Wednesday, 22 October 2014

इतिहासाची रंगरंगोटी!

सूर्यकांत पळसकर


केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इतिहासाची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडे रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले आहे. मोदी सरकारला भारताचा संपूर्ण इतिहासच आरएसएसच्या विचारांनी रंगवून घ्यायचा आहे. आधी प्राचीन भारताचा इतिहास रंगविला जाईल, असे दिसते. प्राचीन इतिहास नव्याने लिहिण्यासाठी एक संशोधन प्रकल्प संस्कृत विभागाने जाहीर केला आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधी काही निष्कर्षही विभागाने जाहीर केले आहेत. ‘आर्य हे मूळचे भारतीयच आहेत. ते बाहेरून भारतात आले नसून, भारतातून जगाच्या इतर भागात गेले. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथे सापडलेली प्राचीन सिंधू संस्कृती ही मूळची आर्यांचीच संस्कृती आहे.' हा या निष्कर्षांचा गोषवारा सांगता येईल. इतिहासातील पुरावे पाहून निष्कर्ष काढण्याची प्रथा जगभरातील इतिहासकार पाळतात. दिल्ली विद्यापीठाने मात्र आधी निष्कर्ष जाहीर केले आहेत.


अलीकडेच गुजरातच्या राज्यपालपदी बसलेले भाजपाचे कडवे नेते ओ.पी. कोहली यांच्या खास उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा झाली. ‘इतिहास संशोधना'चा हा प्रकल्प हाती घेण्याची गरज का भासली याची तीन प्रमुख कारणे संस्कृत विभाग प्रमुख रमेश भारद्वाज यांनी जाहीर केली. ती अशी :
१. प्राचीन हस्तलिखिते आणि मजकुरांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संस्कृती ही परकीय संस्कृती नाही हे स्पष्ट होते.
२. फ्रेंच आणि संस्कृत भाषेच्या उच्चारात मोठे साम्य आहे. फ्रेंचमध्ये संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या नियमांचाही प्रत्यय येतो.
३. प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतात. यातून असा निष्कर्ष काढता येतो की, आर्य हे भारतातून जगाच्या इतर भागात स्थलांतरित झाले. 
ऋग्वेद हा संस्कृत भाषेतील सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. त्यापेक्षा कोणतेही प्राचीन हस्तलिखित उपलब्ध नाही. मग, भारद्वाज आणखी कोणत्या प्राचीन हस्तलिखिताबाबत बोलत आहेत? फ्रेंच ही मराठी भाषेप्रमाणेच एक आधुनिक भाषा आहे. मराठी जशी प्राकृतापासून बनली, तशी फें्रच ही व्हल्गर लॅटिनपासून बनली. ऋग्वेदानंतर सुमारे ३  हजार वर्षांनी फ्रेंच भाषा अस्तित्वात आली. व्याकरणकार पाणिनीचा जन्मही ऋग्वेद लिहिला गेल्यानंतर २ हजार वर्षांनी झाला. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, फ्रेंच भाषेचा जन्म झाला तेव्हा संस्कृत भाषा मृत झालेली होती आणि पाणिनीने संस्कृताचे व्याकरण लिहिले तेव्हा फ्रेंच भाषेचा जन्मही झालेला नव्हता! असे असले तरी वैदिक संस्कृत, पाणिनी आणि फ्रेंच भाषा  या तिघांचा मेळ घालण्यात येत आहे. या लोकांच्या पांडित्याला सलामच केला पाहिजे.

‘प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतातङ्क, हे वाक्य भारद्वाज यांनी ‘आपण काही तरी महान शोध लावल्या'च्या थाटात उच्चारलेले दिसते. ही शुद्ध लबाडी आहे. मुळात आर्य आक्रमणाचा सिद्धांतच या भाषिक साम्याच्या पायावर उभा आहे. प्रख्यात जर्मन विद्वान मॅक्समुल्लरने हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला. मॅक्समुल्लर भाषाशास्त्रज्ञ होता. तो संस्कृतच्या अभ्यासासाठी भारतात आला होता. प्राथमिक नात्यासंबंधींच्या शब्दांचा अभ्यास करताना त्याला लॅटिन आणि संस्कृतातील साम्य दिसले. उदा. संस्कृतात आईला मातृ म्हणतात. या शब्दात म, त आणि र हे वर्ण येतात. लॅटीनमध्ये आईला मदर म्हणतात. त्याच्या स्पेलिंगमध्ये म, त आणि र हे तीन वर्णच आहेत. संस्कृतात वडिलांना पितृ आणि भावाला भ्रातृ म्हणतात. लॅटिनमध्ये ही नामे अनुक्रमे फादर आणि ब्रदर अशी आहेत. या शब्दांतही वर्णांचे पूर्णतः साम्य आहे. इतरही अनेक समान वर्ण असलेले शब्द त्याला आढळून आले. त्यातून मॅक्समुल्लरने आर्यआक्रमणाचा सिद्धांत मांडला. याच साम्याचा आधार घेऊन दिल्ली विद्यापीठाचा संस्कृत विभाग (पर्यायाने मोदी सरकार) आता ‘आर्य हे भारतातून बाहेर गेले', असा निष्कर्ष काढणार आहे.

