Showing posts with label ययाति. Show all posts
Showing posts with label ययाति. Show all posts

Friday, 6 September 2013

स्वत:च्या मातेसोबतही एकांतात बसू नये!

सूर्यकान्त पळसकर 

वादग्रस्त साधू आसाराम बापू यांना एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक झाली. आसाराम हे त्या मुलीला घेऊन दीड तास एकांतात होते, अशी माहिती तपासातून समोर आली. त्याचे समर्थन करताना, आसाराम यांनी म्हटले की, ‘‘आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत एकांतात बसण्यात वाईट ते काय?'' 
विविध आखाड्यांच्या महंतांनी आसाराम यांच्या एकूणच वागणुकीला आक्षेप घेतला. दुसरे एक वादग्रस्त साधू रामेदव बाबा यांनी आसाराम यांना थेट विरोध केला नाही. पण त्यांनी धर्मशास्त्राचा हवाला देऊन एक वक्तव्य केले. रामदेव बाबा म्हणाले की, ‘‘साधूंनी स्त्रियांसोबत एकांतात बसू नये. साधूंनीच नव्हे, सर्वांनीच ही खबरदारी घ्यायला हवी. आपली माता, सासू, बहीण, मुलगी यांच्यासोबतही एकांतात बसू नये, असे धर्मशास्त्र सांगते.'' 

 रामदेव बाबा यांनी ज्या धर्मनियमाचा हवाला येथे दिला आहे, त्याचा उगम वैष्णव पंथियांचा मुख्य धर्मग्रंथ असलेल्या श्रीमद्भागवतात आहे. राजा ययातिच्या तोंडी हा नियम आला आहे. राजा ययातिची गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ती पुन्हा येथे देत नाही. आपले म्हातारपण आपला धाकटा मुलगा पुरू याला देऊन तसेच त्याचे तारुण्य स्वत:कडे घेऊन ययाति कित्येक वर्षे लैंगिक सुखाचा उपभोग घेतो. लैंगिक सुख कितीही उपभोगले तरी मन भरत नाही, याची जाणीव शेवटी त्याला होते. तेव्हा तो पुरूचे तारुण्य त्याला परत करण्याचा व स्वत: सर्व:संग परित्याग करून वानप्रस्थ स्वीकारण्याचा निर्णय घेतो. आपला हा निर्णय तो आपली पत्नी भृगुनंदिनी देवयानी हिला सांगतो. यावेळी तो तिला मोठा उपदेश करतो. या उपदेशात माणसाच्या लैंगिक सुखाच्या तृष्णेविषयी दोन श्लोक आहेत. त्यात वरील नियम आला आहे. 

ययातिच्या तोंडी असलेले भागवतातील मूळ श्लोक असे : 

या दुस्त्यजा दुर्मीतिभिर्जीर्यतो या न जीर्यते । 
तां तृष्णा दु:खनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत ।। 
मात्रा स्वस्त्रा दुहिता वा नाविविक्तासनो भवते । 
बलवानिन्द्रियग्रामो विद्वासंसपि कर्षति ।। 
श्रीमद्भावगत, स्कंध : ९, अध्याय १९, श्लोक : १६ आणि १७. 

या श्लोकांचा अर्थ असा  : 
लैंगिक सुखाची तहान ही सर्व दु:खांचे उगमस्थान आहे. मंदबुद्धीचे लोक या तृष्णेचा त्याग करू शकत नाहीत. शरीर म्हातारे होते, पण लैंगिक सुखाची तृष्णा नित्य नवी होत जाते. ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे, त्याने लैंगिक तृष्णेचा त्वरित त्याग करायला हवा. ।।१६।। 
आपली माता, बहीण आणि कन्येसोबतही एकांत स्थानी एका आसनावर बसू खेटून बसू नये. इंद्रिये बलवान असतात. मोठमोठ्या विद्वानांनाही ती विचलित करतात. ।।१७।। 

शरीर म्हातारे झाले तरी शरीर सुखाची तहान म्हातारी होत नाही, उलट तिला नवे धुमारे फुटत राहतात, हा पहिल्या श्लोकातील उपदेश आसाराम बापू यांच्या वयाच्या पाश्र्वभूमीवर प्रभावी ठरावा. आसाराम यांचे वय आता ७१ वर्षांचे आहे. १६-१७ वर्षांच्या मुलीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इंद्रिये बलवान असतात, मोठमोठ्या विद्वानांनाही ती विचलित करतात, हे खरेच नाही का?