढणे अवघड आहे; पण यातील एकाही पुरस्कारावर सत्यार्थी यांचे नाव कोरले गेले नाही. भारत सरकारच्या पुरस्कारांतून इतकी वर्षे ‘सत्य' हरवत राहिले. तेच नोबेलवाल्यांना सापडले.

खरे कार्यकर्ते पुरस्कारांसाठी काम करीत नसतात, हे खरे असले तरी पुरस्कार कार्यकत्र्यांना हुरूप देतात. समाजाने कामाची दिलेली ती पोचपावती असते. सत्यार्थी यांच्या कामाची पोचपावती भारतीय समाजाने दिली नाही. पण, म्हणून सत्यार्थी यांचे काम थांबले नाही. ३४ वर्षांच्या काळात जगभरातील १४४ देशांत त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढविला. हा संपूर्ण कालखंड सोपा मात्र नव्हता. या काळात त्यांच्यावर दोन प्राणघातक हल्ले झाले.

सत्यार्थी आणि मलाला यांच्या नोबेल पारितोषिकाने दोन्ही देशांत एक विचित्र योगायोग जुळवून आणला आहे. पाकिस्तान पूर्णतः कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे, तर भारतात कट्टरपंथीयांची घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत गांधीजींनी सांगितलेल्या शांतता आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जाणा-या या दोघांना नोबेल जाहीर झाले आहे. पाकिस्तानच्या मातीला सहिष्णुतेचा जागर तसाही अपरिचितच आहे. भारताचे मात्र तसे नाही. इथल्या मातीला बापूंच्या सहिष्णुतेचा सुगंध आहे. गांधीजींची हत्या होऊन ६६ वर्षे झाली. या संपूर्ण काळात गांधीविचार गाडून टाकण्यासाठी जातीय शक्तींनी आपले सर्व ‘चाणक्य' कामाला लावले होते. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर ‘चाणक्यां'च्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण हाय रे दैवा! गांधींचा विचार नोबेलचा धुमारा घेऊन पुन्हा जमिनीतून वर आला आणि त्याचे स्वागत करण्याची पाळी ‘चाणक्यां'वर आली. काव्यगत न्यायाचे यापेक्षा बळिवंत उदाहरण जगाच्या इतिहासात बहुधा सापडणार नाही. कट्टरपंथीयांच्या दृष्टीने मलाला आणि सत्यार्थी यांचे देश आणि धर्म एकमेकांचे शत्रू आहेत. तरीही दोघांचे मिशन एक होते आणि मार्गही एकच होता. बापूंचा शांतीमार्ग. नोबेल पुरस्काराने आता त्यांना कायमस्वरूपी एकत्र आणले. भविष्यात जेव्हा जेव्हा सत्यार्थी यांचे नाव घेतले जाईल, तेव्हा तेव्हा मलालाचीही आठवण होईल. तसेच मलालाच्या आठवणीसोबत सत्यार्थींचे नावही ओठांवर येईल. दोन्ही देश आणि दोन्ही धर्मांनी शिक्षणासाठी तसेच दहशतवादाच्या विरुद्ध काम करावे, अशी अपेक्षा नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना व्यक्त केली आहे. ती अनाठायी नाही.

अनेक वेळा नामांकन होऊनही नोबेल समितीने महात्मा गांधी यांना नोबेल दिले नाही. भारतातील एका साध्या गांधीवाद्याला शेवटी हा पुरस्कार त्यांनी दिला. नोबेल समितीला सर्व गुन्हे माफ..!

(लेखक लोकमत, औरंगाबादमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
प्रसिद्धी : लोकमत १५ ऑक्टोबर २०१४ 


या विषयावरील सर्व लेख 

Thursday, 2 October 2014

गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

१ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त लोकमतच्या
संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला माझा लेख.… 

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश
देणारी तीन माकडे  गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली
आहेत, हे कोणालाच माहिती नसते.
सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता', व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट' आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथ्यामधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणारया या तिन्ही विचारांत अद्वैैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवन आकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारांवर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढ्याचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअलङ्क या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तकङ्क अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीताङ्क हे पुस्तक आणि ‘सत्यङ्क हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडून घेतला. 

गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २० ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसèया गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.ङ्क 
जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदयङ्क या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी : 
१. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. 
२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे. 
३. साधे अंगमेहनतीचे शेतकèयाचे जीवन हेच खरे जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे।।' हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वतःचा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ।।' असे वचन लिहून जातात. 

तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला. 

‘गीता' आणि ‘अन्टू धिस लास्ट' या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे : 

पापाची वासना नको दावू डोळा।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । 
बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।...

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसèयाच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी. अअर्ध्या  जगावर राज्य असलेल्या इंग्रजांशी लढताना महात्मा गांधी यांनी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला नाही. त्याऐवजी सत्याग्रह आणि उपोषण ही नवी हत्यारे त्यांनी वापरली. ही हत्यारे गांधीजींनी तुकोबांकडूनच घेतली आहेत.  

-सूर्यकांत पळसकर
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)


लोकमतच्या वेब साईटवर लेखाची लिंक :
गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