मॅक्समुल्लरने भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये एक पॅटर्न शोधून काढला. या भाषांनी दोन वर्तुळे केली आहेत. मधल्या भागात हिंदी आणि तिच्या बोली भाषांचे वर्तुळ असून, बाहेरच्या बाजूने पंजाबी, सिंधी, काश्मिरी, गुजराथी, मराठी, उडिया, बंगाली, आसामी, नेपाळी या प्रादेशिक भाषांचे वर्तुळ आहे. या सर्व भाषा एकमेकांच्या बहिणी आहेत!  या पॅटर्नमधून मॅक्समुल्लरने अंतर्वर्तुळ-बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला. आर्यांनी भारतात टोळ्या टोळ्यांनी असंख्य आक्रमणे केली. आधी आलेल्या टोळ्या सप्तसिंधूंच्या प्रदेशात स्थिर झाल्या होत्या; मात्र नंतर आलेल्या टोळ्यांनी त्यांना गंगेच्या खो-यापर्यंत खाली ढकलले. मागाहून आलेल्या टोळ्यांनी आधी आलेल्या टोळ्यांच्या भोवती कडे केले. मधल्या भागातील आर्यांच्या भाषेतून हिंदी आणि तिच्या बोली भाषा तयार झाल्या, तर बाहेर कडे करून राहिलेल्या आर्यांच्या भाषांतून प्रादेशिक भाषा तयार झाल्या, असे मॅक्समुल्लर म्हणतो. आर्य इथलेच आहेत, असा दावा करायचा असेल, तर मॅक्समुल्लरचा हा सिद्धांत खोडून काढावा लागेल. 
हडप्पा येथील उत्खननात सापडलेला बैलाची मुद्रा असलेला शिक्का.  
आणखीही अनेक मुद्दे आहेत. सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. या उलट ऋग्वेदातील आर्यांच्या संस्कृतीला घोड्याशिवाय अस्तित्वच नाही. सिंधू संस्कृती शहरांची संस्कृती आहे. या उलट भटक्या आर्यांचा मुख्य देव इंद्र हा ‘पुरंदर' म्हणजे शहरे उद्ध्वस्त करणारा आहे. सिंधू संस्कृतीत शेती होत होती; त्यामुळे कालवे आणि धरणे होती. इंद्र मात्र बांधलेले कालवे उद्ध्वस्त करणारा आहे. वृत्रासुराला मारून इंद्राने सप्तसिंधूंचे पाणी मुक्त केले, अशी वर्णने ऋग्वेदात आहेत. अशा प्रकारे या दोन्ही संस्कृतींचे मूळ रंगरूप कुठल्याच बाबतीत जुळत नाही. 

Thursday, 16 October 2014

गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!

गांधीजींना पुरस्कार न देणाऱ्या नोबेल समितीला सारे गुन्हे माफ..!

-सूर्यकांत पळसकर


बायबलमध्ये एका प्रसंगात शास्त्रांचा हवाला देत येशू म्हणतो की, ‘गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!' उपेक्षेचे धनी असलेल्यांसाठी हे वचन प्रेरणादायी ठरावे. बालमजुरी आणि मुलांच्या शोषणाविरुद्ध काम करणारे गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा या वचनाची प्रकर्षाने आठवण झाली. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानातील मलाला युसूफझई या तरुणीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे मलालाचे नाव जगातील कानाकोप-यात आधीच दुमदुमत होते. कैलाश सत्यार्थी मात्र भारतातही कोणाला माहिती नव्हते! त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला- कोण हे सत्यार्थी? नोबेल पुरस्कार मिळविण्याएवढे प्रचंड काम करणारा हा माणूस खरेच भारतात राहतो का? राहत असेल, तर आपल्याला कसा काय माहिती नाही? हा माणूस कधी टीव्हीवर दिसला नाही. वृत्तपत्रांतून झळकला नाही. सरकारी पुरस्कारांच्या यादीत कधी दिसला नाही. समाजसेवकांच्या भाऊगर्दीतही नजरेस आला नाही. अचानक त्याचे नाव नोबेलच्या पुरस्कारातच दिसले. अरे आहे तरी कोण हा माणूस?

नोबेलविजेत्या नायकाचे साधे नावही माहिती नसणे, हा काही लोकांचा दोष नाही. सकारात्मक काम करणा-यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणा-या व्यवस्थेचा हा दोष आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्यावरही शेकड्याने पुस्तके लिहिणारी, नाटके-सिनेमे काढणारी ही व्यवस्था गांधीवादी कैलाश सत्यार्थी यांना अनुल्लेखाने मारत राहिली. त्यामुळे त्यांचे नाव कोणाला माहिती असण्याचे कारणच नव्हते.

संस्कृतात भवभूती नावाचा एक मोठा नाटककार आहे. त्याच्या नाटकांना त्याच्या हयातीत कधी लोकमान्यता मिळाली नाही. लोकमान्यता नाही म्हणून भवभूती खंत करीत बसला नाही. व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून तो लिहीत राहिला. जाताना सांगून गेला, ‘पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे. कधी तरी, कोठे तरी माझ्या नाटकांना मान्यता मिळेलच!' आज भवभूती खरोखरच मोठा नाटककार म्हणून ओळखला जातो. भवभूतीचे वचन सत्यार्थी यांच्या नोबेलने पुन्हा एकदा खरे ठरले. भारतीय व्यवस्थेने नाकारलेला हा चौकोनी चिरा नोबेलवाल्यांनी हेरला. आज तो खरोखरच कोनशिला झाला आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोनशिला होण्याची क्षमता असतानाही उपेक्षेच्या लाथा खाणाèयांची संख्या भारतात मोठी आहे. सगळ्यांचेच नशीब कैलाश सत्यार्थी यांच्यासारखे बलदंड नसते.

कैलाश सत्यार्थी यांना नोबेलच्या आधी जवळपास १२ पुरस्कार मिळाले असल्याचे आता समोर आले आहे. दुर्मिळ योगायोग पाहा, यातील एकही पुरस्कार भारतातील नाही. सगळे पुरस्कार युरोप आणि अमेरिकेतील आहेत. तेथील विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्था यांनी हे पुरस्कार दिले आहेत. इंजिनिअर असलेल्या सत्यार्थी यांनी १९८० साली प्राध्यापकीला रामराम ठोकून ‘बचपन बचाओ आंदोलना'ची सुरुवात केली. १९८० ते २०१४ या ३४ वर्षांच्या काळात भारतात डावे-उजवे, सेक्युलर, हिंदुत्ववादी अशा सर्व पंथीयांची सरकारे आली. यापैकी कोणत्याही सरकारला त्यांच्या कार्याची महती कळाली नाही. या काळात पद्म आणि इतर पुरस्कार किती दिले गेले, याचा हिशेब काढणे अवघड आहे; पण यातील एकाही पुरस्कारावर सत्यार्थी यांचे नाव कोरले गेले नाही. भारत सरकारच्या पुरस्कारांतून इतकी वर्षे ‘सत्य' हरवत राहिले. तेच नोबेलवाल्यांना सापडले.

खरे कार्यकर्ते पुरस्कारांसाठी काम करीत नसतात, हे खरे असले तरी पुरस्कार कार्यकत्र्यांना हुरूप देतात. समाजाने कामाची दिलेली ती पोचपावती असते. सत्यार्थी यांच्या कामाची पोचपावती भारतीय समाजाने दिली नाही. पण, म्हणून सत्यार्थी यांचे काम थांबले नाही. ३४ वर्षांच्या काळात जगभरातील १४४ देशांत त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढविला. हा संपूर्ण कालखंड सोपा मात्र नव्हता. या काळात त्यांच्यावर दोन प्राणघातक हल्ले झाले.

सत्यार्थी आणि मलाला यांच्या नोबेल पारितोषिकाने दोन्ही देशांत एक विचित्र योगायोग जुळवून आणला आहे. पाकिस्तान पूर्णतः कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे, तर भारतात कट्टरपंथीयांची घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत गांधीजींनी सांगितलेल्या शांतता आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जाणा-या या दोघांना नोबेल जाहीर झाले आहे. पाकिस्तानच्या मातीला सहिष्णुतेचा जागर तसाही अपरिचितच आहे. भारताचे मात्र तसे नाही. इथल्या मातीला बापूंच्या सहिष्णुतेचा सुगंध आहे. गांधीजींची हत्या होऊन ६६ वर्षे झाली. या संपूर्ण काळात गांधीविचार गाडून टाकण्यासाठी जातीय शक्तींनी आपले सर्व ‘चाणक्य' कामाला लावले होते. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर ‘चाणक्यां'च्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण हाय रे दैवा! गांधींचा विचार नोबेलचा धुमारा घेऊन पुन्हा जमिनीतून वर आला आणि त्याचे स्वागत करण्याची पाळी ‘चाणक्यां'वर आली. काव्यगत न्यायाचे यापेक्षा बळिवंत उदाहरण जगाच्या इतिहासात बहुधा सापडणार नाही. कट्टरपंथीयांच्या दृष्टीने मलाला आणि सत्यार्थी यांचे देश आणि धर्म एकमेकांचे शत्रू आहेत. तरीही दोघांचे मिशन एक होते आणि मार्गही एकच होता. बापूंचा शांतीमार्ग. नोबेल पुरस्काराने आता त्यांना कायमस्वरूपी एकत्र आणले. भविष्यात जेव्हा जेव्हा सत्यार्थी यांचे नाव घेतले जाईल, तेव्हा तेव्हा मलालाचीही आठवण होईल. तसेच मलालाच्या आठवणीसोबत सत्यार्थींचे नावही ओठांवर येईल. दोन्ही देश आणि दोन्ही धर्मांनी शिक्षणासाठी तसेच दहशतवादाच्या विरुद्ध काम करावे, अशी अपेक्षा नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना व्यक्त केली आहे. ती अनाठायी नाही.

अनेक वेळा नामांकन होऊनही नोबेल समितीने महात्मा गांधी यांना नोबेल दिले नाही. भारतातील एका साध्या गांधीवाद्याला शेवटी हा पुरस्कार त्यांनी दिला. नोबेल समितीला सर्व गुन्हे माफ..!

(लेखक लोकमत, औरंगाबादमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
प्रसिद्धी : लोकमत १५ ऑक्टोबर २०१४ 


या विषयावरील सर्व लेख 

Wednesday, 15 October 2014

नोबेल, गांधी आणि सत्यार्थी!

नोबेल पारितोषिक पावन झाले 

-सूर्यकांत पळसकर 

महात्मा गांधी यांना ६ वेळा नॉमिनेशन मिळूनही नोबेल पारितोषिक नाकारण्याचे पाप नोबेल समितीने केले होते. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल देऊन आता समितीने या पापाचे क्षाळण केले, असे समजायला हरकत नाही. कैलाश सत्यार्थी हे गांधीवादी आहेत. या पूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्युथर किंग, तिबेटींचे नेते दलाई लामा, म्यानमारच्या लोकशाहीवादी  नेत्या ऑन सॉन स्यू की या गांधीवाद्यांना नोबेल मिळाले आहे. पण हे सारे विदेशी होते. कैलाश सत्यार्थी यांच्या रूपाने भारतीय गांधीवाद्यालाही हा पुरस्कार आता मिळाला. एवढे नोबेल मिळविणारा गांधीविचार हा जगातील एकमेव विचार आहे.

१९३७ साली गांधीजींचे पहिल्यांदा नोबेलसाठी नॉमिनेशन झाले. त्यापुढच्या सलग दोन वर्षी त्यांना पुन्हा नॉमिनेशन मिळाले. १९४७ सालीही त्यांना नॉमिनेशन मिळाले. पण प्रत्येकवेळी समितीने त्यांना पारितोषिक नाकारले. गांधी हे विचारांनी "राष्ट्रवादी" आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दैवदुर्विलास पाहा, गांधी हे "राष्ट्रवादी" नाहीत, असा आरोप करीत नथुराम गोडसे याने त्यांची पुढच्याच वर्षी हत्या केली. गांधीजींचे व्यक्तिमत्व इतके बहुआयामी होते की, रुढ विचारांच्या चौकटीत ते बसतच नव्हते. म्हणूनच नोबेलवाल्यांना ते कडवट राष्ट्रवादी वाटत होते, तर हिन्दुत्वाद्यांना ते राष्ट्रवादी वाटतच नव्हते.

गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९४८ साली त्यांना मरणोत्तर नोबेल देण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला होता. पण, त्यात नियम आडवे आले. गांधीजींचा कोणत्याही संघटनेशी कायदेशीरित्या संबंध नव्हता. कोणत्याही संघटनेचे साधे सदस्यत्वही त्यांच्या नावे नव्हते. त्यांच्या मागे कोणतीही संपत्ती नव्हती. कोणत्याही बँकेत खाते नव्हते. त्यांनी मृत्यूपत्र केलेले नव्हते; त्यामुळे त्यांना कोणी रितसर वारसच नव्हता. मग नोबेलचे स्मृतीचिन्ह आणि रक्कम देणार कोणाला? गांधींचे हे नोबेलही हुकले. पण नोबेल समितीने एक केले, त्या वर्षी कोणालाच नोबेल दिले नाही. "शांततेचे नोबेल पारितोषिक देता येईल, असा कोणीही जिवंत माणूस पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही", असे नोबेल समितीने त्या वर्षी जाहीर केले. ही गांधीजींना श्रद्धांजलीच होती.

पण, बरेच झाले, गांधींना नोबेल मिळाले नाही ते. संतवृत्तीने जगलेल्या या महापुरुषाने आयुष्यात सर्व प्रकारच्या लौकिक उपाध्या नाकारल्या. नियतीने त्यांना नोबेलच्या उपाधीपासूनही दूर ठेवले. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल मिळाल्याने गांधीजींच्या विचारांचा विजय झाला आहे. आज नोबेल पारितोषिकही पावन झाले आहे. 

Thursday, 2 October 2014

गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

१ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त लोकमतच्या
संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला माझा लेख.… 

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश
देणारी तीन माकडे  गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली
आहेत, हे कोणालाच माहिती नसते.
सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता', व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट' आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथ्यामधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणारया या तिन्ही विचारांत अद्वैैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवन आकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारांवर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढ्याचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअलङ्क या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तकङ्क अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीताङ्क हे पुस्तक आणि ‘सत्यङ्क हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडून घेतला. 

गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २० ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसèया गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.ङ्क 
जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदयङ्क या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी : 
१. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. 
२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे. 
३. साधे अंगमेहनतीचे शेतकèयाचे जीवन हेच खरे जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे।।' हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वतःचा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ।।' असे वचन लिहून जातात. 

तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला. 

‘गीता' आणि ‘अन्टू धिस लास्ट' या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे : 

पापाची वासना नको दावू डोळा।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । 
बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।...

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसèयाच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी. अअर्ध्या  जगावर राज्य असलेल्या इंग्रजांशी लढताना महात्मा गांधी यांनी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला नाही. त्याऐवजी सत्याग्रह आणि उपोषण ही नवी हत्यारे त्यांनी वापरली. ही हत्यारे गांधीजींनी तुकोबांकडूनच घेतली आहेत.  

-सूर्यकांत पळसकर
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)


लोकमतच्या वेब साईटवर लेखाची लिंक :
गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

Friday, 2 May 2014

मोहन अब्दूल फर्नांडिस

दुपारी फटफटीवरून घरी परतत होतो. उन्ह असल्यामुळे लवकर घरी पोहोचण्याची घाई होती. एम-२ च्या कोपर्‍यावर एका माणसाने ‘लिफ्ट प्लिज' म्हणून हात दिला. मी गाडी थांबवली. ‘प्लिज ड्रॉप मी अ‍ॅट नेक्स्ट कार्नर', तो इंग्रजीत बोलला. त्याचे उच्चार स्पष्ट आणि सुटे होते. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. औरंगाबादसारख्या छोटा जीव असलेल्या शहरात रस्त्यावर इंग्रजी बोलणारा गृहस्थ भेटणे ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे. 

त्याचा पेहराव मळका पण इंग्रजी होता. पांढर्‍या शर्टचा रंग खाकवट झाला होता. एवढ्या उन्हातही त्याने टाय बांधलेला होता. कोट मात्र काढून हातावर लटकावला होता. डोळ्यांवर जुन्या वळणाचा जाड फ्रेमचा चष्मा होता. चष्म्याच्या दांड्या कानाकडे थोड्या बारीक होत गेल्या होत्या. मिशा बर्‍याचशा फेंदारलेल्या होत्या. केसांत काळे आणि पांढरे अशी बेरड होती. केसांत तेल लावलेले होते. चेहरा घामेजलेला आणि रापलेला होता. 

मी काही न बोलता त्याला फटफटीवर बसवून घेतले. किलोमीटरभर अंतर कापल्यानंतर त्याला उतरावयाचे असलेल्या कोपर्‍यावर त्याने ‘प्लिज स्टॉप' म्हणून गाडी थांबवायला लावली. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे एकमेकांशी काहीच बोललो नव्हतो. तो हातावरचा कोट सांभाळत उतरला. स्पष्ट आणि सुट्या शब्दांत ‘थँक यू' म्हणाला. जाण्यासाठी वळण्यापूर्वी ‘यूवर गुड नेम प्लिज' असे म्हणत त्याने मला नाव विचारले. मी नाव सांगितले. नंतर ‘व्हॉट डू यू डू' म्हणत उद्योगही विचारला. ‘मी पत्रकार आहे', असे मी म्हणालो. ‘ओऽऽ आयसी' असे म्हणत त्याने भुवया उंचावल्या. मग माझ्या पेपरचे नाव विचारून घेतले. सारे संभाषण तो इंग्रजीतूनच करीत होता. 

आता याने एवढी चौकशी केली आहे, तर आपणही काही तरी बोलून निरोप घ्यावा म्हणून त्याला नाव विचारले. तो म्हणाला, ‘मोहन अब्दूल फर्नांडिस.'

त्याचे नाव ऐकून मी त्याच्याकडे चमकून पाहिले. तो मात्र निर्विकार होता. पूर्वीच्याच स्पष्ट आणि सुट्या शब्दांत तो म्हणाला, ‘पीपल ऑलवेज फिल पझल्ड. येस, इट इज रिअली अ स्ट्रेंज नेम. मोहन हे माझे नाव आहे. अब्दूल हे माझ्या वडिलांचे नाव आहे... आणि फर्नांडिस हे आमचे आडनाव आहे.'

‘असे कसे', मी कुतुहलाने विचारले.

तो सांगू लागला, ‘एक्झाक्टली माझी आई हिंदू होती. तिने मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला. पण दोघांनी एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ केली नाही. माझा जन्म झाल्यानंतर आईने माझे नाव मोहन ठेवले. मी ८ वर्षांचा असताना आम्ही सारेच ख्रिस्ती झालो. पण आम्ही आमची नावे बदलली नाही. फक्त आडनाव बदलले. म्हणून माझे नाव मोहन अब्दूल फर्नांडीस असे झाले.'

तो मराठीही स्पष्ट आणि सुट्या शब्दांत बोलत होता. त्याची शब्दांवर पकड होती. मात्र, चेहर्‍यावर कोणतेच भाव नव्हते. इतका निर्विकार मनुष्य मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्याच्याशी बोललेच पाहिजे, असे मला वाटले. माझी गाडी अजून चालूच होती. मी गाडी बाजूच्या झाडाखाली घेऊन बंद केली आणि स्टँडवर लावली. मग आम्ही बोलू लागलो. 

‘तुम्ही काय करता?', मी विचारले.
‘सध्या बेकार आहे. ते कोपर्‍यावरचे दुकान दिसतेय ना, तिथे मुलाखतीसाठी चाललो आहे.' त्याने बोट वळवून दुकान दाखविले. ते फर्निचरचे दुकान होते. त्याचा मालक माझ्या ओळखीचा होता. त्याच्याकडून आम्ही बरीच खरेदी केलेली होती. 
‘फर्निचरच्या दुकानात तुम्ही काय काम करणार?'
‘नो मॅन. एव्हरी वर्क हॅज इटस ओन स्टँडर्ड. माझ्या गरजा फार कमी आहेत. मी एकटाच राहतो. स्वत:च स्वयंपाक करतो. लष्कराने मला ही शिस्त दिली आहे.'

‘लष्कराने म्हणजे?'
‘मिलिटरी. मी मिलिटरीत होतो.' 

कुठल्याही कोनातून पाहिले तरी तो लष्करी सेवेतला माणूस वाटत नव्हता. हा नक्की खोटं बोलत असावा, असे मला वाटले. तो सांगत होता, ‘मी लष्करात धर्मगुरू होतो. दौंडच्या कॅम्पात मी अनेक वर्षे काम केले.'
‘लष्करात धर्मगुरू कसे काय?'
‘लष्करातील जवानांना आपापल्या धर्मानुसार प्रार्थना आणि इतर कर्मे करता यावीत यासाठी व्यवस्था असते. मी ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून तेथे होतो. आय वाज देअर फॉर ख्रिश्चन रेग्यूलर्स.'

ही माहिती मला नवीन होती. लष्करात अशी काही सोय आहे, याची मला माहिती नव्हती. आता माझ्यातील पत्रकार डोकावू लागला होता. मी त्याला विचारले.

‘हॅव यू एव्हर वर्क्ड फॉर मिशनरीज?'
‘एस. आय अ‍ॅम वर्किग फॉर मोअर दॅन २० इअर्स नाऊ.'
‘व्हाय आर यू डुइंग धिस. व्हॉट मेड यू टू प्रॉसेलिटाईज नेटिव्हज?'
‘सॉरी..?'
‘व्हॉट मेड यू टू ट्राय फॉर कन्हर्जन्स?'
‘नो. वुई डोन्ट मेक कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन ईज व्हेरी अग्ली वर्ड. प्रॉपर वर्ड इज प्रोपागेशन. प्रोपागेशन म्हणजे प्रसार.'
‘धर्मांतर हा खरोखरच कुरूप शब्द आहे. पण धर्मांतर करण्याची कृती त्यापेक्षाही कुरूप आहे.' 
‘तुमचे म्हणणे खरे आहे.'
‘मग तुम्ही धर्मांतरे का करता?'
‘मी सांगितले ना, आम्ही धर्मांतरे करीत नाही. आम्ही लोकांना फक्त सत्य सांगतो. सत्यासारखी पवित्र गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही' 
‘ सत्य काय आहे.'
‘सत्य हेच आहे की, येशू हा तारक आहे. त्याला शरण गेल्यानेच मनुष्याचे तारण होणार आहे.'

मोहन अब्दूल फर्नांडीस बोलत होता. त्याचा चेहरा अजूनही निर्विकार होता. शब्द मात्र ठाम आणि निश्चित होते. मी आता थक्क झालो होतो. 

(मोहन अब्दूल फर्नांडीस याच्यासोबत झालेल्या पुढील चर्चेचा वृत्तांत दुसर्‍या लेखात.)

Sunday, 9 February 2014

संसद हे मंदिर होते

  • सूर्यकांत पळसकर। दि. १२ (औरंगाबाद)
रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. त्यांची विशेष मुलाखत.... प्रसिद्धी : लोकमत , रवि, १३ मे २०१२ .
रिशंग किशिंग : पहिल्या
लोकसभेचे सदस्य
नाव रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही कार्यकाळातील पाच पिढय़ांचे राजकारण पाहिलेले अनुभव समृद्ध व्यक्तिमत्व. तथापि, एवढीच त्यांची ओळख नाही. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. नवी दिल्लीतील तालकटोरा रोडवरील साध्याशा घरात त्यांचा निवास आहे. भिंतीवर त्यांच्या लग्नाचे एक छायाचित्र दिसते. साधासाच सोफा आणि रोपांच्या काही कुंड्या बैठकीच्या खोलीला घनगंभीर वातावरण निर्माण करून देतात. संसदेच्या विषयीच्या त्यांच्या आठवणी पावन आणि पवित्र आहेत. आज राजकारणाचा आखाडा बनलेली संसद पाहिली की, त्यांना वेदना होतात. आमच्या पिढीतील लोकांच्या दृष्टीने संसद ही नुसतीच इमारत नव्हती. ते मंदिर होते. लोकशाहीच्या या मंदिरात आम्ही श्रद्धनेच पाऊल ठेवायचो, असे ते भक्तिभावाने नमूद करतात. रिशंग कैशिंग यांच्याशी केलेली ही बातचीत.

पहिल्या लोकसभेत काम करण्याचे अत्यंत दुर्मिळ असे भाग्य तुम्हाला लाभले आहे. पहिल्या लोकसभेतील कामकाज आणि आताच्या लोकसभेतील कामकाज यात कोणता फरक तुम्ही पाहता?
- मतभेद हे राजकारणाचे अविभाज्य अंग असते. आज जसे मतभेद आहेत, तसेच ते तेव्हाही होतेच. परंतु, काळाच्या ओघात शिस्त हरवली आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही.

स्वातंत्र्य लढय़ातील दिग्गज नेत्यांसोबत तुम्ही काम केले आहे. त्याबद्दल सांगा.
- मी जेव्हा लोकसभेत दाखल झालो. तेव्हा स्वातंत्र्य लढय़ातील सर्व मोठी नेतेमंडळी लोकसभेत होती. देशाचे पहिले पंतप्रधान प. जवाहरलाल नेहरू, पहिले लोकसभाध्यक्ष जी. व्ही. मावळंकर, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, एन. सी. चटर्जी, आचार्य कृपलानी अशी थोर थोर मंडळी त्यात होती. लोकसभेत प्रवेश करताच मंदिराच्या गाभार्‍यात आल्यासारखे वाटायचे. तसेच गांधीटोपी घातलेले लोकसभाध्यक्ष मंदिरातील संतासारखे वाटायचे. 

लोकसभेत वादाचे प्रसंग तेव्हाही आले असतीलच..
- वादाशिवाय राजकारण नसते. मला आठवते. राज्यांची निर्मिती केली जात होती, तेव्हा लोकसभेत वादळी चर्चा व्हायची. पण त्यात कधी आरडा ओरडा झाल्याचे, गोंधळ झाल्याचे मला आठवत नाही. हा विषय अत्यंत संवेदनक्षम होता. अनेक नेत्यांच्या, खासदारांच्या प्रदेशांचे तुकडे झालेले होते. अनेकांचा प्रदेश इतर राज्यांना जोडला गेलेला होता. गोंधळ करण्यासाठी त्यांना अत्यंत ठोस कारण होते. तरीही याविषयावरच्या सर्व चर्चा शांततेतच पार पडल्या. आता असे चित्र दिसतच नाही. थोडक्या थोडक्या गोष्टींवरून गोंधळ होतात. कामकाज बंद पडते. 

तेव्हा लोकसभाध्यक्ष सदस्यांना कसे शांत करीत ? 
- अध्यक्षांच्या कोणत्याही निर्णयाचा सदस्य आदर करीत. सर्वच सदस्य स्वच्छ ह्रदयाचे होते. सर्वांना एकमेकांविषयी प्रेम होते. सभागृहात वाद झडल्यानंतर आम्ही एकत्र यायचो. सभागृहातील चर्चा आणि भाषणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकली जायची. आताच्या सारख्या शाऊटिंग ब्रिगेड्स तेव्हा सभागृहात नव्हत्याच. घोषणाबाजी आणि वेलमध्ये धावण्याचे प्रकारही अजिबात नव्हते.

तुम्ही राजकारणात कसे काय आलात?
- १९४९ साली मी कोलकत्यातील सेंट पॉल्स कॅथेड्रल कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलो. फायरब्रँड समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या ध्येयवादाने मला प्रेरणा दिली. मी त्यांच्या सोश्ॉलिस्ट पार्टीत सामील झालो. १९५२ साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली. पार्टीने मला बाह्य मनिपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही निवडणूक जिंकून मी लोकसभेत दाखल झालो. 

अलिकडे झटपट पक्ष बदलणारे नेतेही दिसतात. तुमच्या काळीही ते होते का?
- बदल तेव्हाही होत पण ते तात्विकच असत. त्यात स्वार्थ नसे. मी स्वत:ही पक्ष बदलला होता. १९६२ साली मी दुसर्‍यांदा लोकसभेवर निवडून गेलो. ही निवडणूकही मी सोश्ॉलिस्ट पार्टीकडूनच जिंकली. तथापि, त्याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले. माझे मणिपूर हे राज्य चीन सीमेवर असल्यामुळे त्याला जबर धोका होता. अशा परिस्थितीत सरकारचे हात मजबूत असायला हवेत, असे मला जाणवले. त्यामुळे मी तडक प. नेहरूंकडे गेलो. मला काँग्रेसमध्ये प्रवेश द्या, अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी ती मान्य केली. 

तुम्ही इंदिरा गांधींसोबतही काम केले आहे. महिला पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांच्या कारकीर्दीचे वर्णन कसे कराल?
इंदिराजी आपला शब्द पाळित. त्या वचनाच्या पक्क्या होत्या, असे त्यांचे एका ओळीतील वर्णन मी करीन. जनता पक्षाचे सरकार असतानाची गोष्ट आहे. इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध मनिपुरात एक खोटा खटला दाखल करण्यात आला होता. त्यांना समन्स बजावण्यात आले. त्यांना इंफाळला बोलावण्यात आले. तेथे त्यांना तीन दिवस कैदेत राहायचे होते. त्या आल्या. तिकिटांची व्यवस्था करण्याचे काम त्यांनी मलाच सांगितले होते. त्यांनी मनिपुरात जाऊ नये, असे लोकांचे म्हणणे होते. त्या ज्या हॉटेलात थांबल्या होत्या, दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना मनिपूरला जायचे होते. त्यांनी आदल्या संध्याकाळी लोकांना सांगितले की, मी येथेच काही दिवस थांबणार आहे. सकाळी त्या मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडल्या आणि थेट विमानतळावर गेल्या. तेथेही लोक होते. विमानाजवळ येताच त्यांनी अक्षरश: साडी खोचली आणि त्या विमानाच्या दिशेने पळत सुटल्या. 

तुमच्या समाजवादी नेत्यांविषयी काय सांगाल?
जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. हे खरोखरच महान नेते होते. त्यांचेही माझ्यावर आतोनात प्रेम होते. 

तुमचे वय आता ९१ वर्षे झाले आहे, तरीही तुम्ही उत्साहाने काम करता. तुम्हाला ही ऊर्जा कोठून मिळते?
मी स्वत:ला लोकांसाठी सर्मपित केले आहे. लोकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. कर्तव्याची ही जाणीव मला कार्यप्रवण करते. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मला या देशाची सेवा करायची आहे.

Thursday, 6 February 2014

सिंगूरच्या ‘ग्राऊंड झीरो'वर

  • सूर्यकांत पळसकर 

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …
सिंगूरचे  रेल्वे स्टेशन.
"… पृथ्वी कोठून आली याच्याशी शेतक-यांना काही कर्तव्य नाही! तिच्या जमिनीची वाटणी कशी झाली हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पृथ्वी स्थिर असो की फिरत, त्यामुळे शेतक-यांच्या जीवनात काय फरक होणार? तुम्हाला हवी तर पृथ्वी लटकावून ठेवा,  नाही तर खिळ्याने ठोकून टाका! शेतक-यांच्या दृष्टीने ती जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे..."  मॅक्झिम गोर्कीची जगप्रसिद्ध कादंबरी ‘आई'मधील हा उतारा. रशियातील बोल्शेविक क्रांतीचे हुंकार म्हणजे ‘आई'! या कादंबरीतील रिबिन नावाचे बंडखोर पात्र एके ठिकाणी वरील उद्गार काढते. डाव्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्क रिबिनच्या या वक्तव्यात आहे. सिंगूरचा दौरा करीत असताना असे असंख्य रिबिन भेटले. त्यांच्या तोंडूनही असाच अंगार बाहेर पडत होता.  ‘शेतक-यांच्या दृष्टीने जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे'  टाटांचा नॅनो प्रकल्प सिंगूरला का उभा राहू शकला नाही, याचे उत्तर या एका वाक्यात मिळते.

सिंगूर येथील टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर असलेला केळीचा फड.
घरावर सावली धरणारी किमान २० फूट उंचीची अशी केळीची झाडे
मी प्रथमच पाहिली. 
प. बंगालमध्ये डावा विचार इतका खोलवर रुजलाय की, राज्याच्या कोणत्याही भागातील मूठभर माती घेऊन कानाला लावली, तर "लाल सलाम, लाल सलाम" असे शब्द कानी पडतील! सिंगूरमधला अनुभवही असाच होता. गावात पोहोचलो तेव्हा घराघरांवर फडफडणा-या लाल बावट्यांनी स्वागत केले. ग्रामीण पेहरावाचे छोटेसे गाव. रापलेला काळा रंग आणि आयुष्यभराच्या कष्टाच्या खाणाखुणा अंगावर मिरविणारी माणसे. नॅनो प्रकल्पाबद्दल राग जसा येथे आढळून आला तसाच हा प्रकल्प उभा राहू शकला नाही या बाबत खंत आणि विषादही आढळून आल्या. टाटांचा प्रकल्प सिंगूरच्या नावे ओळखला जात असला तरी सिंगूर या गावापासून किमान अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर, कोलकता-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प आहे. महामार्गाला लागताच आजूबाजूची पिके शेतीचा सुपीक पोत सांगायला सुरुवात करतात. टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर केळीचा मोठा फड डोलत होता. केळीच्या झाडांची उंची किमान २० फूट होती. घरावर सावली धरणारी केळीची झाडे मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिली. असली शेती कोणता शेतकरी सहजासहजी सोडणार? गोर्कीची आठवण मला येथेच पहिल्यांदा झाली. नंतर या ना त्या कारणांनी गोर्की आठवतच राहिला.

सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाच्या
 प्रवेशद्वारावरील कडक बंदोबस्त. 
नॅनो प्रकल्पासाठी जवळपास १ हजार हेक्टर जमीन प. बंगाल सरकारने अधिगृहित केली होती. सिंगूर परिसरातील १० ते १५ गावांच्या शिवारातली ही जमीन आहे. येथे टाटांचा नॅनो प्रकल्प अर्धवट बांधलेल्या अवस्थेत उभा आहे. आता गेटवर झाडे-झुडपे वाढली आहेत. वातावरणात निर्जीवता आणि विषण्णता  जाणवली. शस्त्रधारी सुरक्षा जवानांचाच काय तो वावर. मुख्य दरवाजावर आम्हाला अडविण्यात आले. ‘आत जाण्यास कोणालाच परवानगी नाही', असे सांगून त्यांनी बंदुकीचा दस्ता उगाचच कुरवाळला. आम्ही काय ते समजलो.

टाटाची कमाई : सायकल स्टँड!
हा प्रकल्प अर्धवट राहिल्यामुळे जमिनी देणा-या गावांची दुर्दशा झाली आहे. या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी हाती घेण्यात आलेली रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. आम्ही एका रिक्षामधून दोबंडी, बाबूरबेरी, बेराबेरी यांसारख्या काही गावांना भेटी दिल्या. सर्वच ठिकाणचे वातावरण सुतकी होते. प्रकल्प उभा राहिला नसला, तरी जमिनी टाटाच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे शेतक-यांना दुहेरी फटका बसला आहे. कसायला जमिनी नाहीत आणि हाताला कामही नाही. ‘तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे' अशी त्यांची अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पोटापाण्यासाठी अनेक लोकांनी गावे सोडली. जे लोक गावांतच थांबले ते कामासाठी कोलकत्यात जातात. या गावांपासून सिंगूर रेल्वे स्टेशन सरासरी ५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. तिथपर्यंत लोक सायकलीने जातात. सायकली सिंगूरमध्ये पार्किंग स्टँडवर लावतात आणि रेल्वेने कोलकत्याला पोहोचतात. सिंगूर गावात सायकली सांभाळणारे असे किमान ५० पार्किंग स्टँड उभे राहिले आहेत. टाटा प्रकल्पाची कमाई काय असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा लोक या स्टँडकडे बोट दाखवतात.

भाकपाच्या हुगळी जिल्हा
कमिटीचा सदस्य माणिक दास
भाकपाच्या हुगळी जिल्हा कमिटीचा सदस्य माणिक दास याचा स्वत:चा एक स्टँड सिंगूर स्टेशनजवळ आहे. त्याची भेट झाली. त्याच्या बोलण्यात आक्रमकता होती. विषाद होता. त्याने सांगितले की, "या भागात आमची (भाकपा आणि माकपा) ताकद होती. इथल्या बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात होत्या. तरीही आंदोलन आमच्या हातून निसटले. अधिगृहित करण्यात आलेल्या जमिनीवर १५ ते २० हजार लोकांची उपजीविका अवलंबून होती. ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नोक-यांची हमी दिली गेली नाही. प्रत्यक्ष टाटाच्या साईटवर काम करणारे मजूरही कंत्राटदारांनी बाहेरून आणलेले होते. जमिनी गेल्या, हाताला कामही नाही, त्यामुळे लोक बिथरले."

लढायचे कोणासाठी?
डावे कार्यकर्तेही नॅनोविरोधातील आंदोलनात सहभागी होते, असे अनेकांनी येथे सांगितले. हे कार्यकर्ते कोण, हे सांगायचे धाडस मात्र कोणीही दाखविले नाही, तसेच हे कार्यकर्तेही उघडपणे समोर आले नाहीत. एक छुपी दहशत येथे दिसून आली. माकपाच्या एका कार्यकर्त्याशी चर्चा झाली.  "तुमचे स्वत:चे कार्यकर्ते का विरोधात गेले", असा थेट प्रश्न मी त्याला विचारला. तो म्हणाला, ‘त्यांच्याही जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. लढायचे कोणासाठी, कुटुंबासाठी की सरकारसाठी, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांनी कुटुंबाची निवड केली."

कुळांचा प्रश्न
माकपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, एके काळी जमिनदार असलेल्या श्रीमंतांच्या जमिनी या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जमिनी स्थानिक कुळे कसतात. टाटासाठी दिलेल्या जमिनींचा मोबदला मूळ मालकांना मिळाला. कुळे निराधारच राहिली. आंदोलन झाले, तेव्हा ही कुळे लढण्यात आघाडीवर होती. कारण त्यांचे सर्वस्व गेले होते.

सिंगूरच्या गावकुसाला असलेल्या बटाट्याच्या
चाळीत काम करणारे मजूर. 
बटाट्याच्या चाळीतला संघर्ष
या परिसरात बटाटा मोठ्या प्रमाणात पिकतो. सिंगूरच्या गावकुसाला बटाट्यांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर आहेत. या चाळींवरही कुळेच राबतात. आम्ही या चाळींची छायाचित्रे घेतली. हे कळताच कंत्राटदारांचे लोक धावून आले. त्यांनी कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मदतनिसाने परिस्थिती निभावून नेली. ‘माझा पाहुणा आहे. हौस म्हणून फोटो काढले',  अशी थाप त्याने मारली. बटाट्याच्या चाळींमध्ये कुळांना बेठबिगारासारखे राबवून घेतले जाते, असे भाकपाचा एक कार्यकर्ता गौतम बॅनर्जी याने सांगितले.

फक्त नॅनोलाच विरोध का?
‘नॅनो फियास्को'नंतर प. बंगालच्या राजकारणाचा गुरुत्त्वमध्य सिंगूरला हलला आहे, असे या दौ-यात जाणवले. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला यश मिळाले. सिंगूर, नंदिग्राम आणि लालगड येथील संघर्षात या निवडणूक निकालाचे मूळ आहे, असे कोलकत्यात तज्ज्ञांशी बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर भाकपाचे प्रदेश सेक्रेटरी मंजू मुजुमदार यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, "सिंगूरच्या परिसरात अनेक उद्योग आहेत. नॅनो प्रकल्पापासून अवघ्या १०-१५ कि.मी. अंतरावर बिर्लांचा ‘हिंदुस्थान मोटर्स' हा कारखाना आहे. तो सुखेनैव चालू आहे. नॅनोला केवळ राजकारण म्हणून विरोध झाला. उद्योगजगतातील टाटांच्या विरोधकांनीही नॅनोविरोधी आंदोलनाला रसद पुरविली"
सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाचे
सुरू न होऊ शकलेले पॉवर स्टेशन. 
प. बंगालात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी होणार आहे. तुमची सलग सत्ता कायम राहील असे वाटते का, असा प्रश्न विचारला त्यावर ठामपणे ‘होय' असे उत्तर देण्याचे मंजू मुजुमदार यांनी टाळले. ते म्हणाले, "क्रांती हे आमचे ध्येय आहे. निवडणूक ही क्रांतीच्या मार्गातील एक लढाई आहे. ती आम्ही लढू".

भाकपाचा ‘होल टाईमर' गौतम बॅनर्जी.
अशा कार्यकत्र्यांच्या बळावरच
प. बंगालमधील  डाव्यांचे साम्राज्य अद्याप
टिकून  आहे. गौतम सोबत होता, म्हणून
 सिंगूर परिसरात मला फिरता आले. 
जमिनींचे काय होणार?
‘दीदींची (ममता बॅनर्जी) सत्ता आल्यावर आम्हाला जमिनी परत मिळणार आहेत", असे प्रकल्पग्रस्त लोक छातीठोकपणे सांगत होते. याविषयी मुजुमदार यांना छेडले. त्यावर ते म्हणाले, "तृणमूलवाल्यांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. १८९४ सालच्या भूसंपादन कायद्यान्वये ही जमीन अधिगृहित करण्यात आली आहे. या कायद्यात जमीन परत करण्याची तरतूदच नाही. जमिनी परत करायच्या असतील, तर केंद्र सरकारला कायदा बदलावा लागेल, तसेच आता जमिनीचे सपाटीकरण झाले आहे. बांधकामे झाली आहेत. ही जमीन शेतीसाठी कशी वापरणार. कोणाची जमीन कुठे होती हे कसे शोधणार"

 प. बंगाल सरकारने नॅनो प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचे अखेर होणार तरी काय, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता. या संपूर्ण दौ-यात त्याचे उत्तर मात्र कोठेच मिळाले नाही. प. बंगालमधील डाव्यांच्या सरकारचे काय होणार हा आणखी एक प्रश्न कोलकता सोडताना मनात येऊन गेला. त्याचे ठोस उत्तर हाती लागले नसले, तरी अंदाज मात्र येत होता. डाव्यांच्या या गडाला मोठे खिंडार पडले आहे. खिंडार पडले की, गड पडायला फार वेळ लागत नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे.